गुरुवार दि. १८ डिसेंबर २०२५


ओव्हरलोड, विना नंबर प्लेटच्या गाड्या उडवत आहेत खडीचा धुरळा…

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
आजरा – यमेकोंड- शिरसंगी मार्गावर सुरू असणारे क्रशर हे सर्वसामान्य वाहनधारक व नागरिकांच्या दृष्टीने डोकेदुखी ठरत आहेत. ओव्हरलोड स्वरूपात विना नंबर प्लेटच्या गाड्यांमध्ये भरली जाणारी खडी, ती खडी रस्त्यावर पडून इतर वाहन चालकांना धुरळा व खडीचा होणारा त्रास आणि अवजड वाहने जाऊन रस्त्यांची झालेली दुर्दशा पाहता चिरीमिरीसाठी सर्वसामान्य वाहनधारकांची आडवणूक करणाऱ्या मंडळींकडून या विना नंबर प्लेटच्या ओव्हरलोड गाड्या नजरेआड करण्यामागचे गौडबंगाल कायम आहे.
सध्या या भागामध्ये खडी वाहतूक मोठ्या प्रमाणावर होताना दिसते. आजरा – शिरसंगी मार्ग असो अथवा आजरा – वाटंगी मार्ग असो रस्त्यावर खडीचे साम्राज्य पसरलेले दिसते. खडीवरून घसरून अनेकदा या ठिकाणी दुचाकी स्वारांचे अपघात झाले आहेत. या अवजड गाड्यांनी रस्त्याची तर दुर्दशा करून टाकण्यास सुरुवात केली आहे.
मुळातच पासिंगशिवाय नंबर प्लेट नसणारी वाहने रस्त्यावर आणण्याची कोणतीही परवानगी नसताना ही अवजड वाहने बिनधास्तपणे रस्त्यावरून धावतात कशी ? हा प्रश्न आता सर्वसामान्यांना पडू लागला आहे.
किमान खडी रस्त्यावर पडणार नाही व त्याचा इतरांना त्रास होणार नाही याची दक्षता तरी प्रशासनासह या वाहन चालकांनी घेण्याची गरज अधोरेखित होत आहे.

आजऱ्यामध्ये तलाठी, मंडल अधिकाऱ्यांचे आंदोलन आयटी उपकरणे झाली जीर्ण; उपकरणांसाठी ऑनलाईन कामावर बहिष्कार

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
महाराष्ट्र राज्य तलाठी संघाने १५ डिसेंबरपासून सर्व ग्राम महसूल व मंडळ अधिकारी आपली डिजिटल सिग्नेचर (डीएससी) तहसील कार्यालयात जमा करून संपूर्ण ऑनलाइन कामकाजावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे. आजरा तालुक्यातील सर्व तलाठी व मंडळ अधिकारीही हा निर्णय अंमलात आणणार आहेत. १५ डिसेंबरपासून या आंदोलनाला सुरूवात केली आहे.
आजरा तालुका तलाठी संघाने तहसिलदार समीर माने यांना निवेदन सादर करून ग्राम महसूल अधिकारी व मंडळ अधिकारी यांच्याकडे असलेली आयटी उपकरणे बदलून नवीन लॅपटॉप तसेच प्रिंटर-कम-स्कॅनर तातडीने उपलब्ध करून देण्याची मागणी केली आहे. सध्या असलेली उपकरणे जीर्ण व निकामी झाली आहेत. त्यामुळे कामकाजात अडचणी निर्माण होत असल्याचे नमूद केले आहे.
यावेळी अध्यक्ष समीर जाधव,उपाध्यक्ष एकनाथ मिसाळ, सचिव अशोक कुंभार, जिल्हा पदाधिकारी महादेव देसाई, विभागीय अध्यक्ष रमेश यादव,मं अधिकारी सुंदर जाधव, संदिप कुरणे , प्रविण खरात , गीता कुंभार उपस्थित होते..

भादवणचे सुपुत्र चंद्रकांत उंडगे बृहन्मुंबईचा मुख्य अभियंतापदी

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
भादवण ता.आजरा गावचे सुपुत्र चंद्रकांत लक्ष्मण उंडगे यांची बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या मुख्य अभियंता पदावर नियुक्ती करण्यात आली आहे. य कठोर परिश्रम, प्रामाणिक सेवा – आणि प्रशासकीय अनुभवाच्या बळावर उंडगे यांनी हे पद मिळवले आहे. महानगरपालिकेतील सुमारे ३१ वर्षे ते सेवा करीत आहेत. त्यांनी विविध महत्त्वाच्या जबाबदाऱ्या समर्थपणे पार पाडल्या आहेत.
महानगरपालिकेतील प्रशासकीय कामकाज, विकास प्रकल्पांचे नियोजन, तांत्रिक अंमलबजावणी आणि समन्वय या क्षेत्रांत त्यांना चांगला अनुभव आहे. मुख्य अभियंता पदाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर मुंबईतील पायाभूत सुविधा, नागरी विकास, रस्ते, जलनिस्सारण आणि इतर महत्त्वाच्या प्रकल्पांना अधिक गती मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
त्यांच्या या नियुक्तीने भादवण गावासह तालुक्यातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

एन एम एम एस विद्यार्थ्यांसाठी कार्यशाळा संपन्न

उत्तूर : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
उत्तुर विद्यालय उत्तुर मध्ये आजरा तालुका मुख्याध्यापक संघाच्या वतीने एन एम एम एस कार्यशाळा संपन्न झाली. कार्यशाळे मध्ये आजरा तालुक्यातील सर्व माध्यमिक विद्यालयांचे आठवीचे विद्यार्थी सहभागी झाले. येत्या २८ डिसेंबरला एन एम एम एस ही राष्ट्रीय शिष्यवृत्ती परीक्षा संपन्न होणार आहे. या परीक्षेला प्रविष्ट होणाऱ्या विद्यार्थ्यांना विशेष मार्गदर्शन लाभावे म्हणून या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. या कार्यशाळेमध्ये मार्गदर्शक म्हणून पुष्पनगर हायस्कूल गारगोटी चे गणित तज्ञ शिक्षक श्री.आर.जी. सुतार आणि बुद्धिमत्तेसाठी महालक्ष्मी हायस्कूल सावर्डे चे निवृत्त शिक्षक श्री.ए.आर.पाटील हे उपस्थित होते. तालुक्यातील १०० हून अधिक विद्यार्थ्यांनी याचा लाभ घेतला. या कार्यशाळेसाठी उत्तुर विद्यालय उत्तुरचे मुख्याध्यापक श्री. महापुरे, पार्वती शंकर विद्यालय उत्तुर चे मुख्याध्यापक श्री. शिकलगार , मुख्याध्यापक संघाचे तालुका अध्यक्ष श्री. मुंडे व उपाध्यक्ष श्री. वामन सामंत यांचे सहकार्य लाभले.

श्री.रवळनाथ प्राथमिक व आदर्श बालक मंदिर शाळेच्या फॅन्सी ड्रेस स्पर्धा उत्साहात

आजरा: मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
आजरा येथील जनता एज्युकेशन सोसायटी संचलित श्री. रवळनाथ प्राथमिक विद्यामंदिर व आदर्श बालक मंदिर शाळेच्या विद्यार्थ्यांच्या ‘फॅन्सी ड्रेस स्पर्धा’ पार पडल्या.
वेगवेगळ्या वेशभूषा करून लहान मुले व मुली सहभागी झाली होती.यामध्ये शेतकरी, भाजीवाली, संत, वारकरी, कोळी, सैनिक, हवाई सुंदरी, राजमाता जिजाऊ, छत्रपती शिवाजी महाराज, झाशीची राणी लक्ष्मीबाई अशा पारंपारिक व ऐतिहासिक वेशभूषांच्या बरोबरच डॉ. बाबासाहेब आंबेडकर, पंडित जवाहरलाल नेहरू, सावित्रीबाई फुले अशा थोर पुरुषांच्या व समाजसुधारकांच्या वेशभूषा करून मुलांनी स्पर्धेमध्ये उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला होता. या स्पर्धांचे परीक्षक म्हणून विद्या हरेर , युवराज शेटगे यांनी काम पाहिले.
यावेळी श्री.रवळनाथ प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका उज्वला देसाई, शिक्षिका निलांबरी कामत,आदर्श बालक मंदिरच्या मुख्याध्यापिका साधना नारे, जयश्री डांग, अश्विनी राणे, सुप्रिया भिकले, शिक्षक विशाल गुरव, माही टोपले यांच्यासह शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.


