
एरंडोळ येथे महिलेची आत्महत्या

एरंडोल (ता. आजरा) येथे सौ. पार्वती उर्फ नंदा रवळू पाटील या ५५ वर्षीय महिलेने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. रविवारी सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास सदर प्रकार घडला.
रविवारी सायंकाळी घडलेल्या या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. सौ. पाटील यांच्या मुली दिवाळी करता माहेरी आल्या होत्या. त्या सायंकाळी आपल्या चुलत भावाला मुंबई येथे पोहोचवण्यासाठी बाहेर गेल्या असता सदर प्रकार घडला. पाटील यांच्या पश्चात पती, दोन विवाहित मुली, मुलगा असा परिवार आहे. आत्महत्येचे नेमके कारण समजू शकले नाही.
याबाबतची वर्दी शिवाजी नारायण पाटील यांनी आजरा पोलिसात दिली असून पोलीस पुढील तपास करीत आहेत.

बाबुरावजी कुंभार म्हणजे पक्ष मजबुतीसाठी अग्रभागी असणारा अजातशत्रू कार्यकर्ता
बाबुरावजी कुंभार यांचा स्मृतिदिन उत्साहात

भाजपाकडे कोणत्याही प्रकारची सत्ता नसताना स्व. बाबूरावजी कुंभार यांच्यासारख्या कार्यकर्त्याने आजरा तालुक्यामध्ये म्हणण्यापेक्षा प्रसंगी जिल्ह्यामध्ये भाजपाचे अस्तित्व टिकवून ठेवले. अजातशत्रू अशी ओळख असणारे कुंभार म्हणजे भाजपाचा बुलंद आवाज होते. त्यांचा आदर्श घेऊन तालुक्यातील कार्यकर्त्यांनी आपली वाटचाल चालू ठेवावी असे आवाहन जिल्हा परिषदेचे माजी बांधकाम समिती सभापती केरबा चौगुले यांनी केले. स्व. बाबूरावजी कुंभार यांच्या सहाव्या स्मृतिदिनानिमित्त बाबा देसाई, हिंदुराव शेळके यांच्या प्रमुख उपस्थितीत आयोजित कार्यक्रम प्रसंगी ते बोलत होते.
स्व. कुंभार यांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात झाली. स्वागतपर भाषणात प्रा.डॉ. सुधीर मुंज यांनी बाबुरावजी कुंभार यांच्या कार्याचा आढावा घेतला.
कार्यक्रमांमध्ये डॉ. श्रद्धानंद ठाकूर डॉ. रवींद्र गुरव, अनुष्का गोवेकर, सतीश कांबळे व शिवप्रतिष्ठानच्या पदाधिकाऱ्यांचा मान्यवरांच्या हस्ते विशेष गौरव करण्यात आला.
अण्णाभाऊ संस्था समूहाचे प्रमुख अशोकअण्णा चराटी म्हणाले, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची वाटचाल आत्मसात केली असली तरी सर्व धर्मीयांशी व लहानापासून थोरापर्यंत सर्वांशी त्यांचे सलोख्याचे संबंध होते. राजकारणात वेगळेपणा जपला होता असे सांगितले.
यावेळी भाजपाचे माजी जिल्हाध्यक्ष हिंदुराव शेळके, शिवप्रतिष्ठानचे वामन सामंत, अभिषेक रोडगी, यांनी मनोगत व्यक्त केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचलन अनिल कांबळे यांनी केले तर भाजपा तालुकाध्यक्ष सुधीर कुंभार यांनी आभार मानले.
उपस्थितांची मांदियाळी
कार्यक्रम प्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष मुकुंदराव देसाई, राष्ट्रीय काँग्रेसचे तालुकाध्यक्ष नामदेवराव नार्वेकर, नगराध्यक्क्षा ज्योत्स्ना चराटी, नगरसेविका सौ.शुभदा जोशी, नगरसेवक धनाजी पारपोलकर, नगरसेविका सौ. शकुंतला सलामवाडे, जनता बँकेचे संचालक बापू टोपले, आजरा साखर कारखान्याचे संचालक दशरथ अमृते, विजयकुमार पाटील, बाळासाहेब नाईक,नगरसेवक आनंदराव कुंभार, स्वामी विवेकानंद पतसंस्थेचे अध्यक्ष जनार्दन टोपले, अरुण देसाई, बाळासाहेब नाईक मलिककुमार बुरुड, दयानंद भुसारी अजित हरेर, अर्जुन कुंभार,सौ. सुरेखा फडके रमेश कुरुणकर, इंद्रजीत देसाई , विजय थोरवत, सुरेश डोणकर,उदय चव्हाण, सचिन इंदलकर,जनार्दन नेऊंगरे, संजयभाऊ सावंत,रवी तळेवाडीकर, संदीप चौगले, शैलेश मुळीक,जयसिंग शेंदरकर, अजित बिरजे, संभाजीराव इंजल, संतोष बेलवाडे, सचिन बिरजे गोविंद जाधव,श्रीपती यादव,विजय राजोपाध्ये,किसन हरमळकर,शैलेश पाटील,निवृत्ती शेंडे, शिवसेना तालुकाध्यक्ष युवराज पवार आशिषकुमार देसाई, भिकाजी पाटील, राजेंद्र चंदनवाले, सुरेश पाटील यांच्यासह मान्यवर व कुंभार कुटुंबीय उपस्थित होते.

बहिरेवाडी येथे ‘लंपी’ने चौथे जनावर दगावले

आजरा तालुक्यातील बहिरेवाडी येथे ‘लंपी’च्या संसर्गाने बाधित असणाऱ्या बैलाचा आज मृत्यू झाला. परशुराम भैरू नाईक यांच्या बैलाला लंपीची लागण झाली होती. याच बरोबर दोन दिवसापूर्वी बहिरेवाडी येथील एका वासराचाही ‘लंपी’ ने मृत्यू झाला.
तालुक्यात लंपि’ने मृत्यू होणाऱ्या जनावरांची संख्या चार झाली असून विशेष बाब म्हणजे ही सर्व जनावरे बहिरेवाडी येथील आहेत.


सोहाळे येथे मधमाश्यांचा हल्ला
सातजण जखमी
भात कापणीसाठी गेलेल्या शेतकऱ्यांवर मधमाश्यांनी हल्ला केल्याची घटना सोहाळे येथे घडली असून हल्ल्यात सात ग्रामस्थ जखमी झाले.
शनिवारी दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास हा प्रकार घडला.
याबाबत अधिक माहिती अशी, सोहाळे येथील म्हारकी नावाच्या शेतामध्ये यल्लापा बापू कांबळे यांचे भात कापण्यासाठी यल्लाप्पा यांच्या कुटुंबिय गेले होते. यावेळी अचानकपणे मधमाश्यांनी त्यांच्यावर हल्ला केला. या हल्ल्यामुळे शेतकऱ्यांची चांगलीच धावपळ उडाली. मधमाशांच्या हल्ल्यात यल्लाप्पा बापू कांबळे (वय ४३), माधुरी कांबळे (वय ३६) या दोघा पतीपत्नीसह त्यांचा मुलगा प्रज्वल कांबळे (वय १२) हा देखील जखमी झाला आहे. याबरोबरच संजय कांबळे (वय ४५), उषा कांबळे (वय ३७), विमल कांबळे (५५) व संजय चिलबा कांबळे (४८, सर्व रा. सोहाळे) या सात जणांचा मधमाश्यांनी चावा घेतल्याने ते जखमी झाले आहेत. जखमींवर ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

‘मला गुवाहाटीहून परत यायचं होतं’… बच्चू कडू

♦️अचलपूरचे आमदार बच्चू कडू आणि बडनेराचे आमदार रवी राणा यांच्यातील वाद दिवसेंदिवस वाढत चालला आहे. रवी राणा यांनी बच्चू कडूंवर गुवाहाटीला जाऊन ५० खोके घेतल्याचा आरोप केल्यामुळे सुरु झालेला हा वाद अजून पेटला आहे. रवी राणांनी केलेल्या आरोपांवर मी शांत बसणार नाही असा इशाराच बच्चू कडूंनी दिला आहे. दरम्यान ‘एबीपी माझा’ कट्ट्यावर बोलताना बच्चू कडू यांनी आपल्याला गुवाहाटीहून परत यायचं होतं असा खुलासा केला आहे.*
एकनाथ शिंदेंसह इतर आमदार शिवसेनेतून बाहेर पडल्यानंतर सूरतला गेले होते. त्यानंतर बंडखोर आमदारांनी आपला मुक्काम गुवाहाटीला हलवला होता. गुवाहाटीमधील हॉटेलमध्ये हे सर्व आमदार वास्तव्यास होते. यामध्ये ‘प्रहार’चे बच्चू कडू यांचाही समावेश होता. दरम्यान त्यांनी आपल्याला गुवाहाटीहून परत यायचं होतं असा खुलासा केला आहे.
बच्चू कडू काय म्हणाले?
“पुराव्यांशिवाय काही बोलू नये. जर काही पुरावे असतील तर आम्ही तुमच्या घरची भांडी घासू असं मी सांगितलं आहे. मी २० ते २५ वर्षांपासून काम करत आहे. आमचा बापजादा कोणीही राजकारणी नाही. पैसा, जात-पात, धर्म कधीही राजकारणात आणला नाही. कोणत्या पक्षाचा पाठिंबाही घेतला नाही. आम्ही काही तत्वं जपली आहेत. पण राजकारणात रणनीती आखताना काही तत्वं बाजूला ठेवावी लागतात, त्याचं दु:खही असतं. पण आता व्यवस्थाच इतकी बदलली आहे की समुद्रात गोड पाणी टाकण्याला अर्थ नाही,” अशी खंत बच्चू कडू यांनी व्यक्त केली.
“आमच्याकडे पाहण्याचा लोकांचा दृष्टीकोन वेगळा आहे. मी गुवाहीटाला जाऊ नये असं अनेकांना वाटत होतं. अनेक लोकांचे, कार्यकर्त्यांचे मला फोन आले,” असं बच्चू कडू यांनी सांगितलं.
“राजकुमार म्हणून आमचे एक आमदार आहेत, ते सर्वात आधी गुवाहाटीला गेले आणि नंतर मी गेलो. भेटून परत यायचं असं माझं ठरलं होतं. मी सोबत आहे इतकं सांगून मला परत यायचं होतं. मला तिथे थांबायचं नव्हतं. पण ती वेळच तशी होती की, आलेला माणूस जाऊ द्यायचा नाही. ते करावं लागतं, त्यात काही चुकीचं नाही. आम्हीदेखील नगरसेवकांना थांबवूनच ठेवतो,” असं बच्चू कडू यांनी सांगितलं.

जमिनीच्या एक-दोन गुंठे खरेदी-विक्रीला स्थगिती; सोळा नोव्हेंबरला होणार पुढील सुनावणी

तुकडेबंदी कायदा अस्तित्वात असूनही जमिनींचे तुकडे पाडून दस्तनोंदणी करण्यात येत होती. याबाबत अनेक गैरप्रकार पुढे आल्यानंतर जमिनीच्या एक-दोन गुंठे खरेदी-विक्री व्यवहारांची दस्तनोंदणी करण्यास बंदी घालण्यात आली. तसेच, अशा प्रकारच्या जमिनींची खरेदी-विक्री करायची असल्यास संबंधित लेआऊट करून जिल्हाधिकारी किंवा सक्षम प्राधिकरणाची मंजुरी घेणे बंधनकारक करण्यात आले होते. या निर्णयाला औरंगाबाद उच्च न्यायालयाने स्थगिती दिली होती. मात्र, त्यावर दाखल पुनराविलोकन याचिकेवर सुनावणी होऊन औरंगाबाद उच्च न्यायालयाने तुकडेबंदी कायद्याचे उल्लंघन करून होणार्या दस्तनोंदणीला तूर्त स्थगिती दिली आहे.
पुढील सुनावणी 16 नोव्हेंबरला होणार आहे. नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागाने 12 जुलै 2021 रोजी तुकडेबंदी तुकडेजोड सुधारणा अधिनियमाच्या कलम ‘ब’ नुसार परिपत्रक जारी केले होते. त्यानुसार एक-दोन गुंठे जागांचे व्यवहार करताना संबंधित क्षेत्राचे लेआऊट करून जिल्हाधिकारी किंवा सक्षम प्राधिकरणाची मंजुरी घेतल्यास दस्तनोंदणी करण्याचे आदेश देण्यात आले होते. त्याकरिता प्रत्येक जिल्ह्याचे प्रमाणभूत क्षेत्र निश्चित करण्यात आले होते.
या प्रमाणभूत क्षेत्रापेक्षा कमी क्षेत्राच्या जमिनींचे खरेदी-विक्री व्यवहार नाकारले जात होते. या पार्श्वभूमीवर औरंगाबाद उच्च न्यायालयात या निर्णयाला आव्हान देण्यात आले होते. सुनावणी घेऊन न्यायालयाने हे परिपत्रक रद्द करण्याचे आदेश दिले. मात्र, या निर्णयाविरोधात पुनराविलोकन याचिका दाखल करण्यात आली. या याचिकेवर सुनावणी होऊन औरंगाबाद खंडपीठाने तुकड्यातील जमिनींची दस्तनोंदणी 16 नोव्हेंबरपर्यंत करण्याला स्थगिती दिली आहे.
न्यायालयाच्या निर्णयाविरोधात राज्य शासनाच्या सूचनेनुसार पुनराविलोकन याचिका दाखल केली आहे. न्यायालयाकडून याचिका स्वीकारण्यात येऊन त्यावर सुनावणी झाली. न्यायालयाने तुकड्यातील जमिनींची दस्तनोंदणी करण्याला 16 नोव्हेंबरपर्यंत स्थगिती दिली आहे. पुढील सुनावणी 16 नोव्हेंबरला होणार असून, त्यामध्ये न्यायालयाच्या आदेशानुसार पुढील कार्यवाही करण्यात येईल.
– श्रावण हर्डीकर,
नोंदणी महानिरीक्षक व मुद्रांक
(साभार -whatsupchat)



