सोमवार दि.२ फेब्रुवारी २०२६



पेरणोलीच्या नीलमचे प्रेरणादायी यश… आरबीआयमध्ये अधिकारी
आजरा तालुक्यातील पहिली कन्या

आजरा : मृत्युंजय महान्यूजसेवा
पेरणोली (ता. आजरा) येथील शेतकरी कुटुंबातील मुलीने जिद्द चिकाटी आणि परिश्रम व कुटुंबाच्या पाठिंब्याच्या जोरावर लखलखित यश मिळवले आहे. तीची भारतीय रिझर्व्ह बँकेत (RBI) प्रथम श्रेणी अधिकारी ( Grade A officer ) म्हणून निवड झाली असून, आजरा तालुक्यामधून आरबीआयमध्ये निवड होणारी ती पहिली मुलगी आहे.
तिचे वडील आई अल्पशिक्षित असून अत्यंत कष्टातून तिला शिक्षण दिले . स्वतः ला शिक्षण घेता आले नसले तरी तिला मानसिक आणि आर्थिक आधार दिला. आर्थिक अडचणीची कोणतीही पर्वा न करता नीलमच्या शिक्षणाची वाट सुखकर करण्याचा प्रयत्न केला .
समाजातील अनेकांनी “मुलीचं लग्न करा, शिक्षण देऊन काय फायदा?” असे सल्ले दिले. पण लहानपणापासून अभ्यासात हुशार असलेल्या नीलम च्या शिक्षणासाठी कुटुंबातील सदस्य, शिक्षक , जाणकार यांनी तिच्या शिक्षणाला पाठिंबा दिला.
पती अजिंक्य दळवी, वडील धनाजी कालेकर, आई अंजना कालेकर, व भाऊ आकाश कालेकर यांच्यासह संपूर्ण कुटुंबाने केलेल्या त्यागाला आणि मेहनतीला अखेर यश आले आणि ती देशाच्या मध्यवर्ती बँकेत अधिकारी बनली.
ही यशोगाथा ग्रामीण भागातील मुलींसाठी प्रेरणादायी असून, शिक्षणाला दिलेला पाठिंबा आणि आत्मविश्वास असेल तर कोणतीही परिस्थिती आड येऊ शकत नाही, हे तिने सिद्ध करून दाखवले आहे. ती भारतीय रिझर्व्ह बँकेत (RBI) अधिकारी म्हणून मुंबई येथे कार्यरत आहे. भविष्यात या क्षेत्रात उच्च पदावर काम करण्याचे तिचे स्वप्न असून गव्हर्नर होण्याचा मानस ही तिने व्यक्त केला आहे.

सोमेश्वर पाणीपुरवठा संस्थेत सोमेश्वर विकास आघाडीचा एकतर्फी विजय

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
श्री सोमेश्वर पाणी पुरवठा सहकारी संस्था मर्यादित खानापूरच्या पंचवार्षिक निवडणुकीत जयवंत राजाराम राणे व युवराज विष्णू जाधव यांच्या नेतृत्वाखाली लढलेल्या “सोमेश्वर विकास आघाडीला” एक बिनविरोध सह दहा जागांवर विजय.तर विश्वास कृष्णा जाधव यांच्या विरोधी आघाडीला बिनविरोध एका जागेवर समाधान मानावे लागले.
विजयी उमेदवार पुढील प्रमाणे
सर्वसाधारण गट-
१) राणे महादेव कृष्णा
२) सडोलकर उत्तम जोतीबा
३) जाधव विजय प्रकाश
४) जाधव युवराज विष्णू
५) चव्हाण महेश शिवाजी
६) चव्हाण संजय विष्णू
महिला राखीव गट
१) जाधव सविता विश्वास
२) जाधव स्वाती भिकाजी
इतर मागास प्रवर्ग
१) गुरव सुदाम देवाप्पा
अनुसूचित जाती जमाती
१) दिवेकर सुशांत संजय — (बिनविरोध)
विमुक्त जाती/भटकी जमाती
१) गावडे बाबु विठु — (बिनविरोध)
शैलेश सावंत यांनी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून काम पाहिले.

२५ वर्षापूर्वीच्या गावच्या आठवणीना उजाळा..
चित्री प्रकल्पग्रस्तांचे अनोखे संमेलन

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
चित्री धरण झाले आणि लाटगाववाडी गावठाण हे छोटंसं खेडं विस्थापित झालं जे आजऱ्या पासून ३ किलोमिटरवर असणारे आजचे चित्रानगर… २५ वर्षा पूर्वी गावठाण वरून चित्रानगर इथे आलेला जुन्या – जाणत्या लोकांच्या मनात मात्र सतत गावठाण गाव, तिथल्या अनेक सुखदुःखाच्या आठवणी, तिथल्या प्रथा,परंपरा, सांस्कृतिक वारसा,घरं, शेते, तिथली साधीभोळी माणसं या गोष्टी घोळत असतात त्यांच्या बोलण्यातून हे जाणवायचं . शरीरानं ही माणसं चित्रानगरमध्ये पण मनानं मात्र गावठाण मध्येच…
शाळेतील वनभोजनाच्या निमित्तानं सुभाष चौगुले यांच्या डोक्यात हा विषय आला की गावातील सर्व लहान- थोरांना त्या भूमीमध्ये पुन्हा घेऊन जायचं आणि नवीन पिढीला आपल्या जुन्या गावाची तिथल्या संस्कृतीची व गावासाठी आपल्या लोकांनी दिलेल्या लढयाची महीती द्यायची.
या उद्देशानं वनभोजनाचं नियोजन केले. गावातील तरुणांनी त्याला तयारी दाखवली व रविवार दि १ फेब्रुवारी रोजी सर्व लहान थोर मंडळी जुन्या गावाकडे निघाली.तिथे जानबा मिसाळ ,बंडू मिसाळ, चंद्रकांत लाड, निवृत्ती चौगुले धोंडीबा मिसाळ शिवाजी मिसाळ यांनी प्रत्यक्ष गावच्या ठिकाणी माहिती दिली. माहिती सांगताना मात्र प्रत्येकाला गहिवरून येताना दिसत होते. त्यानंतर सर्वांनी एकत्र येत पारंपारीक गाणी,नृत्य, पोवाडे, गण, गवळण, सांस्कृतिक परंपरेचा वारसा नव्या पिढी समोर मांडला .
अनिकेत लाड, तानाजी मिसाळ, नंदू लाड, प्रकाश लाड, संदीप मिसाळ, रामदास मिसाळ, सुशांत मरगळे, सुभाष चौगुले महादेव सावंत , अष्टप्रधान मंडळाचे सर्व सदस्य यांनी नियोजन केले. जुन्या आठवणींना उजाळा देत चित्री प्रकल्पग्रस्त पुन्हा एक वेळ आपापल्या नद्या वसाहतींकडे परतले.

गोकुळ संचालिका अंजनाताई रेडेकर गटाचा उमेश आपटे व सौ. साधना केसरकर यांना पाठींबा.…

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
उत्तूर जिल्हा परिषद मतदार संघात कोल्हापूर जिल्हा दुध संघाच्या ( गोकुळ ) संचालिका व माजी जि. प. सदस्या श्रीमती अंजनाताई रेडेकर गटाने “ताराराणी ” आघाडीचे उमेदवार उमेश आपटे व दोन्ही पंचायत समितीचे उमेदवार यांना जाहीर पाठिंबा दिला. पेद्रेवाडी येथील जाहीर मेळाव्यात त्यांनी पाठिंब्याची घोषणा केली. यावेळी भागातील गावांचे प्रतिनिधी उपस्थित होते.
स्वागत व प्रास्ताविक पांडुरंग ढवळे यांनी केले, यावेळी बोलताना रेडेकर म्हणाल्या, उत्तूर जि. प. मतदार संघात उमेश आपटे यांचे काम मोठे आहे. सर्वसामान्य जनता हीच त्यांची शिदोरी आहे, गोरगरीब जनता त्यांना ‘देवदूत ‘ मानते मग आम्ही अशा माणसाच्या पाठीशी उभे राहणे गरजेचे आहे, त्यांना या १६ गावात प्रचंड मताधिक्य देण्याची ग्वाही दिली.
यावेळी बोलताना आपटे म्हणाले, गेली तीन महिने या नव्याने जोडलेल्या गावात फिरत आहे. गजरगावसारख्या गावातील नागरिकांना आजऱ्याला यावयाचे झाले तर गडहिंग्लज तालुक्यातील अत्याळ गावावरून जावे लागते ही मोठी शोकांतिका आहे. यासाठी मी स्वतः पुढाकार घेऊन बसेस सुरु करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले. या गावातील नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी संपर्क कार्यालय काढणार असल्याचे सांगितले, प. स. उमेदवार साधना केसरकर यांनी महिला आणि सर्वसामान्य माणूस केंद्रबिंदू मानून काम करणार असल्याची ग्वाही दिली.
यावेळी आनंदराव जोशीलकर, सुधीरकुमार पाटील, संजय येसादे, धनाजी डोगरे यांनी मनोगते व्यक्त केली.
मेळाव्यास बाजीराव पाटील, नारायण पोवार, बबन चव्हाण,महादेव कातकर आप्पा डोंगरे बाळू चव्हाण, श्रीकांत येजरे, संजय उत्तूरकर अमोल भांबरे,विजय गुरव यांच्यासह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. आभार सुभाष पाटील यांनी मानले.

सर्वसामान्यांच्या भाजपाच्या उज्वल भवितव्यासाठी भाजपाच्या पाठीशी ठामपणे उभे रहा : सुधीर कुंभार
भावेवाडी, जेऊर परिसरात प्रचार दौरा…

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
गेल्या दहा वर्षात केंद्रात व राज्यात सत्तेत असणाऱ्या भाजप सरकारने सर्वसामान्यांच्या हिताच्या अनेक योजना राबविल्या आहेत. या योजना नुसत्या राबवल्या नाहीत तर त्या सर्वसामान्यांच्या घरापर्यंत पोहोचवण्यात देखील भाजपा व भाजपाचे कार्यकर्ते अग्रेसर आहेत. त्यामुळे या सर्व योजनांचा लाभ सर्वसामान्य नागरिकांना चांगल्या पद्धतीने झाला आहे. त्यामुळे जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीमध्ये सर्वांनी भारतीय जनता पार्टीच्या पाठीशी ठामपणे उभे राहावे, असे आवाहन भाजपा जिल्हा उपाध्यक्ष सुधीर कुंभार यांनी केले. भाजपचे पेरणोली जिल्हा परिषद मतदार संघाचे उमेदवार जयवंत सुतार व पंचायत समिती उमेदवार समीर पारदे यांच्या प्रचारार्थ भावेवाडी, जेऊर, चितळे, धनगरवाडा या गावातील प्रचार फेरीत ते बोलत होते. या गावातील ग्रामस्थांनी भाजपाच्या पाठीशी ठामपणे राहण्याचा निर्धार यावेळी व्यक्त केला.
यावेळी भाजपा नेते अरुण देसाई, जिल्हा परिषद उमेदवार जयवंत सुतार, संजय सांबरेकर, उदयसिंह सरदेसाई, बळवंत शिंत्रे, दीपक गवळी, जयसिंग शेंदरकर, पांडुरंग दळवी, सचिन पाटील, जितेंद्र नांदवडेकर, संजय सावंत, अजित हरेर यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.

मुम्मेवाडीत भाजपासह समरजितसिंह घाटगे गटाचा उमेश आपटे यांना पाठिंबा

भारतीय जनता पार्टी व राजे समरजीत सिंह घाटगे यांच्या मुम्मेवाडी गावातील कार्यकर्त्यांनी उमेश आपटे यांना पाठिंबा जाहीर केला आहे.
धनाजी साठे, प्रकाश येडूरकर, ज्ञानेश्वर करवळ, प्रमोद हरणे, प्रवीण पाटील, एकनाथ गुरबे, दीपक गुरव, दशरथ सावेकर, जोतिबा बेलकर, दयानंद बेलकर, संजय पाटील, बाळू सावेकर, प्रदीप सावेकर, साईल दोरुगडे, मारुती दोरूगडे,अण्णा करंबळी, शैलेश सावेकर, पुंडलिक येडूरकर, बापू हरणे आदी यावेळी उपस्थित होते.

फोटो क्लिक...

शहरामध्ये सर्वत्र पाणीपुरवठा योजनेची अवस्था दयनीय झाल्याने एकीकडे घरात पाणी नाही तर दुसरीकडे पाणीपुरवठा योजनेतील गळत्यांमुळे शहरातील रस्त्या-रस्त्यांवर, गल्ली बोळात पाणीच पाणी होताना दिसत आहे.


