रविवार दि.९ फेब्रुवारी २०२५


हत्तीने घेतले रामलिंग चे दर्शन…

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
आजरा – नेसरी मार्गावरील शिरसंगी- यमेकोंड दरम्यान असणाऱ्या रामलिंग मंदिराजवळ काल दुपारी हत्तीने दर्शन दिले.
मंदिराच्या मागील बाजूस असणाऱ्या डोंगरातून हत्ती खाली उतरून मंदिराजवळ थांबून तो रस्ता ओलांडून शेतातून निघून गेला.
हत्तीच्या या निवांत वावराचे दर्शन अनेक वाहनचालक व या मार्गावरील नागरिकांनी घेतले.

सर्व सामान्य मतदारांच्या सहकार्याने निवडणूकीतील चक्रव्यूह भेदला : ना.हसन मुश्रीफ
मडिलगे येथे नागरी सत्कार

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
या विधानसभा निवडणुकीत माझ्या विरोधातील चक्रव्यूह सामान्य मतदारांच्या सहकार्याने भेदला असे प्रतिपादन राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी केले . मडिलगे येथे आयोजित नागरी सत्कार सोहळ्यात बोलत होते .
स्वागत उपसरपंच सुशांत गुरव यांनी केले . प्रास्ताविकात सरपंच बापू निऊंगरे यांनी गावात झालेल्या विकास कामांची तसेच प्रलंबित कामांची माहिती दिली . गावात शाळा , सभागृह , पाणंद रस्ते डांबरीकरण, वाढीव गावठाणचा सी . टी . सर्व्हे करण्यासाठी प्रयत्न व्हावा . आमचं गाव कायम स्वरूपी दत्तक घ्यावे असे आवाहन सरपंच निऊंगरे यांनी केले.
यावेळी मंत्री मुश्रीफ म्हणाले , विधानसभा निवडणूकीत विरोधकांनी केलेल्या विषारी अपप्रचाराला जनता बळी पडली नाही . म्हणूनच मी आज तुमच्या समोर मंत्री म्हणून उभा आहे . विविध खात्याचे मंत्री म्हणून राज्यात केलेल्या कामाचा आढावा घेतला . आरोग्यसेवा , बांधकाम कामगार योजना या योजनांमधून दिल्या जाणाऱ्या लाभांची माहिती मंत्री मुश्रीफ यांनी दिली .
बांधकाम कामगार केंद्रांची संख्या वाढवून लोकांची गैरसोय दूर करू अशी ग्वाही त्यांनी दिली . आरोग्याची अपुरी कामे पूर्ण करण्यासाठी वैद्यकीय शिक्षण खात जाणीवपूर्वक मानून घेतले असल्याचे त्यांनी सांगितले . येत्या दोन वर्षात कोल्हापूर येथील शेंडा पार्कात ११०० बेडचे हॉस्पिटल उभारले जात आहे . उत्तूर येथे देशातील पहिले निसर्गोपचार व योगा महाविद्यालय मंजूर केले आहे . गोकुळचे म्हैस दूध वाढविण्यासाठी केलेल्या प्रयत्नांची माहिती दिली . कोणतीही योजना बंद होणार नाही कोणीही काळजी करू नये असे आवाहन त्यांनी केले . यानंतर मंत्री मुश्रीफ यांचा मडिलगे ग्रामस्थ, हनुमान संस्था समूह, भावेश्वरी संस्था समूह, आजी -माजी सैनिक संघटना, गणेशोत्सव मंडळ , ग्रामपंचायत यांच्यावतीने सत्कार करण्यात आला .
यावेळी युवराज येसणे , माजी सभापती दिपक देसाई , तालुका शेतकरी संघाचे नूतन चेअरमन महादेव पाटील (धामणेकर ) यांनी मनोगत व्यक्त केले . या कार्यक्रमाला आजरा कारखाना चेअरमन वसंतराव धुरे , जिल्हा बँकेचे संचालक सुधीर देसाई , विष्णूपंत केसरकर , मारुती घोरपडे , काशिनाथ तेली , के . व्ही . येसणे, भिकाजी गुरव , शिरिष देसाई , पांडूरंग जाधव , सुनील देसाई , ज्ञानदेव पोवार , युवक राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष अनिकेत कवळेकर , गणपतराव पाटील , सुनील देसाई यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते . शिवाजी पारळे यांनी सूत्रसंचलन केले . ग्रामपंचायत सदस्या मनिषा काणेकर यांनी आभार मानले .
महिलांच्या कॅन्सर बाबत आवश्यक ती उपाययोजना
जिल्हयातील एकाही महिलेचा कॅन्सरने मृत्यू होणार नाही.महिलांना होणारा कॅन्सर आणि त्यामुळे होणारे मृत्यू ही गंभीर बाब आहे.आगामी काळात जिल्ह्यातील एकाही महिलेचा कॅन्सरने मृत्यू होऊ नये यासाठी नवी मोहिम हाती घेऊन लसीकरण करणार आहे असेही ना. मुश्रीफ यांनी यावेळी स्पष्ट केले.

कावीळ प्रश्नी शिवसेना (उबाठा) आक्रमक

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
आजरा शहर व परिसरातील वाढत्या कावीळ रुग्णांच्या पार्श्वभूमीवर शिवसेना (उबाठा) आक्रमक झाली असून तातडीने उपाययोजना करण्याची मागणी आजरा तहसीलदारांकडे निवेदनाद्वारे केली आहे.
निवेदनात म्हटले आहे, गेले काही दिवस आजरा शहरासह आजुबाजुच्या खेड्यामध्ये कावीळ सदृष्य रुग्ण आढळून येत आहेत. कावीळ हा रोग दुषीत पाण्यामुळे होतो. आजरा शहरातील नवीन गटारी वाहून शहरातले सर्व सांडपाणी व इतर दुषीत पाणी हे नदीला सोडण्याचे काम नगरपंचायत करत आहे. यामुळे आपणास शहरासह इतर अनेक खेडेगावातील नळपाणी योजना चीत्री व हिरण्यकेशी नदीवर असणाऱ्या गावामध्ये सुध्दा अनेक रोग दुषीत पाण्यामुळे होऊ शकतात. पण अनेकदा विविध पक्ष, संघटनांनी निवेदन देवून देखील नगरपंचायत प्रशासन आरोग्य विभागाने त्याकडे दुर्लक्ष करत असल्याने आज शहरातील अनेक लोकांना कावीळ व अन्य रोगाची लागण झालेली आहे. त्यातच सध्या राज्यात जी.बी.एस या विषाणूचा संसर्ग होत आहे. तसेच ग्रामीण रुग्णालय आजरा येथे रुग्णांना दाखल करून घेतले जात नसल्याने सरळ सरळ गडहिंग्लजला जाण्याचा सल्ला काही डॉक्टर देत आहेत. त्यामुळे मनात भितीचे वातावरण आहे.
एवढ्या समस्या असून त्यावर मार्ग निघताना दिसत नाही कारण आजरा तालुक्याला पूर्ण वेळ तालुका आरोग्य अधिकारी नसलेने अनेक अडचणी निर्माण होत आहेत. आरोग्य मंत्र्याच्या मतदारसंघातच नगरपंचायतीच्या गलथान कारभारामुळे ही अवस्था असेल तर इतर ठिकाणी जनतेला न्याय देवुन जनतेच्या आरोग्याची काळजी सरकार घेणार काय ? हा प्रश्न पडतो म्हणून सर्व जबाबदार नगरपंचायत अधिकारी, आरोग्य विभाग अधिकारी यांची चौकशी व्हावी. अन्यथा शिवसेनेच्या वतीने जनआंदोलन करणेत येईल असा इशाराही देण्यात आला आहे.
यावेळी शिवसेना उपजिल्हाप्रमुख संभाजी पाटील, तालुका प्रमुख युवराज पोवार, आजरा कारखान्याचे संचालक हरिबा कांबळे , रवी सावंत, अमित गुरव आदी उपस्थित होते.
चार चाकी पलटी…

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
कोकणच्या दिशेने जाणारी चार चाकी (एम. एच.१२ बीके १०३०) आजरा- गडहिंग्लज मार्गावरील मडिलगे नजीक शनिवारी पहाटे साडेचार वाजण्याच्या सुमारास पलटी झाली.
रस्त्याशेजारील खांबाला धडकून सदर गाडी पलटी झाल्याचे सांगण्यात येते. सुदैवाने गाडीतील प्रवासी किरकोळ जखमी झाले. गाडीचे मात्र मोठे नुकसान झाले आहे.



निधन वार्ता
भिवा पाटील

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
भादवण ता. आजरा येथील भिवा गणू पाटील ( वय ६५ वर्षे) यांचे अल्पश: आजाराने निधन झाले.
त्यांच्या पश्चात पत्नी, विवाहित मुलगा, मुलगी, जावई, सुन, नातवंडे असा परिवार आहे.
रक्षा विसर्जन आज रविवारी सकाळी नऊ वाजता भादवण येथे आहे.

साईट : दत्त मंदिर समोर सोमवार पेठ आजरा संपर्क : ९५२७९७३९६९




