

आज-यात भाजपा कार्यकर्त्यांचा जल्लोष

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
भाजपाचे नरेंद्र मोदी यांनी देशाच्या पंतप्रधान पदाची सलग तिसऱ्यांदा शपथ घेताच आजरा शहरातील भाजपा कार्यकर्त्यांनी जोरदार आतषबाजी करत साखर- पेढे वाटून आनंद व्यक्त केला. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या समर्थनार्थ जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.

यावेळी भाजपा तालुकाध्यक्ष बाळ केसरकर, सुधीर कुंभार, आनंदा कुंभार, अरुण देसाई,नाथा देसाई, अभिजीत रांगणेकर,उमेश पारपोलकर, दयानंद भुसारी, विजय थोरवत, संतोष भाटले, भरत जाधव, जोसेफ लोबो, विनोद जाधव,सचिन इंदलकर, उदय चव्हाण, गौतम भोसले, शुभम पाटील, अवधूत मोरजकर यांच्यासह भाजपा कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

पाईपलाईन तोडफोड…
गुन्हा नोंद करण्याची मागणी

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
ग्रुप ग्रामपंचायत कानोली पैकी हारूर या गावी अज्ञात व्यक्तीकडून, आजरा -महागाव रोडवर धनगरवाडयाकडे जाणारी पिण्याच्या पाण्याच्या पाईप लाईनची अज्ञातांनी हत्यार व दगड घालून तोडफोड केली आहे,
तसेच हारूर गावातील व्हॉल्वची दगड घालून तोडफोड केली आहे.हे कृत्य मनात राग धरून अज्ञात व्यक्तीकडून केले आहे, तसेच यापूर्वी ही अज्ञात व्यक्तीकडून दोन वेळेला असे कृत्य केले आहे, शिवाय पाणी पुरवठा करण्यात येणाऱ्या, मोटर केबलची चोरी केली आहे. अज्ञात व्यक्तीकडून पुन्हा असाच प्रकार होण्याची शक्यता आहे.
या व्यक्तीचा शोध घेऊन गुन्हा दाखल करावा अशी मागणी ग्रा. पं. कडून पोलीस ठाण्याला करण्यात आहे.
याबाबतचे स्वतंत्र निवेदन देण्यात आले असून सरपंच सौ. सुषमा पाटील, उपसरपंच स्वप्निल आर्दाळकर, सदस्य, सुधीर पाटील, चंद्रकांत, पाटील, अनिल पाटील, सौ. दीपाली सुतार, शुभांगी पाटील, आरती देसाई,सारिका भोसले, माया लोहार व ग्रामसेवक संतोष कुंभार यावेळी उपस्थित होते.

झाडे तोडली…
लावणार कधी ?

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
संकेश्वर – बांदा राष्ट्रीय महामार्ग उभारणीच्या कारणास्तव व ठिकठिकाणी तालुक्यात विविध कारणांनी प्रचंड वृक्षतोड करण्यात आली आहे. एकीकडे वृक्षतोडीबद्दल सर्वत्र संवेदनशीलता असताना तालुक्यात प्रचंड प्रमाणात झालेल्या वृक्षांच्या कत्तलीमुळे तालुक्याचे नैसर्गिक सौंदर्य तर नष्ट होत आहेच पण भविष्यातील अनेक धोक्यांची सूचनाही मिळू लागली आहे.
वृक्षतोडीमध्ये आघाडी घेणाऱ्या आजरा तालुक्यामध्ये नवीन वृक्षांची लागवड होणार तरी कधी ? असा प्रश्न निसर्ग प्रेमी नागरिक विचारू लागले आहेत.
महामार्गाच्या कारणास्तव अनेक जुन्या व महाकाय वृक्षांची कत्तल करण्यात आली आहे. झालेली सर्वच वृक्षतोड गरजेची होती का ? असा या महामार्गाचा आराखडा पाहताना निश्चितच सवाल उपस्थित केला जाण्याजोगी परिस्थिती आहे.
सध्या पावसाळा सुरू झाला असल्याने तातडीने वनविभागासह ठिकठिकाणीच्या ग्रामपंचायती,शैक्षणिक संस्था, सामाजिक संस्था,तरुण मंडळे यांनी पुढाकार घेऊन जास्तीत जास्त वृक्षांची लागवड करण्याची गरज प्रकर्षाने जाणवू लागली आहे.



