





हत्तीच्या हल्ल्यात वनकर्मचारी ठार
घाटकरवाडी जंगलातील घटना

आजरा : प्रतिनिधी
हत्ती हूसकावण्यासाठी गेलेल्या वन कर्मचारी व ग्रामस्थांच्या समूहावर हत्तीने प्रती हल्ला केल्याने या हल्ल्यात वन कर्मचारी प्रकाश गोविंद पाटील (वय ५४) हे ठार झाले. घाटकरवाडी ( ता. आजरा ) येथील जंगलामध्ये सदर घटना घडली. गेले आठ दिवस घाटकरवाडी परिसरात धुमाकूळ घातलेल्या हत्तीला हूसकावण्याची मोहीम आज वनविभाग व ग्रामस्थांनी राबवली.सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास सदर मोहीम राबवत असताना ग्रामस्थ व वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी सुमारे ५० मीटर पर्यंत हत्तीला हुसकावून लावले होते. हत्ती पुढें ग्रामस्त पुढे गेला आहे असा समज करून ग्रामस्थ व वनविभागाचे कर्मचारी आणखी पुढे गेले असतानाच अचानक झुडपातून हत्ती परत माघारी फिरला व त्याने पाटील यांना सोंडेत धरून भिरकावले व पोटावर पाय दिला त्यानंतर अन्य ग्रामस्थांच्या पाठीमागे तो लागला. हत्ती मागे लागताच वन कर्मचारी व ग्रामस्थांनी तिथून पळ काढला. त्यानंतर हत्ती जंगलाच्या दिशेने निघून गेला. दरम्यान पाटील यांचा गंभीर जखमी झाल्याने मृत्यू झाला.
गेली दहा वर्षे हत्तीचा बंदोबस्त करण्याची मागणी ग्रामस्थांमधून होत असतानाच आज वन विभागाच्या कर्मचाऱ्यालाच मृत्यूला सामोरे जावे लागल्याने आता तरी हत्तीचा बंदोबस्त होणार का ? असा प्रश्न सर्वसामान्य उपस्थित केला जात आहे.
या घटनेमुळे वन विभागासह आजरा तालुकावासीयामध्ये घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे.प्रकाश पाटील हे आजरा अर्बन बँकेचे कर्मचारी सुयश पाटील यांचे वडील होत.







