वाघाच्या हल्यात बैल ठार

शुक्रवार दि. २९/९/२३ रोजी आवंडी क्र 3(आजरा) जि कोल्हापूर येथील श्री सोनू बाबू कोकरे हे रहिवाशी नेहमी प्रमाणे गुरे चरण्यासाठी जंगलात घेऊन गेले असता. दुपारी ३ वाजण्याच्या सुमारास गुरांच्या कळपांमधे..पट्टेरी वाघाने अचानक हल्ला केला. आणि बैलावर झडप घातली.अचानक झालेल्या हल्ल्याने जनावरे भेदरली व सैरावैरा पळत सुटली.वाघाने एका बैलावर झडप घातली. हे पळत जाणाऱ्या इतर दोन बैलांनी पाहिले त्याच क्षणी त्या दोन बैलांनी मिळून वाघावर हल्ला चढवला.. झालेल्या झटापटीत एक बैल मात्र ठार झाला. या घटनेमुळे आजरा तालुक्यातील जंगली भागातील वाघाचे अस्तित्व अधोरेखित झाले आहे

मंजूर… मंजूर…
सहकारी संस्थांच्या वार्षिक सभांचे नाटक संपले
(ज्योतिप्रसाद सावंत)

सप्टेंबर महिनाअखेर बरोबरच सहकारी संस्थांच्या वार्षिक सभांचे नाटक संपले.एखादी अपवादात्मक संस्था सोडली तर वार्षिक सभांच्या माध्यमातून संस्थांच्या कारभाऱ्यांनी नेमके काय साध्य केले, सभासदांना संस्थांच्या कारभाराबाबत कितपत माहिती मिळाली हा जरी संशोधनाचा विषय असला तरीही वार्षिक सभांचे नाटक संपल्याने अनेक संस्थांच्या कारभाऱ्यांचा जीव मात्र भांड्यात पडला आहे.
सहकारातील घटनेनुसार आर्थिक वर्ष संपताच संस्थेच्या कारभाराची माहिती सभासदांसमोर ठेवणे बंधनकारक आहे. याकरिता वार्षिक सर्वसाधारण सभांचे आयोजन केले जाते. या सभा सभासदांच्या दृष्टीने जिव्हाळ्याचा विषय असला तरी संचालक मंडळाच्या दृष्टीने डोकेदुखीचा विषय ठरतो. सभासदांना आपले गाऱ्हाणे मांडण्याचा हा एकमेव असा हक्काचा दिवस असतो.
पण अलीकडे सहकारी संस्थांच्या होणाऱ्या सभा या केवळ अल्पोपहार किंवा जेवणावळीपुरत्याच मर्यादित असल्याचे स्पष्ट होताना दिसते.
बैठक व्यवस्थेपासूनच फिल्डींग…
ज्या संस्थांच्या सभा वादग्रस्त होण्याची शक्यता आहे अशा संस्थांच्या सभांची सभासदांच्या बैठकीपासूनच ‘ फिल्डिंग ‘ लावली जाते. समोर संचालक मंडळांचे बगलबच्चे, समर्थक जेणेकरून सभासदाकडून एखादा अडचणीचा प्रश्न आलाच तर त्या सभासदाचा अडवणे अथवा त्याला दाबणे याकरीता ही फिल्डिंग लावली जाते.(सभा यशस्वी करण्याचा हा जबरदस्त फंडा आहे.)
विषय पत्रिकेकरीता पाच मिनिटे.. सत्कार हार तुऱ्यांकरीता तासभर
वास्तविक अशा सभांमध्ये वर्षभरातील आर्थिक व्यवहारांची माहिती होण्याकरता आर्थिक पत्रके ज्यामध्ये ताळेबंद,नफा तोटा पत्रके, तेरीज पत्रके, पुढील वर्षाचे अंदाजपत्रक, मागील सभेचे इतिवृत्त वाचन होणे गरजेचे असते. याकरीता केवळ दोन ते तीन मिनिटे दिली जातात. इतर वेळ हा सत्कार समारंभ व हारतुरे वाटपातच जातो. परंतु विषय पत्रिकेवरील विषय फक्त सांगितले जातात आणि या विषयांना मंजुरी घेतली जाते. (समर्थक सभासदांना पुढे करून)
सर्वत्र मंदीचे वातावरण…?
बहुतांशी सभांच्या अध्यक्षांकडून दरवर्षी संस्थेसमोर अनंत अडचणी व आजूबाजूला असणारी मंदीची परिस्थिती संस्थांची प्रगती रोखण्यास कारणीभूत असल्याचे ठासून सांगितले जाते. या सर्व अडचणी केवळ वार्षिक सभेच्या अध्यक्षांच्या भाषणातच दिसतात.( संचालकांची चैनी मात्र सुरूच असते)
सभेपेक्षा अल्पोपहार महत्त्वाचा…?
सभेला येणा-या बहुतांशी सभासदांना सभेपेक्षाही सभेमध्ये वाटल्या जाणाऱ्या अल्पोपहारामध्ये रस असल्याचे जाणवते. त्यामुळे एकीकडे सभा सुरू असताना दुसरीकडे जास्तीत जास्त अल्पोपहार पदरात पाडून घेण्यासाठी असे सभासद प्रयत्नशील असलेले दिसतात.(अर्थात यामुळेच तर सभा यशस्वी होतात.)
समर्थकांकडून संचालक मंडळाचे कौतुक…
संचालक मंडळांच्या समर्थकांकडून विविध कारणे सांगून संस्थेचा कारभार अतिशय चांगला आहे असे सांगत चक्क संचालक मंडळाचे कौतुक वार्षिक सर्वसाधारण सभेत केले जाते. काही वेळा तर प्रमुख कारभा-यांचा शाल, श्रीफळ, हार-तुरे देऊन सत्कारही केला जातो. (भलेही संस्था डबघाईला चालली असली तरीही)
सभेमध्ये कोरोना अजूनही आहेच…
ज्या सहकारी आर्थिक संस्थांची परिस्थिती समाधानकारक नाही अशा संस्थांच्या सभा मधून कारभाऱ्यांकडून कोरोनाचे कारण आजही पुढे केले जात आहे. आणखी किती दिवस संस्थांना कोरोना अडचणीचा ठरणार? असा प्रश्न आता उपस्थित होत आहे. (अलीकडे रशिया युक्रेन युद्धाचा परिणामही अनेक संस्थांवर झाल्याचे सभांमधून सांगितले जाते)
मंजूर… मंजूर..
पण नेमके काय मंजूर ?
सभेमध्ये विषय कोणता सुरू आहे याची कल्पना बसलेल्या सभासदांना गोंधळामुळे येतच नाही. अशातच एखाद्या प्रमुख अधिकाऱ्यांकडून अथवा कारभाऱ्याकडून मंजूर आहे का ? एवढाच सवाल केला जातो. आणि सभासद ही विषयाची काहीही कल्पना नसताना मंजूर… मंजूर… चा नारा लगावताना दिसतात.(आपण नेमकी कशाला मंजुरी दिली हे बऱ्याच सभासदांना शेवटपर्यंत कळत नाही.)
ठराविक मंडळींकडूनच प्रश्न…
विविध सहकारी संस्थांच्या वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये सभासदांकडून प्रश्न उपस्थित करणारी ठराविक मंडळीच असतात. हे प्रश्न संचालक मंडळाला अडचणीत आणण्याकरता आहेत की संचालक मंडळाचे कौतुक करणारे आहेत याबाबत संभ्रमावस्था निर्माण होण्याची परिस्थिती अनेकदा दिसते.(यातील बहुतांशी सभासद हे संचालकांचे समर्थकच असतात.)
काही का असेना यावर्षीच्या सहकारी संस्थांच्या वार्षिक सर्वसाधारण सभांचे सोपस्कार पूर्ण करण्यात आले हे महत्वाचे…

आजऱ्यात पावसाचा जोर कायम…
आजरा शहर व परिसरात पावसाचा जोर कायम आहे. शनिवारी दिवसभर पावसाच्या सरी कोसळत होत्या तर रविवारी सकाळपासूनच पावसाने हजेरी लावली आहे.
आजरा महाविद्यालय आजरा येथे ‘बांबू.. शाश्वत विकासाचे साधन ‘ याविषयावर एकदिवशीय कार्यशाळा संपन्न.

आजरा महाविद्यालय आजरा येथे ‘अण्णाभाऊ स्मृती पंधरवडा ‘ अंतर्गत
जागतिक बांबू दिवसाचे निमित्त साधून पर्यावरणशास्त्र, भूगोल, वनस्पतीशास्त्र विभाग व पृथ्वी ग्रीन क्लब तसेच हिरण्यकेची बांबू शेतकरी ग्रामविकास गट परनोली, आजरा बांबू क्लस्टर, अश्वघोष बांबू रोपवाटिका आणि अश्वघोष बांबू स्टुडिओ यांच्या संयुक्त विद्यमाने
१८ सप्टेंबर ह्या जागतिक बांबू दिवसाचे औचित्य साधून एक दिवशीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.
याप्रसंगी बांबूतज्ञ मा. सतीश कांबळे यांनी
बांबूचे धार्मिक व सांस्कृतिक महत्त्व सांगताना देव देवता मधील प्रभू रामचंद्रांचे शस्त्र धनुष्य, श्री कृष्णाची बासुरी, बांबूपासून बनले होते, शेतकऱ्यांचे शेती उपकरणे व अवजारे, क्षत्रियांचे व मावळ्यांचे शस्त्रे भाले, धनुष्य व बाण, तसेच बांधकाम क्षेत्रात, घरगुती वापरातील विविध वस्तू, फर्निचर,खेळणी, शोभिवंत वस्तू, घरे, पुल,गाडी,वाहने व जहाज बांधणी करण्यासाठी बांबूचाच मोठ्या प्रमाणात वापर केला जातो. बांबूपासून लोणचे,भाजी,बिस्कीट, पीठ,पावडर,पेस्ट, कोळसा,क्रीम,आदी उपपदार्थ बनवले जातात. विद्यार्थी पासून गृहणी पर्यंत बांबू उत्पादन पासून स्वयंरोजगारातून आर्थिकदृष्ट्या स्वयंपूर्णतेकडे वाटचाल करता येते. बांबू हस्तशिल्पकला, बांबूचे दागिने,राखी, दिवे, कंदील, विद्युत रोषणाईमाळ,आदी प्रशिक्षण व उत्पादनातून आर्थिक प्रगती साधता येते.
राष्ट्रीयबांबू अभियान अंतर्गत अनुदान व सबसिडी दिले जाते. तसेच नगदी ऊस पिका पेक्षा जास्त उत्पादन व फायदेशीर बांबू शेती आहे.
बांबूचे मुल्यवर्धन करण गरजेचे आहे. बांबू नैसर्गिक आर्थिक संसाधन महत्वाचा शाश्वत उपयोगी स्त्रोत आहे.पर्यावरणीय बदल व प्रदूषण रोखण्याचे काम बांबू करू शकतो असे मत व्यक्त केले.
तसेच बांबू शेती करणारे प्रगतशील शेतकरी वसंतराव तारळेकर यांनी आपल्या अनुभवातून कमी पाण्यावर, माळरानावर खात्रीशीर उत्पन्न देणारे पीक आहे. बांबू पर्यावरणातील सर्व घटकांचे संतुलन राखण्यास मदत करतो. युवकांनी बांबू शेतीकडे वळले पाहिजे, भविष्यात बांबू शेतीला खुप महत्व प्राप्त होईल.सर्वांनी आजूबाजूला, पडीक जमिनीवर,शेती मध्ये, बांधावर, नदी नाले ओढे यांच्या बाजूला बांबू लागवड करावी. असे मत आपल्या मनोगतातून व्यक्त केले.
कार्यक्रमाचे अध्यक्ष मा प्राचार्य डॉ.अशोक सादळे म्हणाले की विद्यार्थ्यांनी बांबू शेती,बांबू उत्पादन व बांबू उद्योग,बांबू वर संशोधन केले पाहिजे, तसेच बांबू संशोधन क्षेत्राकडे भविष्यात करियरच्या भरपूर संधी आहेत. बांबू चळवळीत विद्यार्थ्यानी सहभागी व्हावे असे आवाहन अध्यक्षीय मनोगतातून केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना आजरा बांबू क्लस्टर चे रणजित कालेकर यांनी २००९ पासून २८ सप्टेंबर हा जागतिक बांबू दिवस जगभर साजरा केला जातो. बांबू हा संस्कृती आणि समृद्धीचा अविभाज्य घटक आहे. धार्मिक समारंभ कला आणि संगीतमध्ये महत्वाचा भाग आहे. बांबू ही जगाला व पर्यावरणाला वाचवू शकणारी वनस्पती आहे. मानवी जीवन समृध्द करण्यामध्ये बांबू क्रांती करेल.आजरा हा भाग बांबू लागवड व उत्पादन साठी पोषक आहे. आजरा भागात बांबूच्या अनेक प्रजाती आढळतात.आजरा बांबू मेसकाठी चे उत्पादन व विक्री मोठ्या प्रमाणात होते. दरवर्षी आजरा तालुक्यात बांबूचे कोट्यवधी रुपयांमध्ये उलाढाल होत असते. आर्थिकदृ्ट्या बांबू खुप महत्वाचा आहे.आजरा भागातील बांबू दर्जेदार असून देशभर व जागतिक पातळीवर खुप मागणी आहे. आजरा भागात बांबूचा ट्रीटमेंट प्लॅट तयार करण्याची गरज आहे.असे मत व्यक्त केले.
प्रा.मल्लिकार्जून शिंत्रे यांनी मान्यवरांचे स्वागत व वक्त्यांचे परिचय करून दिला प्रा.डॉ रणजित पवार यांनी सूत्रसंचालन केले.प्रा.डॉ राजीव करपे यांनी आभार मानले .या कार्यक्रमा प्रसंगी प्राचार्य डॉ.अशोक सादळे. उपप्राचार्य प्रा.दिलीप संकपाळ, कार्यालयीन अधीक्षक योगेश पाटील,मिशन ऑरगॅनिक चे संस्थापक अध्यक्ष मा. राहुल टोपले, बांबू उत्पादक शेतकरी प्रा.डॉ.धनंजय पाटील, प्रा.डॉ. तानाजी कावळे, प्रा.डॉ.अविनाश वर्धन,
प्रा.अनुराधा गोटखिंडे, महाविद्यालयातील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
आज शहरात…
ह.भ.प.पू. लक्ष्मणबुवा मोरजकर महाराज यांच्या सप्ताहानिमित्त दिंडी सोहळा…
पाऊस पाणी…
आजरा शहर व परिसरात गेल्या २४ तासात २४ मिलिमीटर इतक्या पावसाची नोंद झाली आहे.


