वझरे येथील तरुणाचा संशयास्पद मृत्यू…?
मृत्यूच्या चौकशीची पोलिसांकडे कुटुंबीयांची मागणी

वझरे ता. आजरा येथील संदीप मारुती लोखंडे या ३५ वर्षीय तरुणाचा कोल्हापूर येथे संशयास्पद मृत्यू झाल्याचा आरोप करीत संदीप याच्या कुटुंबीयांनी त्याच्या मृत्यूच्या चौकशीची मागणी केली आहे.
संदीप हा शिरोली(पुलाची)येथील एका हॉटेलमध्ये कामाला होता. आठवडाभरापूर्वी तो वझरे येथे घरी आला होता. अचानकपणे मालकाने त्याला कामावर बोलावून घेतले. कामावर गेल्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी त्याचा मृत्यू झाला. संदीप याचा मृत्यू हा नैसर्गिक नसून घातपाताचा प्रकार असल्याचा भाऊ सागर व त्याच्या कुटुंबीयांनी आरोप करत संदीपच्या मृत्यूच्या चौकशीची मागणी केली आहे.
या प्रकरणाची योग्य चौकशी होऊन संबंधितांवर कारवाई न झाल्यास लोखंडे कुटुंबीयांनी आत्मदहनाचा इशारा निवेदनाद्वारे दिला आहे.
………………………………………….
वाढीव पेन्शन साठी ‘सर्व श्रमिक’ चे निवेदन

शासनाने वाढीव पेन्शन योजना लागू करावी यासाठी संपूर्ण राज्यातील तहसीलदार यांना स्वातंत्र्य दिन १५ ऑगस्ट २०२३ रोजी झेंडा वंदन ला उपस्थित राहून वाढीव पेन्शन लागू करावी या मागणीचे आजरा येथे सर्व श्रमिक संघटना व गिरणी कामगार संघटनाच्या वतीने आजरा तहसीलदार याना निवेदन देण्यात आले.
वाढीव पेन्शन योजना लागू करावी व किमान पेन्शन रू. ९०००/- द्यावी. महागाई भत्ता वाढ करावी. सर्वांना रेशन व प्रवास दरात सवलत,सर्व वैद्यकिय सुविधा मोफत द्या. पेन्शन फंडाचे खाजगीकरण रद्द करा अशा मागण्यांचे निवेदन तहसीलदार यांना दिले.
या वेळी काॅ.शांताराम पाटील यांनी
केंद्र शासनाने आश्वासनांचा पलिकडे काहीच दिले नाही राबणार्या कष्टकरी कामगारांना वाढीव पेन्शन योजना लागू करावी अन्यथा देशातील पंचाहत्तर लाख संघटीत कामगार प्रस्थापित शासनाला मतदान करणार नाहीत असा इशारा दिला.
काॅ. संजय घाटगे यांनी देशातील कामगार स्वतः अस्तित्त्वासाठी जागृत नाही. परंतू श्रमिक संघटना गिरणी कामगारांच्या वतीने
देशात पेन्शन योजना लागू करावी यासाठी आंदोलन केले , गिरणीकामगार देश स्वातंत्र्य पासून रस्त्यावर लढाई करण्यात आघाडीवर आहेत हाच मोठा आशेचा किरण असले चे मत व्यक्त केले. यावेळी नारायण भंडागे यांनी गिरणी कामगार मंबईत घरे घेण्यासाठी व पेन्शन योजनेसाठी आजरा तालूका आघाडीवर आहे. यावेळी शांताराम हरेर , हुसेन दरवाजकर, मनप्पा बोलके, विठोबा बोलके, नंदा वाकर, सुरेखा बागवे, अनिता बागवे, सोनाली तेजम, गोपाळ कातकर ,मारूती इंगळे, निवृत्ती पाटील, तुकाराम कवीटकर, लक्ष्मण पंडित याच्यासह पेन्शर उपस्थित होते .आभार बंडू कांबळे यांनी मांडले.
………………………………………………
आर्यन वंजारे याचे यश

आजरा येथील आर्यन सुधाकर वंजारे या विद्यार्थ्याला एम.बी.बी.एस. करिता सोलापूर येथे प्रवेश मिळाल्याबद्दल त्याचे सर्वत्र कौतुक होत आहे. आजरा चर्मकार समाजामार्फत या यशाबद्दल गोपाळ जाधव यांच्या हस्ते विशेष सत्कार करण्यात आला. यावेळी विष्णू जाधव, जीवन शेवाळे, किरण चव्हाण, अशोक वंजारे, सुधाकर वंजारे, दत्तू वंजारे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.
……………………………………………………


