आजरा साखर कारखान्याच्या बेरिंग्ज चोरी प्रकरणाचा छडा लागणार कधी….?
ऐन निवडणूक तोंडावर सदर प्रकरणाची पुन्हा चर्चा सुरु….

ज्योतिप्रसाद सावंत
आजरा साखर कारखान्याच्या सुमारे २५ लाख रुपये किमतीच्या बेरिंग्जसह अनेक छोट्या-मोठ्या साहित्यावर कारखाना बंद कालावधीत मारलेल्या डल्ल्याची चर्चा गेल्या वर्षभरापासून कारखाना सभासद व कर्मचारी वर्तुळात सुरू आहे. कारखान्याचा चालू गळीत हंगाम संपला तरी याबाबत अद्याप कांहीही निष्पन्न झालेले नाही. असे असताना एकीकडे पोलीस प्रशासनाची चौकशी तर दुसरीकडे कारखाना व्यवस्थापनाकडून नेमलेल्या चौकशी समितीच्या माध्यमातून माहिती घेतली जात असताना यातून नेमके काय निष्पन्न झाले ? याचा उलगडा होणे आवश्यक आहे अन्यथा हे प्रकरण सत्ताधारी संचालकांना येत्या निवडणुकीत जड जाण्याची शक्यता नाकारता येत नाही.
आर्थिक अडचणीमुळे साखर कारखाना बंद झाल्यानंतर बहुतांशी कर्मचाऱ्यांना लेआॅफ देण्यात आला. कांही मोजके कर्मचारी व सुरक्षा विभागाचे अधिकारी, कर्मचारी कारखाना आवारात वावरत होते. याच कालावधीत कारखान्याच्या स्क्रॅपचीही विक्री झाली होती.दरम्यान कर्ज थकबाकीच्या कारणास्तव जिल्हा बँकेने कारखाना ताब्यात घेतला. पुन्हा या कर्ज प्रकरणावर तोडगा निघाल्यानंतर कारखाना सहकारी तत्त्वावर चालवण्याच्या उद्देशाने ताब्यात घेण्याची प्रक्रिया पार पडली. यावेळी कारखान्यातील
बेरिंग्ज सह काही छोटी-मोठी यंत्रसामग्री गायब असल्याचे लक्षात आले. तातडीने कारखान्याकडून आजरा पोलीस स्टेशनकडे या बाबत तक्रारही नोंदवण्यात आली. सध्याचा गळीत हंगाम संपून महिनाभराचा कालावधी उलटून गेला तरी अद्याप या प्रकरणा बाबत पुढे काहीही समजू शकलेले नाही. यामुळे सभासद वर्गामध्ये संभ्रमावस्था आहे.
एकीकडे या प्रकरणाचा छडा लागला नाही असे दिसत असले तरी दुसरीकडे कारखान्यातीलच कांही कर्मचाऱ्यांनी संगनमताने सदर प्रकार घडवून आणला असल्याचीही चर्चा जोर धरत आहे. यामुळे कारखान्याचा कहीं प्रामाणिक कर्मचारी व अधिकारी वर्गही नाहक संशयाच्या भोवऱ्यात असून अधिकारी व कर्मचारी वर्गाकडून या प्रकरणाचा छडा तातडीने लावा व संबंधितांवर कारवाई करा अशी मागणी केली जात आहे. कारखाना प्रशासनाने चौकशी समिती नेमून अहवाल मागवला आहे. या अहवालात काही प्रमुख संचालकांशी संबंधित कर्मचारी वर्गाची ,संशयितांमध्ये नावे असल्याचे खात्रीलायक वृत्त आहे.
यामुळे कारखाना प्रशासन याबाबत नेमकी कोणती भूमिका घेणार ? याकडेही सभासद वर्गाचे लक्ष लागून आहे.
कोणाचीही गय केली जाणार नाही :अध्यक्ष प्रा. सुनील शिंत्रे
कारखान्याच्या या चोरी प्रकरणांमध्ये जे कोणी संशयित अथवा सहभागी म्हणून निष्पन्न होतील त्यांची कोणत्याही प्रकारची केली जाणार नाही संबंधितांवर निश्चितच कारवाई होईल,अशी प्रतिक्रिया कारखान्याचे अध्यक्ष प्रा. सुनील शिंत्रे यांनी दिली.
कारखान्यातून अत्यंत अवजड अशा बेरिंग्ज चोरीला गेल्या
कशा ?
ज्यावेळी कारखान्याच्या बेरिंग्ज चोरीला गेल्या त्यावेळी कारखान्याचे तत्कालीन सुरक्षा अधिकारी व कर्मचारी नेमके काय करत होते ? असा प्रश्नही आता उपस्थित केला जात आहे.
भंगार वस्तूंमधून झाली असावी वाहतूक…
एकीकडे कारखाना कर्मचारी व अधिकाऱ्यांवर संशयाची सुई असताना दुसरीकडे या कालावधीत वाहतूक करण्यात आलेल्या स्क्रॅप मटेरियल मधूनच सदर बेरिंग वाहतूक करण्यात आल्या असल्याची शक्यता पडताळून पाहिली जात आहे.एकंदर कारखान्यातील बेरिंग्ज चोरी प्रकरणाची पुन्हा वर्षभराने जोरदार चर्चा सुरू झाली आहे .
पुन्हा एक वेळ मोटरची चोरी…
आजरा साखर कारखान्याच्या आवारातून नुकतीच एका ५ हॉर्स पावरची मोटर चोरीला गेल्याचे समजते.कारखान्याला लागलेल्या या चोरी प्रकरणाचे ग्रहण थांबणार कधी ? असा प्रश्न आता उपस्थित होत आहे.
एकाचा मृत्यू …
बेरिंग चोरी प्रकरणात नेमण्यात आलेल्या चौकशी समितीने संबंधितांना चौकशीसाठी नोटिसा दिल्यान्तर एकाचा हृदयविकाराने मृत्यू झाला असल्याचीही चर्चा कारखाना कर्मचाऱ्यांत गेले चार महिने आहे.








