mrityunjaymahanews
अन्य

सातच्या बातम्या

बुधवार १५ एप्रिल २०२६

हिंदुत्वाच्या जयघोषाने दुमदुमली आजरा नगरी…
हिंदू संमेलन उत्साहात


आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

आजरा येथील श्री शिवतीर्थ परिसरात सकल हिंदू समाज,आजरा यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या ‘विराट हिंदू संमेलना’त शेकडो हिंदू बांधवांनी सहभाग नोंदवला.

“एकता आणि धर्मरक्षण” या मुख्य उद्देशाने आयोजित या संमेलनाची सुरुवात भव्य शोभायात्रेने व्यंकटराव हायस्कूल पासून झाली.

पारंपारिक वेशभूषेतील बालचमु, वारकरी सांप्रदाय, ब्रम्हकुमरिज यांचा लक्ष्मी- नारायण रथ, लेझिम पथक हे या यात्रेचे मुख्य आकर्षण होते. कार्यक्रमापू्वी श्री शिवतीर्थ,आजरा येथील अश्वारूढ मूर्तीस श्री महंत सिद्धेश्वर स्वामीजी, नुल ता.गडहिंग्लज येथील रामनाथगिरी मठाचे श्री भगवानगीरी महाराज, रा.स्व. संघाचे प्रचारक युवराजजी कुलकर्णी, व योगी संतोष ऊर्फ बाळ महाराज यांच्या हस्ते अभिवादन करण्यात आले.दरम्यान सव्यसाची गुरुकुलम् वेंगरुळ च्या कोदंडधारी युद्धकला प्रशिक्षण वर्ग यांच्यातर्फे युद्धकलेचे प्रात्यक्षिक झाले.कार्यक्रमाच्या सुरुवातीला मान्यवरांच्या हस्ते गोमातेचे पूजन झाले.त्यानंतर भारतमाता प्रतिमापूजन आणि शिवरायांचे मूर्ती पूजन झाले

 बेलबाग आश्रमचे श्री सिद्धेश्वर स्वामी यांनी मराठी आणि कन्नड या दोन्ही भाषेमधून धार्मिक आशीर्वचन केले स्वामीजी म्हणाले, “कितीतरी परकीय आक्रमणानंतरही आपला देश हा अभिमानानं उभा आहे. हिंदू समाज हा सहिष्णू आहे, परंतु स्वधर्माच्या रक्षणासाठी संघटित होणे ही काळाची गरज आहे. जात-पात विसरून आपण केवळ ‘हिंदू’ म्हणून एकत्र यायला हवे.”त्यानंतर रा. स्व. संघाचा इतिहास आणि संघाची कार्यपद्धती याच्यावर विस्तृत भाषण युवराज कुलकर्णी यांनी केले
पर्यावरण ,कुटुंब प्रबोधन,स्वबोध,नागरी कर्तव्य आणि सामाजिक समरसता या पंच परिवर्तनावर मुद्द्यांवरही त्यांनी प्रकाश टाकला.

त्यानंतर नुल येथील रामनाथगिरी मठाचे भगवानगिरी महाराजांनी आपल्या संत परंपरेचा आढावा घेतला. उपस्थित सर्व हिंदूंचे आणि एकूणच कार्यक्रम आयोजित करणाऱ्या स्वयंसेवकांचेही कौतुक केले.

मुख्य वक्ते बाळ महाराज, इचलकरंजी यांनी बोलत असताना हिंदू म्हणून आता आपल्याला अधिक डोळसपणे जगाव लागेल. यापूर्वी फार विश्वासाने आपण समोरच्यावर विसंबुन राहत होतो असं न करता आता पदोपदी सावधानतेने जगावे लागेल अशा पद्धतीचा विचार उदाहरणांच्या सहित उपस्थितांना सांगितला. अभिषेक रोडगी यांनी आभार व्यक्त केले

यावेळी सकल हिंदू समाज आजराचे रमेश सुतार, ललित कांबळे, जांभळे गुरुजी, तानाजी बुरुड, नागराज रायकर यांसह वीविध हिंदुत्ववादी संघटना, सर्व तरुण मंडळे, ब्रम्हाकुमारिज चे भाई व बेहेनजी तसेच,हिंदू बंधू-भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

महामानवास अभिवादन

आजरा शहरासह तालुक्यामध्ये ठीक ठिकाणी महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना आदरांजली वाहण्यात आली. मिरवणुकांसह विविध कार्यक्रमांचे आयोजन ही करण्यात आले होते. आजरा शहरामध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेची मिरवणूक काढण्यात आली. मिरवणुकीमध्ये नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

जय भीम तरुण मंडळ आजरा

जय भीम तरुण मंडळ आजराच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. मान्यवरांच्या उपस्थितीत प्रतिमा पूजन करून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मृतींना उजाळा देण्यात आला

यावेळी नगराध्यक्ष अशोकअण्णा चराटी, नगरसेविका डॉ .स्मिता कुंभार, आसावरी खेडेकर, नगरसेवक निसार लाडजी, डॉ .इंद्रजीत देसाई, परशुराम बामणे, इंजिनिअर विजयकुमार पाटील, सिद्धेश नाईक, अनिरुद्ध केसरकर, विजय थोरवत, संतोष भाटले, गौरव देशपांडे, सुनील देसाई , दिनकर जाधव ,मिनीन बारदेसकर ,सचिन कांबळे, नितीन यादव, अभिजीत शिंदे, सुभाष कांबळे, दीपक कांबळे, अक्षय माळी यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.

व्यंकटराव शिक्षण संकुल


येथील व्यंकटराव शिक्षण संकुलामध्ये भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती अत्यंत उत्साहात आणि चैतन्यमय वातावरणात साजरी करण्यात आली.​कार्यक्रमाच्या प्रारंभी संस्थेचे उपाध्यक्ष श्री. कृष्णा पटेकर साहेब यांच्या हस्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले. यावेळी महामानवाच्या कार्याचा जयघोष करण्यात आला.

​याप्रसंगी संस्थेचे संचालक श्री. पांडुरंग जाधव, श्री. सचिन (भैय्या) शिंपी, श्री. सुधीर जाधव यांची प्रमुख उपस्थिती होती. तसेच प्राचार्य श्री. एम. एम. नागुर्डेकर, ज्युनिअर विभाग प्रमुख श्री. एम. ए. पाटील, सीनियर कॉलेजचे प्रभारी प्राचार्य श्री. पन्हाळकर यांच्यासह सर्व शिक्षक, शिक्षिका आणि शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

श्री. डी. आर. पाटील यांनी आपल्या ओघवत्या वक्तृत्व शैलीतून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा संपूर्ण जीवनपट उपस्थितांसमोर मांडला. बाबासाहेबांचे शिक्षण, त्यांनी केलेला संघर्ष आणि राष्ट्रासाठी दिलेले योगदान यावर त्यांनी प्रकाश टाकला.

आजरा हायस्कूल आजरा


आजरा हायस्कूल आजरामध्ये भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३५ वी जयंती उत्साहात संपन्न झाली. डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन मुख्याध्यापक श्री. ए.एल. तोडकर, उपमुख्याध्यापक सौ. एच. एस. कामत यांच्या हस्ते करण्यात आले.

शिक्षक मनोगतामध्ये सौ. एम. एस.कांबळे यांनी १४ एप्रिल ही फक्त एक तारीख नसून ती एका युगाची सुरुवात आहे, एका विचाराची एका क्रांतीची आणि एका अशा व्यक्तीची ज्याने हजारो वर्षांचा अंधार काढून प्रकाश दिला अशा मानवाचा जन्म दिवस आहे असे सांगितले. तसेच डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचा जीवनपट, राष्ट्रकार्य यांचा आढावा विद्यार्थ्यांसमोर मांडला. विद्वत्ता आणि क्रांती चे दुसरे नाव म्हणजे डॉ. बाबासाहेब आंबेडकर होय तसेच शिक्षण हेच एक असे शस्त्र आहे ज्यामुळे जग बदलता येते असे सांगितले . २०१७ पासून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा जन्मदिवस ‘ज्ञान दिन’ म्हणून देखील साजरा केला जातो. ते केवळ समाज सुधारक आणि राजकारणी नव्हते तर ते एक निष्णात कायदे पंडित व दूरदृष्टीचे नेते होते असे देखील सांगितले.

त्याचबरोबर ज्येष्ठ शिक्षक श्री.के.के.कांबळे यांनी मानवता हाच खरा धर्म आहे. भारतीय संविधानाच्या निर्मितीमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे योगदान अनमोल आणि अद्वितीय आहे त्यांना भारतीय संविधानाचे शिल्पकार म्हणून ओळखले जाते.संविधानाने जातीय विषमता दूर झालेली आहे हे असे आपल्या मनोगत मध्ये सांगितले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार सौ. विद्या हरेर यांनी केले. तसेच कार्यक्रमासाठी श्री.एस. जी. नाईक,सौ भाग्यश्री पाटील,सौ. संजीवनी कुराडे,सौ.माधवी शेलार, श्री बाबासाहेब सुतार, विद्यार्थी व विद्यार्थिनी उपस्थित होते.

पं.दिनदयाळ विद्यालय


डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती पंडित दीनदयाळ विद्यालयामध्ये उत्साहात संपन्न झाली .

विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री .संजीव देसाई यांच्या शुभहस्ते प्रतिमा पूजन करण्यात आले .यावेळी विद्यालयातील सर्व शिक्षक ,शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते .डॉ.बाबासाहेबांचा तरुणांना संदेश आजही अत्यंत प्रभावशील ठरतो .भारताचे भविष्य हे येथील तरुणांच्या हाती आहे. सक्षमीकरणाचे सर्वात शक्तिशाली साधन म्हणून त्यानी तरुणांना शिक्षणावर लक्ष केंद्रित करण्याचे आवाहन केले. त्यांच्या मते ज्ञानामुळे केवळ आत्मविश्वासच मिळत नाही, तर व्यक्तीला अन्याय आणि विषमतेला आव्हान देण्यास ही मदत होते. यश संपादन करण्यासाठी त्यांनी कठोर परिश्रम शिस्त आणि स्वाभिमान या मूल्यांचा स्वीकार करावा असे सांगितले आहे. समाजातील प्रत्येक नागरिकाने आपली जबाबदारी ओळखावी यासाठी बाबासाहेबांनी नागरिकांनाही आवाहन केले आहे असे यावेळी मान्यवरांनी सांगितले.

कार्यक्रम प्रसंगी शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.

ग्रामपंचायत व मिलिंद नगर स्पोर्ट्स असोसिएशन उत्तूर

उत्तूर : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंतीनिमित्त ग्रामपंचायत तसेच मिलिंदनगर स्पोर्ट्स असोसिएशनच्या वतीने अभिवादन व विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले.

ग्रामपंचायत कार्यालयात सरपंच किरण आमणगी यांच्या हस्ते बाबासाहेबांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी उपसरपंच सुनिता हत्तीरगी, सदस्य सविता सावंत, सुनिता घोडके, संदेश रायकर, संभाजी कुराडे, महेश करंबळी, संजय उत्तूरकर तसेच ग्रामविकास अधिकारी प्रकाश पाटील, संजय गुरव, सचिन फाळके आदी उपस्थित होते.

मिलिंदनगर स्पोर्ट्स असोसिएशनतर्फे आयोजित कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्री. शिरीष देसाई होते. त्यांच्या हस्ते प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावेळी वसंतराव धुरे, किरण आमणगी, उपसरपंच सविता हत्तीरगी, कामत सर, व्ही. एस. कांबळे आदी उपस्थित होते. मुमेवाडी येथील ऋषिकेश घाटगे यांची पीएसआय पदी निवड झाल्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला. संस्थेचे अध्यक्ष अनिल हुले यांनी स्वागत केले.

दरम्यान, १३ एप्रिल रोजी आंबेडकर जयंतीनिमित्त आयोजित नेत्र तपासणी शिबिरात ९१ जणांची तपासणी करण्यात आली. त्यापैकी १० जणांना मोतीबिंदू आढळून आले, तर २० जणांना चष्म्याचा नंबर देण्यात आला. या शिबिरासाठी अंकुर हॉस्पिटल व डॉक्टर अग्रवाल आय हॉस्पिटल, गडहिंग्लज यांचे सहकार्य लाभले. १३ एप्रिल रोजी आंबेडकर जयंतीनिमित्त आयोजित नेत्र तपासणी शिबिरात ९१ जणांची तपासणी करण्यात आली. त्यापैकी १० जणांना मोतीबिंदू आढळून आले, तर २० जणांना चष्म्याचा नंबर देण्यात आला. या शिबिरासाठी अंकुर हॉस्पिटल व डॉ. अग्रवाल आय हॉस्पिटल, गडहिंग्लज यांचे सहकार्य लाभले.
कार्यक्रमात सौरभ वांजोळे यांचे भाषण झाले. सूत्रसंचालन रूपाली कांबळे  यांनी केले, तर आभार कांबळे यांनी मानले.

गादी बनवण्यासाठी आले.‌‌..
अडीच लाख घेऊन गेले

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

मडिलगे ता. आजरा येथे गादी बनवण्यासाठी आलेल्या दोन अज्ञात व्यक्तींनी मारुती अण्णा प्पा येसणे (रा. आंबेडकर गल्ली, मडीलगे) यांची घरातील गादीखाली ठेवलेली अडीच लाख रुपये इतकी रोकड संगनमताने लंपास केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी मारुती येसणे यांनी पोलिसात धाव घेतली आहे.

याप्रकरणी पोलिसातून मिळालेली माहिती अशी…

येसणे यांच्या घरी दोन अनोळखी व्यक्ती गादी तयार करण्याकरता आले होते. येसणे यांनी त्यांना गादी बनवण्यास दिली. गादीखाली काजू बिया खरेदी करण्यासाठी अडीच लाख रुपये इतकी रक्कम ठेवली होती. संबंधित गादी बनवण्यासाठी आलेल्या दोघांनी संगनमताने सदर रक्कम घेऊन पोबारा केला.

येसणे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून आजरा पोलिसात अज्ञातांविरोधात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक युवराज धोंडे करीत आहेत.

चोरटे सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद …?

या प्रकरणातील संशयित येथील एका स्थानिक सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या चित्रफितीत आढळून आले असून पोलीस या संशयीतांचा तपास करीत आहेत.

बेलेवाडी येथे बिबट्याचे दर्शन

उत्तूर : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

बेलेवाडी हू !! घाटात मंगळवारी सायंकाळी पावणे आठ वाजण्याच्या सुमारास म्हसोबा मंदिराच्या खालच्या वाळणावत धामणेच्या दिशेने खाली जाताना बिबट्याने रस्त्यावरील दुचाकी व चारचाकीस्वारांना दर्शन दिले.

या मार्गावरून जाणाऱ्या एका खाजगी ट्रॅव्हल्स कंपनीच्या गाडीतील प्रवाशांनाही बिबट्या पाहावयास मिळाला.

छायावृत्त

ज्येष्ठ शिक्षण तज्ञ आंतरभारती शिक्षण मंडळाचे संस्थापक स्व. अनंतराव आजगावकर यांना प्रथम स्मृती दिनानिमित्त अभिवादन करण्यात आले. यावेळी माजी जि.प. अध्यक्ष उमेश आपटे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.

शक्तीपीठला तीव्र विरोध करण्याचा शेतक-यांच्या निर्णय
पेरणोलीत व्यापक बैठक,महामार्ग हाणून पाडण्याचा निर्धार

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

शक्तीपीठ महामार्गामुळे शेतकरी, पर्यावरण व संस्कृती उध्वस्त होणार असून महामार्गाला तीव्र विरोध करण्याचा व हाणून पाडण्याचा निर्णय पेरणोली ता. आजरा येथील बैठकीत घेण्यात आला.

निमंत्रक काँ. संपत देसाई म्हणाले, संघटीत झाल्याशिवाय सरकार नमते घेणार नाही. आम्हाला आमची जमीन वाचवायची आहे. साधारण बागायती जमीन प्रत्येकाची दोन एकर आहे.ती नष्ट होणार आहे. कोरोनात शेतीचे महत्त्व अधोरेखित झाले आहे. हा महामार्ग शेतक-यांसह संस्कृतीही नष्ट करणार आहे. पर्यावरणाचा गंभीर प्रश्न निर्माण होणार आहे. त्यामुळे लढल्याशिवाय पर्याय नाही.

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे तानाजी देसाई म्हणाले, सर्वसामान्य शेतकरी शासनाचा महामार्गाचा घाट उधळून लावल्याशिवाय राहणार नाही. शेतक-याला उद्धस्त करण्याचे धोरण शासन करीत आहे. आमच्या वडिलोपार्जित जमीनी टिकवणे आमचे कर्तव्य आहे. यावेळी इनास फर्नांडिस, विष्णू जाधव यांनी मनोगत व्यक्त केले.

यावेळी अमर पवार, सर्जेराव देसाई, मारूती वरेकर,सुभाष देसाई, सुरेश कालेकर,सचिन देसाई, दत्तात्रय सावंत,हिंदुराव कालेकर,उदय कोडक, मारूती नावलकर, श्रावण लोंढे आदी उपस्थित होते.रविंद्र देसाई यांनी प्रास्ताविक केले. कृष्णा सावंत यांनी आभार मानले.

आज निर्धार मेळावा

शक्तिपीठ महामार्ग विरोधात आज बुधवार दिनांक १५ एप्रिल २०२६ रोजी सकाळी ११.०० वाजता ‘मृत्युंजय’ कार शिवाजीराव सावंत स्मृती दालनामध्ये निर्धार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.

सदर मेळाव्यास माजी खासदार राजू शेट्टी आमदार सतेज उर्फ बंटी पाटील माजी आमदार राजेश पाटील उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहेत.

प्रवासी राजा दिन स्थगित…

आज बुधवारी आजरा आगारात होणारा होणारा प्रवासी राजा दिन कार्यक्रम काही अपरिहार्य कारणामुळे तुर्तास रद्द करण्यात आला असल्याचे आगार व्यवस्थापनाने कळवले आहे.

देवर्डे शाळेत आंबेडकर जयंती उत्साहात

देवर्डे शाळेत भारतरत्न महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती देवर्डे येथील विद्या मंदिर रवळनाथ हायस्कूल यांच्या संयुक्त विद्यमाने डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी करण्यात आली.

कार्यक्रमाचे अध्यक्ष मुख्याध्यापक शिवाजी सावंत होते. यावेळी सोहम आमले, अनुष्का तानवडे या विद्यार्थ्यांनी भाषणे केली. याप्रसंगी देवेंद्र शिखरे ,राजेंद्र पाटील, शिवाजी सावंत यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.

याप्रसंगी मुख्याध्यापक चंद्रकांत घुरे, महेश नावलगी, संतोष आमनगी, सुनील पाटील, संजय सुतार, आशा कोंडुस्कर, धनाजी चाळके, मारुती बुरुड यासह विद्यार्थी उपस्थित होते

 आजचे पंचांग 

दिनांक : १५ एप्रिल २०२६

वार : बुधवार

माह (अमावस्यांत) : चैत्र
माह (पूर्णिमांत) : वैशाख
ऋतु : वसंत
आयन : उत्तरायण
पक्ष : कृष्ण पक्ष
तिथी : त्रयोदशी (रात्री १०.३१ पर्यंत) त्यानंतर चतुर्दशी तिथी
नक्षत्र : पूर्वाभाद्रपदा नक्षत्र (दुपारी ०३.२२ पर्यंत) त्यानंतर उत्तराभाद्रपदा नक्षत्र
योग : ब्रह्म योग (दुपारी ०१.२४ पर्यंत) त्यानंतर इन्द्र योग
करण : गराजा करण (सकाळी ११.२७ पर्यंत) त्यानंतर वाणीजा करण
चंद्र राशी : कुंभ राशी (सकाळी ०९.३७ पर्यंत) त्यानंतर मीन राशी
सूर्य राशी : मेष राशी
अशुभ मुहूर्त:
राहु काळ : दुपारी १२.३९ ते दुपारी ०२.१३ पर्यंत
सूर्योदय : सकाळी ०६.२३
सूर्यास्त : सायंकाळी ०६.५५
संवत्सर : पराभव
संवत्सर(उत्तर) : रौद्र
विक्रम संवत: २०८३ विक्रम संवत
शक संवत: १९४८ शक संवत

आयपीएल न्यूज

चेन्नईचा कोलकतावर ३२ धावांनी विजय. २० षटकात पाच बाद १९२ धावा केलेल्या चेन्नईने कोलकताला २० षटकात सात बाद १६० धावांवर गुंडाळले . नूर अहमद याने चार षटकात २१ धावांच्या मोबदल्यात तीन गडी बाद करून सामनावीर पुरस्कार पटकावला. कोलकताचा हा सलग चौथा पराभव आहे.

आजचा सामना…

बंगळुरू विरुद्ध लखनौ स्थळ : बंगळूर
वेळ : सायंकाळी ७.३० पासून

 

संबंधित पोस्ट

सातच्या बातम्या …

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

आजरा तालुक्यात एमआयएमचा प्रवेश…

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews
error: Content is protected !!