mrityunjaymahanews
अन्य

सातच्या बातम्या


टोलविरोधातील मोर्चास उत्स्फूर्त प्रतिसाद

        आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

       आजरा तालुक्यातील जनतेला टोलमुक्ती मिळावी यासह टोल हद्दपार झाला पाहिजे, अशी मागणी करत भव्य मोर्चाद्वारे आजरा तालुक्यातील नागरिकांनी टोल वसुली नाक्यावर धडक दिली . या मोर्चामध्ये शेकडो नागरिक सहभागी झाले होते. या मोर्चाचे नेतृत्व संकेश्वर बांदा महामार्ग टोलमुक्ती संघर्ष समितीने केले. या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर पुकारण्यात आलेल्या आजरा बंदलाही व्यापारी व शहरवासीयांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

     हॉटेल मिनर्वा येथून  मोर्चाला सुरुवात झाली. मोर्चात सहभागी झालेल्या नागरिकांनी टोलविरोधाच्या घातलेल्या टोप्या परिधान करून टोल विरोधात घोषणा देत आंदोलक टोल नाक्यावर येऊन धडकले. या ठिकाणी मोर्चाचे रूपांतर सभेत झाले.

      यावेळी कॉ. संपत देसाई म्हणाले, टोलचे भूत आमच्या मानगुटीवर लादले गेले आहे. पण आम्हाला टोल माफी हवी आहे. राज्यमार्गाच्या कामाला ठेकेदार मिळत नसल्याने हा रस्ता महामार्गाकडे वर्ग करण्यात आला. पण या रस्त्याची बांधणी ही बांधा वापरा हस्तांतर करा या तत्त्वावर झालेली नसून याकरता महामार्गाने निधी लावला आहे. रस्ता चार पदरी किंवा सहा पदरी झालेला नसून फक्त रस्त्याची रुंदीकरण व मजबुतीकरण झाले आहे. महामार्ग चार पदरी नसताना टोल वसुलीचा घाट का घातला जात आहे? महामार्गाच्या कामाचे पैसे राज्य शासनाने केंद्र शासनाला देऊन रस्ता टोलमुक्त करावा यासाठी हे आंदोलन आहे. टोलच्या माध्यमातून शेतकऱ्यांना उध्वस्त करण्याचा डाव हाणून पाडायचा आहे. हा केवळ इशारा मोर्चा काढला आहे. टोल रद्दबाबत तातडीने निर्णय न झाल्यास आंदोलन तीव्र केले जाईल. जनतेला संपूर्ण टोल माफी झाल्याशिवाय आंदोलन थांबणार नसल्याचा इशाराही कॉ. देसाई यांनी दिला

     राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष (शरद पवार गट) मुकुंद देसाई म्हणाले, नवीन तयार करण्यात आलेल्या रस्त्याला कोणत्याही मूलभूत सुविधा नाहीत. टोलच्या रूपाने तालुक्यावर अन्याय होत आहे. माजी जिल्हा परिषद अध्यक्ष उमेश आपटे म्हणाले, आता जर टोल लागला तर तो आयुष्यभरासाठी लागणार आहे त्यामुळे संघर्ष हा करावाच लागेल.

     आमदार प्रकाश आबिटकर म्हणाले, शासन स्थानिकांना विश्वासात न घेता एकतर्फी जीआर व आदेश काढत आहे रस्ता ठरलेल्या पद्धतीने झालाच नसेल तर नागरिकांनी टोल का द्यावा? असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला गडहिंग्लज व आजरा तालुक्यात नुकसान भरपाईपोटी देण्यात येणाऱ्या रकमांमध्ये ही तफावत आहे याबाबतही फेर सुनावणीची गरज आहे . टोलला हद्दपार करण्यासाठी जन आंदोलन, राजकीय लढाई व कायदेशीर लढाई या तिन्ही बाबींचा अवलंब करावा लागेल. या महामार्गावरचा टोल हटवला पाहिजे, कोणत्याही परिस्थितीत आजरेकर नागरिक टोल देणार नाहीत. वेळ पडली तर केंद्र शासन व राज्य शासनाच्या विरोधात न्यायालयात जाण्याची तयारी ठेवली पाहिजे. टोल हटवल्याशिवाय आता कोणत्याही परिस्थितीत थांबायचे नाही. आंदोलन एवढे तीव्र करू की टोलला हद्दपार करू आणि टोलमुक्तीचा आजरा पॅटर्न देशभर नेऊया.

     माजी आमदार के. पी. पाटील म्हणाले की, शक्तिपीठ महामार्ग व आजऱ्याजवळचा टोल याला आमचा विरोध आहे. या कामांना स्थगिती नको तर ती रद्द झालं पाहिजे. सरकारने आमच्या मागण्यांच्याकडे लक्ष दिले नाही तर आगामी काळात संघर्ष अटळ आहे.
ए. वाय. पाटील यांनीही या आंदोलनास पाठिंबा दर्शवला.

      पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी आंदोलनकर्त्यांशी संपर्क साधून याबाबत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याशी आपण बोलून या प्रश्नाचे गांभीर्य त्यांना सांगू व टोल रद्द करण्याबाबतची आग्रही मागणी त्यांच्याकडे करू असे सांगितले.

     आजरा बार असोसिएशनचे अध्यक्ष ॲड. शैलेश देशपांडे यांनी या मार्गावरून विनामूल्य  प्रवास करणे हा ज्यांच्या योगदानातून हा मार्ग तयार झाला आहे त्या स्थानिक नागरिकांचा हक्क आहे तो कदापिही डावलता येणार नाही असे सांगत या लढ्यामध्ये बार असोसिएशनचे संपूर्ण सहकार्य राहील असे सांगून हा लढा शांततेने यशस्वी करूया असे आवाहन केले.

      आजरा कारखाना अध्यक्ष वसंतराव धुरे, युवराज पोवार, प्रभाकर कोरवी, डॉ.उल्हास त्रिरत्ने,, तानाजी देसाई आदींनी मार्गदर्शन केले.

     त्याचबरोबर या आंदोलनाला वकील संघटना, डॉक्टर संघटना, न्यू आजरा रोडलाईन्स मोटर मालक संघटना, आजरा साखर कामगार संघटना, ऊस वाहतूकदार संघटना, व्यापारी संघटना, सरपंच संघटना तसेच इतर संघटनांनी ही पाठिंबा दिला.

      संजय पाटील (शिवसेना शिंदे गट) यांनी आभार मानले.

           मान्यवरांची उपस्थिती

    आंदोलनामध्ये सुधीर देसाई, परशुराम बामणे, संभाजी पाटील, अंजनाताई रेडेकर, उदयराज पवार, विष्णुपंत केसरकर, जयवंतराव शिंपी, रशीद पठाण, अल्बर्ट डिसोझा, जनार्दन टोपले, विठ्ठलराव देसाई, धनाजी शिंदे, मारुती डोंगरे, दयानंद भोपळे,कॉ. संग्राम सावंत, डॉ. अनिल देशपांडे, संजयभाऊ सावंत, नामदेव नार्वेकर, काशिनाथ मोरे, नौशादभाई बुडडेखान, रशीद पठाण, शरीफ खेडेकर, अमित खेडेकर, विनोद मुरकुटे, शांताराम पाटील, रवींद्र भाटले, सुधीर कुंभार, दिपक देसाई, अनिरुद्ध केसरकर, अनिकेत कवळेकर, वाय. बी. चव्हाण, सिद्धेश नाईक, दशरथ अमृते, सौ.रचना होलम,सौ. मनीषा देसाई ,सौ. राजलक्ष्मी देसाई, सुधीर सुपल, आनंदा घंटे, आरिफ खेडेकर, जी. एम. पाटील, एम.के. देसाई, नामदेव नार्वेकर ,संभाजीराव सरदेसाई , निवृत्ती कांबळे, महेश कुरुणकर, राजू पोतनीस,परेश पोतदार, शिरीष देसाई, दशरथ अमृते, विजयकुमार पाटील ,मारुती घोरपडे, अनिल फडके, विजय थोरवत, संतोष भाटले,नाथ देसाई, काका देसाई,   दत्ता मोहिते, महादेव पोवार, डॉ. धनाजी राणे, महेश पाटील, विलास पाटील, विश्वास जाधव, एस.पी.कांबळे, संभाजीराव इंजल, गौरव देशपांडे, विठ्ठल /बंडोपंत चव्हाण, राजू विभुते, समीर मोरजकर,,रवी वडवळएकर, ओमकार माद्याळकर ,पांडुरंग सावरतकर सिद्धेश  नाईक, दयानंद भोपळे कॉ. शिवाजी गुरव , धनाजी देसाई, संकेत सावंत, निवृत्ती कांबळे,निसार दरवाजकर, पद्मिनी पिळणकर, सरिता सावंत डॉ. संजीवनी देसाई, दिवाकर नलवडे, बाकीव खेडेकर, सलीम लतीफ, देवदास बोलके, सिद्धार्थ तेजम आदींसह अन्याय निवारण समिती सदस्य, टोलमुक्त संघर्ष समिती सदस्य व आजरा तालुक्यातील नागरीक उपस्थित होते.

हाज यात्रेस गेलेल्या दिलावर मुजावर यांचे निधन


         आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

       महिनाभरापूर्वी हाज यात्रेसाठी गेलेल्या आजरा येथील दिलावर सुलेमान मुजावर यांचे मक्का येते अल्पश: आजाराने निधन झाले. निधन समयी त्यांचे वय ५८ वर्षे होते.

     महिनाभरापूर्वी हाजला केलेल्या मुजावर यांना अचानकपणे प्रकृतीचा त्रास होऊ लागला. काल त्यांचे मक्का येथे  निधन झाले.

     आजरा येथील नगरसेविका यासिराबी मुजावर/लमतूरे यांचे ते सासरे व मंजूर मुजावर यांचे वडील होत. मच्छी विक्री व काजू व्यवसाय करणा-या मुजावर यांच्या निधनाने शहरात हळहळ व्यक्त होत आहे.

     त्यांच्यावर मक्का येथेच अंत्यसंस्कार करण्यात येणार असल्याचे त्यांच्या कुटुंबीयांनी सांगितले.

     त्यांच्या पश्चात दोन विवाहित मुले, एक मुलगी, सुना, नातवंडे,जावई असा परिवार आहे.

निधन वार्ता
सुमती केसरकर

      आजरा येथील सुमती ज्ञानेश्वर केसरकर ( वय ८२ वर्षे ) यांचे सकाळी वृद्धापकाळाने निधान झाले.
     त्यांच्या पश्चात दोन विवाहित मुले सूना नातवंडे असा परिवार आहे. विजय केसरकर व उमेश केसरकर यांच्या त्या आई होत.

जोरेस तकीलदार

     आजरा येथील कोल्हापूरस्थित जोरेस इजाज तकीलदार ( वय ११ वर्षे) याचे अल्पश: आजाराने उपचारादरम्यान कोल्हापूर येथे निधन झाले.

     त्याच्या पश्चात आई,वडील,बहिण असा परिवार आहे.


 

संबंधित पोस्ट

अण्णाभाऊ समूहाचा शिवाजीराव पाटील यांना पाठिंबा जाहीर…

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

कै. केदारी रेडेकर हे लढवय्या कार्यकर्ते…

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews
error: Content is protected !!