

हरपवडे ग्रामसभेचा दाखला न मिळाल्यास ‘बोंब मारो ‘ आंदोलन

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
हरपवडे ता.आजरा येथील २६ जानेवारी रोजी ग्रामसभा झाल्याबाबतचा दाखला पंचायत समिती प्रशासनाने न दिल्यास सोमवार दि १८ रोजी ‘ बोंब मारो ‘ आंदोलनाचा इशारा सरपंच,उपसरपंच व सदस्यांनी गटविकास अधिकारी संजय ढमाळ यांना निवेदनातून दिला आहे.
निवेदनात म्हटले आहे की, २६ जानेवारी २०२४ रोजी रीतसर ग्रामसभा झालेली आहे. या सभेचा सर्व वृत्तांत ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक यांनी पंचायत समितीचे सहाय्यक गटविकास अधिकारी व विस्तार अधिकारी यांचेकडे ग्रामसभेचे प्रोसिडिंग, सह्यांचे प्रोसिडिंग व नोटीस प्रसिद्ध केलेली व दवंडी रजिस्टर इ. सर्व कागदपत्रे सादर केलेली आहेत.
संबंधीत अधिकाऱ्यांनी ग्रामसभेच्या कागदपत्रांची पडताळणी ग्रामपंचायत कार्यालय येथे येऊन केलेली आहे. तसा तपासणी अहवाल गटविकास अधिकारी यांचेकडे सादर केला आहे. परंतु राजकीय दबावापोटी गटविकास अधिकारी दाखला देणेस विलंब लावत असून गेले दीड महिना दाखला देणेत टाळाटाळ करत आहेत असा आरोप करत दाखला शुक्रवार दि. १५ मार्च पर्यंत न दिल्यास सोमवार दि.१८ रोजी सकाळी ११.०० वाजता पंचायत समिती कार्यालया समोर ‘बोंब मारो ‘ आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.
निवेदनावर सरपंच सागर पाटील,उपसरपंच शिवाजी कांबळे,गोविंद गुरव,आनंदा कदम यांच्या सह्या आहेत.

जिल्हाधिकाऱ्यांची आजऱ्याला भेट

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी लोकसभा निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर आजऱ्याला भेट दिली. या वेळी त्यांनी निवडणूकीच्या तयारी संदर्भात अधिकाऱ्यांशी चचर्चा केली. आजरा शहरातील रोझरी हायस्कूल, स्वामी विवेकानंद प्राथमिक शाळा, आंतरराज्य सीमेवरील गाव बहिरेवाडी गावातील पोलीस तपासणी नाक्याला भेट देवून सूचना केल्या.
येथील तहसीलदार कार्यालयात निवडणुकीच्या तयारी संदभर्भात बैठक झाली. निवडणुकीमध्ये सर्व विभागाने समन्वय ठेवून काम करावे. आचारसंहितेचे नियम पाळावेत. प्रत्येकाने आपआपली जबाबदारी पार पाडून निवडणूक प्रक्रिया शांततेत होईल यासाठी प्रयत्न करावेत. या वेळी आजरा- भुदरगडच्या प्रांताधिकारी वसुंधरा बारवे, गटविकास हे अधिकारी संजय ढमाळ, आजरा नगरपंचायतीचे मुख्याधिकारी सुरज सुर्वे, निवासी नायब तहसीलदार म्हाळसाकांत देसाई, महसुल नायब तहसीलदार विकास कोलते, पोलीस उपनिरीक्षक वसंत पाटील, सहाय्यक निबंधक सुजयकुमार येजरे , विविध विभागाचे अधिकारी या वेळी उपस्थित होते.

संभाजीराजेंनी घेतल्या नेते व प्रमुख कार्यकर्त्यांच्या गाठीभेटी

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
कोल्हापूर लोकसभा मतदार संघातून महाविकास आघाडीकडून छत्रपती शाहू महाराजांची उमेदवारी निश्चित मानली जाते. या निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर युवराज छत्रपती संभाजीराजे यांनी गुरुवारी आजरा तालुक्याचा दौरा केला. या दौऱ्यात त्यांनी आजरा शहरासह तालुक्यातील प्रमुख नेते मंडळींच्या गाठी-भेटी घेऊन निवडणूकीच्या अनुषंगाने चर्चा केली.
लोकसभेच्या निवडणूकीत आजरा तालुक्याने आपल्याला मोठे मताधिक्य दिले होते. आताही त्याप्रमाणेच शाहू महाराजांना मताधिक्य द्यावे असे आवाहन संभाजीराजे यांनी तालुक्यातील नेते मंडळी तसेच प्रमुख कार्यकर्त्यांच्या भेटीवेळी केले. सकाळी त्यांचे आजरा शहरात आगमन झाले.

उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या कार्यालयात त्यांनी जिल्हा उपप्रमुख संभाजी पाटील, तालुका प्रमुख युवराज पोवार, यांच्यासह कार्यकर्त्यांची भेट घेऊन चर्चा केली.यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे तालुका प्रमुख मुकुंदराव देसाई यांची भेट घेतली. याठिकाणी श्रमुदचे कार्याध्यक्ष कॉ. संपत देसाई, अजित देसाई, माजी सभापती उदय पवार, रणजित देसाई, राजू होलम, नौशाद बुड्डेखान यांच्यासह उपस्थित कार्यकर्त्यांसोबत चर्चा केली. कोल्हापूर जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष जयवंतराव शिंपी यांच्या घरी संभाजीराजे यांनी त्यांची भेट घेतली. याठिकाणी नगरसेवक अभिषेक शिंपी, किरण कांबळे यांच्यासह अशोक पोवार, एस. पी. कांबळे, विश्वास जाधव, बाबुराव नाईक, सचिन शिंपी आदि कार्यकर्ते उपस्थित होते

याबरोबच मनसे ग्राहक सेनेचे जिल्हाध्यक्ष परशराम बामणे, डॉ इंद्रजित देसाई, नगरसेवक सिकंदर दरवाजकर, बशील तकीलदार, मलिककुमार बुरुड, अरूण देसाई, इकबाल शेख यांच्यासह आजरा शहरातील प्रमुख नेते व कार्यकर्त्यांशी त्यांनी संवाद साधला. यावेळी संभाजीराजे यांच्यासोबत विद्याधर गुरबे, आजरा साखर कारखान्याचे संचालक अशोक तर्डेकर, स्वराज्य चे तालुकाध्यक्ष संजय पवार, सूरज माने, विशाल रेळेकर, दिनेश कुरूणकर उपस्थित होते.
भाजपाचा मराठा आरक्षणास विरोध…
संसदीय सभागृहात छत्रपती शाहू महाराजांचे समतेचे विचार मांडू दिले जात नाहीत.शाहू महाराजांचा आरक्षणाचा मुद्दा आपल्याला मांडू दिला नाही.त्यामुळे मराठा आरक्षणाच्या मुद्याला भाजपचा विरोध आहे. सभागृहात राजे घराण्याला खूप मान आहे.छत्रपती शिवाजी महारांजांचे वंशज असलेल्या शाहू महाराजांच्या विचाराला भाजपचा विरोध असल्याचे जाणवले असेही संभाजी राजे यांनी स्पष्ट केले.

संस्कृती महिला ग्रामसंघाचे जिल्हाधिकाऱ्यांकडून कौतुक

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
कोल्हापूर जिल्हाधिकारी म्हणून सूत्रे हाती घेतल्यानंतर जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी गुरुवारी प्रथमच आजरा तालुक्याला भेट दिली. या भेटीच्या निमित्ताने देवकांडगांव येथील संस्कृती महिला ग्रामसंघाच्या वनअमृत प्रकल्पास भेट देऊन त्यांनी संस्कृती महिला ग्रामसंघाच्या कामाचे कौतुक केले.
आजरा येथील मध्यवर्ती प्रशासकीय भवनमध्ये संस्कृती महिला संघाने आपल्या वनअमृत प्रकल्पातून तयार केलेली उत्पादने मांडली होती. याबरोबरच तालुक्यातील काही महिला बचत गटांच्या उत्पादनांचे प्रदर्शनही यानिमित्ताने याठिकाणी मांडण्यात आले होते. संस्कृती महिला संघाच्या सदस्यांनी जंगलातील रानटी फळांपासून तयार केलेला ज्यूस, गावठी मघ, जतन केलेल्या स्थानिक भात पिकाच्या विविध जातींचे बियाणे याबाबत माहिती घेतली,
याबरोबरच नाचणी जांमुळ, काजू यांचे सिरप तयार केले आहे. जिल्ह्यात अनेक ठिकाणच्या कृषी प्रदर्शनामध्ये येथील संस्कृती महिला ग्राम संघ सहभाग घेत असतो, त्याचे कौतुक जिल्हाधिकारी येडगे यांनी केले
यावेळी उपविभागीय अधिकारी वसुंधरा बारवे, तहसीलदार समीर माने, नायब तहसीलदार म्हाळसाकांत देसाई, विकास कोलते, तसेच तलाठी, कोतवाल, आजरा तालुका गट समन्वयक शांताराम कांबळे, ग्राम संघाच्या महिला अर्चना देसाई, दिपाली गुरव, स्वप्नाली राणे, गीता देसाई, पूनम देसाई, रेश्मा राणे, शामल देसाई, आकांक्षा देसाई यांच्यासह ग्रामसंघाच्या सर्व महिला, ग्रामस्थ उपस्थित होत्या, अर्चना देसाई यांनी जिल्हाधिकारी यांचे स्वागत केले दिपाली गुरव यांनी आभार मानले.

निवड…
ॲड. धनंजय देसाई

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
ॲड. धनंजय देसाई यांची भारत सरकार नोटरी वकील पदी निवड झाली आहे. गेली तीस वर्षे ते आजरा येथे वकिल म्हणून काम पहात आहेत.
सुशांत पारपोलकर

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
आजरा येथील कु.सुशांत श्रीकांत पारपोलकर याची नियोजन विभाग,अर्थ व सांख्यिकी संचालनालय, महाराष्ट्र राज्य,मुंबई स्पर्धा परीक्षा मधून सहायक संशोधन अधिकारी वर्ग-२ पदी मुंबई येथे नियुक्ती झाली आहे. त्याच्या या यशाबद्दल सर्वत्र कौतुक होत आहे.
निधन वार्ता…
ज्ञानदेव ठाकुर

उत्तूर : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
उत्तूर येथील प्रतिष्ठित व्यापारी ज्ञानदेव लक्ष्मण ठाकुर (वय ८९) यांचे वृद्धापकाळाने गुरूवार दि. १४ रोजी सायंकाळी निधन झाले, त्यांच्या पश्चात तीन मुले, एक मुलगी, सुना, नातवंडे असा परिवार आहे. वार्ताहर शिरिष ठाकुर यांचे ते वडिल होत.



