

शेतकऱ्यांबाबत वनविभाग सकारात्मक :-जी गुरुप्रसाद
श्रमिक मुक्ती दल व वन अधिकारी यांची बैठक संपन्न

आजरा तालुक्यातील शेतकऱ्यांना वन्य प्राण्यांकडून उपद्रव होत आहे. वन्य प्राण्यांकडून होणा-या नुकसानीची मिळणारी तोकडी मदत, झालेल्या नुकसानीचे पंचनामे करताना येणाऱ्या तांत्रिक अडचणी, वन हक्क जमिनींचे प्रश्न यासह विविध बाबींवर वनविभागासह शासन शासनाचा सकारात्मक दृष्टिकोन असून यामधील त्रुटी कमी करण्यासाठी शासनाकडून प्रयत्न सुरू आहेत. झाल्या नुकसानीचे सर्व आवश्यक त्या कागदपत्रांसह तातडीने प्रस्ताव सादर करावेत जेणेकरून परिपूर्ण प्रस्ताव सादर झाल्यानंतर तीस दिवसात नुकसान भरपाई देण्याच्या दृष्टीने प्रयत्न केले जातील. गवत व बांबूचे होणारे नुकसान हे देखील शेतकऱ्यांच्या दृष्टीने अडचणीची असल्याने गवत व बांबूला नुकसान भरपाई मिळवून देण्याची दृष्टीने शासनाचा विचार सुरू असल्याचे उपवनसंरक्षक जी. गुरूप्रसाद यांनी यावेळी स्पष्ट केले.
तालुक्यातील वन विभागाच्या प्रश्नाबाबत श्रमिक मुक्ती दलाचे राज्य संघटक काँ. संपत देसाई,कार्यकर्ते, तालुक्यातील शेतकरी व वन विभागाचे अधिकारी यांची संयुक्त बैठक वनविभागाच्या कार्यालयात पार पडली. बैठकीत उपवनसंरक्षक जी गुरुप्रसाद बोलत होते.जंगल समृद्धीकरण प्रस्ताव शासनाकडे पाठविण्यात येणार असल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
यावेळी काँ. संपत देसाई यांनी तालुक्यातील शेतकऱ्यांची व्यथा अधिकाऱ्यांसमोर मांडली. ऑनलाइन पद्धतीने अर्ज सादर करताना येणाऱ्या अडचणी, ५० हजार पर्यंतची नुकसान भरपाई देण्याचे अधिकार स्थानिक अधिकाऱ्यांनाच रहावेत, नाचणा, भात तरुची नुकसान भरपाईही मिळावी. काही निर्णय हे सचिव व मंत्री पातळीवरील असल्याने शासनाच्या प्रमुख मंडळींसोबत तातडीने बैठक घेऊन धोरणात्मक निर्णय घ्यावेत अशी मागणी यावेळी काँ. संपत देसाई व शेतकऱ्यांकडून करण्यात आली.
जी गुरुप्रसाद यांनी यावेळी शासनाकडून शेतकऱ्यांना मिळणारी नुकसान भरपाई वाढवणे, व्यक्तिगत सौर कुंपण योजना राबवणे, शेतकऱ्यांच्या नुकसानीच्या ऑनलाइन पद्धतीने अर्ज भरण्यासाठी वनविभागाच्या कार्यालयात स्वतंत्र कक्ष स्थापन करणे याबाबतची माहिती दिली.
यावेळी झालेल्या चर्चेमध्ये समीर पारधे, निवृत्ती कांबळे, प्रकाश मोरुसकर, दशरथ घूरे , संजय देसाई,गोविंद पाटील, बयाजी येडगे, हरिबा कांबळे, प्रकाश शेडगे यांनी भाग घेतला.
बैठकीस अशोक मालव, रामू कोकरे, अमानुल्ला आगलावे, वनविभागाचे बालिश नावे संजय निळकंठ लटके या अधिकाऱ्यांसह तालुक्यातील शेतकरी व वनविभागाचे कर्मचारी उपस्थित होते.
खोटे प्रस्ताव नको…
अनेक वेळा नुकसान भरपाई मिळवण्यासाठी वन्य प्राण्यांच्या हल्ल्याचे खोटे प्रस्ताव पाठवले जातात. परंतु ते प्रस्ताव खोटे असल्याचे निदर्शनास येत असल्याने नुकसान भरपाई देताना अडचणी निर्माण होतात. त्यामुळे असे खोते प्रस्ताव वनविभागाकडे पाठवू नका. असे आवाहन यावेळी जी गुरुप्रसाद व स्थानिक परिक्षेत्र वन अधिकारी स्मिता डाके यांनी केले.

मृत कोंबड्याप्रकरणी प्रशासनाला अखेर जाग…
आरोग्य विभागासह नगरपंचायत आक्रमक

आजरा तालुक्यातील आंबोली, गडहिंग्लज मार्ग व एरंडोळसह तालुक्यातील ठीकठिकाणी रस्त्याशेजारी, ओढ्यामध्ये पोल्ट्रीच्या मृत कोंबड्या टाकल्या जातात.कोंबड्या कुजून दुर्गंधीयुक्त पाणी चित्री नदीत मिसळते. चित्रीच्या पाण्यावर अनेक गावच्या पाणीपुरवठा योजना आहेत. याबाबत प्रसिद्धी माध्यमांनी जोर लावल्यानंतर प्रशासनाला खडबडून जाग आली. आज तातडीने नगरपंचायतीसह आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांनी संबंधित ठिकाणी भेट देऊन माहिती घेतली.
कुजलेल्या कोंबड्यांचे अवशेष मिसळलेले दूषित पाणी थेट चित्री नदीत मिसळून हेच पाणी पाणीपुरवठा योजना मार्फत आणि गावामध्ये नागरिकांपर्यंत पोहोचते.

अधिकाऱ्यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी करून संबंधित पोल्ट्रीधारकांवर नोटीसाद्वारे कायदेशीर कारवाई करण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत.
प्रशासनाच्या या भूमिकेमुळे पोल्ट्री चालकांसह कोंबड्यांच्या वाहतूक करणाऱ्या वाहनधारकांची भंबेरी उडाली असून काही वाहतूकधारकांनी तूर्तास वाहतूक बंद करण्याचा निर्णय घेतला असल्याचे समजते.
मच्छी मार्केटमध्ये हवा तंग…
मार्केट बाहेर दुकाने लावल्याने वादाचे प्रसंग

आजरा येथे मच्छी मार्केट असूनही मॉर्निंग स्टार परिसरात मच्छी विक्रेते दुकाने लावत असल्याने वादाचे प्रसंग निर्माण होत असून बुधवारी पुन्हा एकदा नगरपंचायतीचे कर्मचारी व काही मच्छी विक्रेत्यांमध्ये दुकाने लावण्यावरून शाब्दिक चकमक उडाली. हे प्रकरण अखेर पोलिसांपर्यंत गेले. पोलिसांनी तातडीने या परिसराला भेट दिल्याने नेमके काय झाले हे स्थानिक नागरिकांच्या लक्षात न आल्याने वातावरण तंग झाले. अखेर पोलिसांनी काही प्रमुख मच्छी विक्रेत्यांना थेट मच्छी मार्केटमध्ये बसवल्यानंतर वातावरण शांत झाले.
मच्छी मार्केट असूनही अन्यत्र विक्री केली जात असल्याने नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण होत आहे. कधी मच्छी विक्रेतत्यांच्यात तर कधी स्थानिक महिला व विक्रेते यांच्यात वाद होताना दिसतात.
सुसज्ज मच्छी मार्केट असूनही वारंवार होणारे हे वाद नगरपंचायतीकडून तक्रार झाल्याशिवाय लक्षात घेतले जात नाहीत हे दुर्दैव आहे.
जबाबदारी नगरपंचायतीची… डोकेदुखी पोलिसांची…
वास्तविक मच्छी विक्रेत्यांना शिस्त लावण्याची जबाबदारी नगरपंचायतीची आहे. प्रत्यक्षात मात्र नगरपंचायत याकडे दुर्लक्ष करत असल्याने यापूर्वी अनेक वेळा मच्छी विक्रेत्यांबाबतचे वाद झाले आहेत. नगरपंचायत प्रशासन याबाबत कठोर भूमिका घेत नसल्याने याचा निश्चितच पोलीस खात्याला मात्र त्रास सहन करावा लागत आहे

धुरळा ग्रामपंचायत निवडणुकांचा…
तालुक्यातील निवडणूक कार्यक्रम जाहीर झालेल्या ग्रामपंचायती:-
मेंढोली, मसोली, बुरुडे, इटे, वेळवट्टी, चांदेवाडी, सुलगाव, पेरणोली, देऊळवाडी, हरपवडे,
मतदान दिनांक 5 नोव्हेंबर.


