भागभांडवलाच्या कारणावरून अनेक सभासदांची नावे मतदार यादीतून वगळली…?
तालुका खरेदी विक्री संघाच्या निवडणूक पार्श्वभूमीवर सत्ताधाऱ्यांच्या विरोधात तक्रार

आजरा तालुका खरेदी विक्री संघाची निवडणूक समोर असताना सत्ताधारी मंडळींनी अपुऱ्या वैयक्तिक भाग भांडवलाच्या कारणावरून अनेक सभासदांना मतदानापासून वंचित ठेवण्याचा डाव आखला असल्याचा आरोप अनिकेत चराटी अशोक चराटी व जयवंतराव शिंपी यांनी केला आहे
याबाबत बोलताना अनिकेत चराटी म्हणाले,आजरा तालुका शेतकरी सहकारी खरेदी विक्री संघ मर्या. आजरा या प्रवर्गातील सन २०२२-२७ सालच्या संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीचा कार्यक्रम लागलेला असून सदर निवडणुकीसाठी सर्व वैयक्तिक सभासदांची नावे मतदार यादीमध्ये समाविष्ट केले नसलेचे समजते. आजरा तालुक्यासाठी आजरा तालुका शेतकरी खरेदी विक्री संघ मर्या. आजरा ही शेतकऱ्यांची संस्था असून सदर संस्थेमध्ये वैयक्तिक सभासद हे गेल्यावेळचे निवडणुकीमध्ये जवळ जवळ ९ ते १० हजार सभासद होते. मागील निवडणुकीत त्या सर्व सभासदांची नावे आजरा तालुका शेतकरी खरेदी विक्री संघ मर्या. आजरा यांचे निवडणुकीतील मतदार यादीत नोंद होती व त्यांनी मतदानाचा अधिकार बजावलेला आहे.
विद्यमान संचालक मंडळाने सहकार कायद्यातील चुकीचा अर्थ काढून बेकायदेशीर रित्या एकतर्फी सभासद फी ही रक्कम रु.१००/- वरून रु.५००/- केली व ती भरण्याबाबत कोणत्याही सभासदास लेखी सूचना दिलेली नाही. ठराविक वैयक्तिक सभासदांनी सभासद फी वरील प्रमाणे पूर्तता केलेली आहे. परंतु बऱ्याच वैयक्तिक सभासदांना सभासद फी ही रक्कम रु.१०९/- वरून रु.५००/- केलेची लेखी सूचना न मिळालेमुळे त्यांनी सदरची रक्कम भरलेली नाही. म्हणून संस्थेने सदरच्या कारणास्तव संस्थेच्या बऱ्याच वैयक्तिक सभासदांची नावे मतदार यादीतून वगळलेली आहेत. त्यामुळे त्यांना सदरच्या निवडणुकीत मतदान करणेपासून वंचित ठेवणेचा विद्यमान संचालक मंडळाचा मानस दिसतो. तरी तालुका संघाकडे वैयक्तिक सभासद असणाऱ्या सर्व सभासदांची नावे मतदार यादीत समाविष्ट करून सर्व वैयक्तिक सभासदांना मतदान करणेचा अधिकार मिळणेबाबतची लेखी तक्रार केली आहे.
तसेच श्री. रवळनाथ वि.का.स. (वि) सेवा संस्था मर्या., हत्तीवडे, अब्दुल हमीद सेवा संस्था मर्या. सावरवाडी, महात्मा फुले विकास सेवा संस्था मर्या. सुळे, हिंदमाता विकास सेवा संस्था लाकूडवाडी या संस्थेचे बोगस ठराव दिले याबाबतही लेखी तक्रार दिल्याचे श्री. अनिकेत अशोक चराटी यांनी सांगितले . यावेळी अशोकअण्णा चराटी व जयवंतराव शिंपी उपस्थित होते.

