



बेलेवाडी घाटातील तो प्रकार हत्येचा कट
अखेर गूढ उकलले..
दोघे ताब्यात

१८ नोव्हेंबर रोजी रात्री आजरा तालुक्यातील बेलेवाडी घाटामध्ये चन्नेकुप्पी येथील आकाश पाटील या ऊस वहातुक करणाऱ्या ट्रॅक्टर चालकास बेदम मारहाण करून ट्रॅक्टर ढकलून देण्यात आला होता. ऊस वाहतूक करणाऱ्या आकाश याच्याबाबत घडलेल्या या प्रकाराने ऊस वाहतूकदारामध्ये खळबळ माजली होती. या प्रकाराचे गूढ उकलण्यात पोलिसांना अखेर यश आले आहे
याबाबत आजरा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनिल हारुगडे यांनी दिलेली माहिती अशी की…
या घटनेनंतर वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी दिलेल्या सूचनेनुसार सहायक पोलीस निरीक्षक आजरा पोलीस ठाणे यांचे मार्गदर्शनाखाली आजरा गुन्हे शोध पथकातील अंमलदार यांनी सदर गुन्ह्याची उकल करणेकरीता शोध मोहीम राबविली. बरेच रेकॉर्डरील आरोपीकडे तपास केला. सदर गुन्ह्याची उकल करणेकरीता विशेष पोलीस पथके नेमण्यात येवुन सदर गुन्हयाचा तपास सुरू होता. महाराष्ट्र, कर्नाटक सीमावर्ती भागात संकेश्वर, हुक्केरी, निपाणी परिसरात गुन्ह्याच्या अनुषंगाने तपास सुरू होता. गुन्हे शोध पथकातील अंमलदार यांना गोपनीय बातमीदारामार्फत बातमी मिळाली की, सदर गुन्ह्यामध्ये तुकाराम ऊर्फ साईराज पांडुरंग पाटील (रा. हेळेवाडी ता. गडहिंग्लज जि. कोल्हापूर) हा संशयित आरोपी आहे. सदर आरोपी बाबतीतील खात्रीशीर बातमी मिळालेने लागलीच त्याचे गुन्हा घडले दिवशीच्या हालचाली बद्दल माहिती घेवुन सदर आरोपीस शिताफीने ताब्यात घेवुन सदर गुन्ह्याचे अनुषंगाने कसुन चौकशी केली असता त्याने क़बुल केले की, तो स्वतः, सुनिल पाटील (रा. चनेकुप्पी ता. गडहिंग्लज) व मारुती दिंडलखोप( रा. मरणहोळ ता. जि. बेळगाव )तसेच उमाजी नाईक (रा. जरळी ता. गडहिंग्लज) असे मिळुन आकाश पाटील रा.चत्रेकुप्पी ता. गडहिंग्लज यास मारहाणीचा कट करुन दिनांक १८ नोव्हें. रोजी बेलेवाडी घाटामध्ये मारुती दिंडलखोप,उमाजी नाईक, व तुकाराम पाटील असे तिघेजण जावुन आकाश याला सुनिल पाटील याचे सांगणेवरून तलवार व सळ्यानी जबर मारहाण केली असल्याचे सांगितले. साखर कारखान्यात ट्रॅक्टर क्रमपाळीप्रमाणे लावण्यावरून वर्षभरापूर्वी झालेल्या वादाच्या वैमन्यस्यातून सदर प्रकार केल्याचे स्पष्ट झाले आहे.
सदर गुन्ह्यामध्ये सी.सी.टी.व्ही. फुटेज, प्रत्यक्षदर्शी साक्षीदार अथवा कोणताही सुगावा नसताना सदर गुन्ह्याची उकल करण्यात यश आले आहे. सदर गुन्ह्याच्या तपासकामामध्ये सायबर पोलीस पथक, कोल्हापूर यांचे विशेष सहाय्य केले. आरोपीच्या माहितीने तपास केला असता आरोपीकडुन सदर गुन्ह्यातील हत्यार जप्त करण्यात आलेले आहे. सदर गुन्ह्याचा पुढील तपास वाय.एस.जाधव पोलीस उपनिरीक्षक आजरा पोलीस ठाणे हे करीत आहेत.
सदरची कारवाई शैलेश बलकवडे ,पोलीस अधीक्षक कोल्हापूर, निकेश खाटमोडे पाटील, अप्पर पोलीस अधीक्षक गडहिंग्लज कॅम्प इचलकरंजी, राजीव नवले उपविभागीय पोलीस अधिकारी, गडहिंग्लज विभाग गडहिंग्लज, सुनिल के. हारुगडे सहायक पोलीस निरीक्षक आजरा पोलीस ठाणे यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक वाय. एस. जाधव, पोलीस उपनिरीक्षक व्ही डीवडणे, सहाय्यक फौजदार बी. एस.कोचरगी, पो.हे. कॉ. एस. एस. मसवेकर, पो. ना. सी. डी. घाटगे, पो. हे. कॉ. शेळके, पो. ना.एन. टी. जाधव, पो. ना. नाईक, पो. कॉ.एम. आर. चिटणीस, पो. कॉ. ए. एन. पाटील, पो. कॉ. व्ही. एस. कांबळे, पो कॉ पी. एल. देवर्डे, पो. कॉ. ए. एम. हट्टी या पथकाने केली आहे असेही हारुगडे यांनी सांगितले.
याप्रकरणी पोलिसांनी तुकाराम उर्फ साईराज पांडुरंग पाटील व उमाजी नाईक या दोघांना ताब्यात घेतले आहे अन्य दोघांचा शोध सुरू आहे.

🟠🔴भाजपा नेत्याच्या शिवरायांवरील नव्या विधानानंतर संभाजीराजे संतापले; फडणवीसांचे नाव घेत म्हणाले “जमत नसेल तर…

भाजपाचे नेते तथा आमदार प्रसाद लाड यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म कोकणात झाला, असे विधान केले आहे. प्रसाद लाड यांच्या या विधानानंतर राष्ट्रवादी तसेच विरोधी पक्षाच्या नेत्यांनी आक्रमक पवित्रा धारण केला आहे. आता माफी मागून चालणार नाही. तर भाजपाने आता रगडून प्रायश्चित्त केले पाहिजे, अशी मागणी राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी केली आहे. तर दुसरीकडे माजी खासदार संभाजीराजे छत्रपती यांनीदेखील लाड यांच्या या विधानावर प्रतिक्रिया दिली आहे. लाड यांनी केलेले विधान बेजबाबदारपणाचे आहे. त्यांनी या वक्तव्याबाबत स्पष्टीकरण दिले पाहिजे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणात लक्ष घालावे. लाड यांच्या पक्षप्रमुखांनी त्यांना प्रशिक्षण दिले पाहिजे. ते जमत नसेल तर त्यांना महाराष्ट्रातून काढून टाकले पाहिजे, असे संभाजीराजे छत्रपती म्हणाले आहेत. ते ‘टीव्ही ९ मराठी’शी बोलत होते.
प्रसाद लाड यांचे विधान मी नुकतेच ऐकले. शिवाजी महाराज यांचा जन्म कोकणात झाला, असे ते म्हणत आहेत. हे दुर्दैव आहे. त्यांचा अभ्यास अपूर्ण आहे. प्रसाद लाड हे जबाबदार व्यक्तिमत्त्व आहेत. ते आमदार आहेत. मात्र शिवाजी महाराजांचा जन्म कोकणात झाल्याचे ते म्हणत आहेत. ही शरमेची बाब आहे. मी त्यावर काय बोलणार. त्यांनीच याबाबत उत्तर द्यावे. लाड यांच्या पक्षाच्या प्रमुखांनी त्यांना प्रशिक्षण दिले पाहिजे. त्यांना हे जमत नसेल तर त्यांना महाराष्ट्राच्या बाहेर काढून टाका,” अशी भूमिका संभाजीराजे छत्रपती यांनी घेतली.
प्रसाद लाड यांनी बेजबाबदार विधान केलेच कसे. लहान मुलांना शिवाजी महाराजांचा इतिहास शाळेतच शिकवणे गरजेचे आहे. प्रसाद लाड यांनी याबाबत स्पष्टीकरण दिले पाहिजे. इकडे शिवाजी महाराज आमचे आराध्य दैवत आहे. ते आमची अस्मिता आहेत, असे लाड म्हणतात. तर दुसरीकडे शिवाजी महाराज यांचा जन्म कोकणात झाला, असा दावा करतात. याबाबत त्यांनी स्पष्टीकरण दिले पाहिजे. नुसती माफी मागी मागून चालणार नाही. देवेंद्र फडणवीस यांनी यामध्ये लक्ष घालावे. देवेंद्र फडणवीस अभ्यासू आहेत,” अशी मागणीदेखील संभाजीराजे छत्रपती यांनी केली.
अमोल मिटकरी काय म्हणाले?
प्रसाद लाड यांच्या विधानानंतर राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी आक्रमक झाले आहेत. “सकाळ झाली की भाजपाचे लोक रोज एक बेताल व्यक्तव्य करत आहेत. अगोदर राज्यपाल यांनी महाराजांविषयी आक्षेपार्ह विधान केले. त्यानंतर सुधांशू त्रिवेदी, मंगलप्रभात लोढा यांनीदेखील वादग्रस्त विधान केले. त्यांनी शिवरायांवर वेगवेगळी वक्तव्यं करण्याची मालिकाच सुरू केली आहे. प्रसाद लाड यांनी नवाच जावई शोध लावला आहे. शिवरायांचा जन्म शिवनेरी किल्ल्यावर झाला. शिवरायांची राजधानी रायगड होती, असे आम्ही वाचत आलो आहोत. मात्र लाड म्हणत आहेत की शिवरायांचा जन्म कोकणात झाला. विशेष म्हणजे ते स्क्रीप्ट वाचून असे सांगत आहेत. म्हणजे उद्या गुजरात महोत्सव घ्यायचा असेल तर गुजरातच्या लोकांना खुश करण्यासाठी ते शिवरायांचा जन्म गुजरातच्या सुरतमध्ये झाला, असे म्हणतील. हे अत्यंत चुकीचे आहे. याला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे मूक समर्थन कारणीभूत आहे,” अशी टीका अमोल मिटकरी यांनी केली.
प्रसाद लाड काय म्हणाले?
‘संपूर्ण भारताचे आराध्य दैवत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्म कोकणात झाला. त्यानंतर रायगडावर त्यांचं बालपण गेलं. रायगडावर त्यांनी स्वराज्याची शपथ घेतली. त्यामुळे सुरुवात कोकणात झाली,’ असे विधान प्रसाद लाड यांनी केले.
News Source:-https://chat.whatsapp.com/JdTscwkK04n3RWNSijpnIq


