

मडिलगे येथे हत्तीचा धिंगाणा

सोलर सह शेती पिकांचे केले प्रचंड नुकसान

मडिलगे ( ता.आजरा) येथे हत्तीने प्रचंड धुमाकूळ घालत शेती पिकांचे नुकसान करण्याबरोबरच पाण्याच्या टाक्या व सोलर याचे प्रचंड नुकसान केले आहे.
गुरुवारी रात्री हत्तीने मडीलगे येथील शेती पिकांमध्ये प्रवेश करत संदीप शिवाजी आर्दाळकर, धोंडिबा जयराम कडगांवकर, विश्वास भाईंगडे, गीता भाईंगडे, काकासाहेब देसाई, आनंदा सुतार, संगीता ऱ्हाटवळ असे साधारण 45 ते 50 शेतकऱ्यांचे ऊस, भुईमूग, नाचणा, भात,काजू झाडे पाण्याच्या टाक्या व सोलर यंत्रणेचे मोठे नुकसान केले आहे.
परतीच्या पावसाने मेटाकुटीस आलेला शेतकरी वर्ग उरल्या सुरल्या पिकांची मळणी, कापणी करत असतानाच हत्तीचे पुन्हा एकदा मडिलगे येथील शेती पिकांमध्ये आगमन झाले आहे. यामध्ये हत्तीने केलेल्या नुकसानीने शेतकरी वर्ग धास्तावला असून हत्तीचा बंदोबस्त करण्याची मागणी पुन्हा एक वेळ होऊ लागली आहे.


प्राथमिक शिक्षणाचा अभ्यास पोलिस भरतीसाठी फायद्याचा : सुनिल हारुगडे
पेरणोलीत युवा भारतच्या वतीने मार्गदर्शन
शारीरिक तंदुरुस्तीसह चालू घडामोडींची माहिती,अवांतर वाचन आणि प्राथमिक शिक्षण अभ्यासक्रमाचा कसून अभ्यास पोलीस भरतीत नियुक्तीसाठी फायद्याचा असल्याचे प्रतिपादन आजरा पोलीस निरीक्षक सुनिल हारूगडे यांनी केले.पेरणोली ता आजरा येथे युवा भारत सामाजिक, सांस्कृतिक व शैक्षणीक संस्थेच्या वतीने पोलीस भरती मार्गदर्शन कार्यक्रमात ते प्रमूख मार्गदर्शक म्हणून बोलत होते.
हारुगडे म्हणाले,भरतीसाठी नम्रता, धाडस आवश्यक आहे.विविध विषयांचे प्रत्येकी एकाच पुस्तकाचे वाचन करावे. अभ्यासाचे नियोजन करणे आवश्यक आहे.अभ्यासातून उत्तर काढायचे कौशल्य निर्माण केले पाहिजे.धोका पत्करायची तयारी ठेवावी.मनावर ताण न घेता अभ्यास करावा.वाहून घेतल्याशिवाय यश मिळणार नाही. यावेळी शेळोलीकर म्हणाले,शारिरीक चाचणीत जादा गुण मिळवणे आपल्या हातात असल्याने त्यावर अधिक लक्ष द्यावे.मराठी, गणित व बुद्धिमत्तेचा अभ्यास महत्त्वाचा.स्वतामधील उणिवा शोधायला शिकला तर यश निश्चित मिळू शकते. मोबाईलचा वापर बंद करावा.यावेळी चेतन घाटगे यांनी मार्गदर्शन केले.
यावेळी संवादात्मक चर्चेमध्ये संस्थेचे सदस्य संतोष देसाई, विनायक कांबळे, शुभम लोंढे यांनी सहभाग घेतला.
याप्रसंगी अध्यक्ष पंकज देसाई,आकाश कांबळे,कृष्णा वांद्रे,पोलीस पाटील दिपाली कांबळे,पार्थ दोरूगडे,शुभम सुतार,स्वप्निल सावंत,रामदास कोडक,संतोष सावंत,मयुरेश देसाई,रोशन सावंत, मेघा येरूडकर, अपूर्वा सावंत यासह मोठ्या संख्येने तरुण, तरूणी उपस्थित होते. सूत्रसंचालन सुनिल कांबळे यांनी केले. प्रास्ताविक कृष्णा सावंत यांनी केले.आभार संतोष देसाई यांनी मानले.





