गुरुवार दिनांक २७ नोव्हेंबर २०२५
चिन्ह वाटप झाले…
प्रचाराचा जोर वाढला

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
आजरा नगरपंचायत निवडणूक प्रक्रियेतील महत्त्वाचा भाग असणारा चिन्ह वाटपाचा कार्यक्रम काल बुधवारी उमेदवार व आघाडी प्रमुखांच्या उपस्थितीत पार पडला.
निवडणूक चिन्ह घेताना अपक्ष उमेदवारांची तर देताना निवडणूक यंत्रणेची चांगलीच दमछाक झाली. विशेषत: अन्याय निवारण समितीच्या उमेदवारांना वेगवेगळी चिन्हे मिळाल्याने प्रचार यंत्रणेत मोठी तांत्रिक अडचण निर्माण झाली आहे. नगराध्यक्षपदाच्या उमेदवाराची चिन्ह वेगळे तर प्रभाग निहाय चिन्हही वेगवेगळे असा प्रकार अन्याय निवारण समितीच्या आघाडीबाबत घडला आहे.
चिन्ह मिळतात गेले काही दिवस चिन्हां व्यतिरिक्त शहरभर झळकलेले उमेदवारांचे प्रचार फलक पुन्हा एक वेळ नव्याने चिन्हासह झळकू लागले आहेत.
मातदारांपर्यंत चिन्ह पोहोचण्यासाठी प्रचार यंत्रणा जोरात सक्रिय झाली आहे.
प्रधानमंत्री आवास योजनेच्या उद्दिष्टपूर्तीकडे उत्तूरची भक्कम वाटचाल

उत्तूर : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
ग्रामीण भागातील कच्च्या घरांत राहणाऱ्या कुटुंबांना सुरक्षित पक्के घर उपलब्ध करून देण्यासाठी प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत उत्तूर गावात सुरू असलेल्या घरबांधणी कामांना गतिमानता मिळत आहे. २७६ चौरस फूट घरासाठी शासनाकडून टप्प्याटप्प्याने १४८००० रुपयांची मदत मिळत असून मंजूर घरकुलांची कामे चांगल्या गतीने पुढे सरकत आहेत.
२०२४–२५ मध्ये ६८ तर २०२५–२६ मध्ये १०२ अशी एकूण १७० घरकुलांची नावे मंजूर झाली आहेत. यापैकी ३० हून अधिक घरकुलांचे बांधकाम पूर्ण झाले असून १०० पेक्षा जास्त घरांची प्रगती ६०% पुढे गेली आहे. काही लाभार्थ्यांकडे हद्द, भाऊबंदकी व कोर्टमॅटरसारखे तांत्रिक अडथळे असल्यामुळे त्याबाबत निर्णय घेण्यासाठी विशेष बैठक आयोजित केली आहे.
योजनेच्या पूर्ण क्षमतेने अंमलबजावणीसाठी सरपंच किरण आमणगी, उपसरपंच समीक्षा देसाई, ग्रामसेवक प्रकाश पाटील, रोजगार सहाय्यक दादासो सावंत आणि सर्व ग्रामपंचायत सदस्य समन्वयाने प्रयत्न करत आहेत. ग्रामीण भागातील कुटुंबांचे पक्क्या घराचे स्वप्न साकार करण्यासाठी ही योजना महत्त्वाची ठरत आहे.
विविध संघटनाच्या व शैक्षणिक संस्थांच्या वतीने आजरा येथे संविधान दिन संपन्न.

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
आपले हक्क आणि अधिकार अबाधित ठेवण्यासाठी संविधान दिनाचे महत्व सर्वसामान्य लोकांच्यात पोहचवणे आवश्यक असलेचे मत संविधान दिना निमित्त झालेल्या कार्यक्रमात शशिकांत सावंत माजी विस्तार अधिकारी यांनी अध्यक्ष स्थानी असताना व्यक्त केले. सुरुवातीला फोटो पूजन व उद्देशिकाचे वाचन करण्यात आले.
स्वागत व सुत्रसंचालन भिकाजी कांबळे यांनी केले.
यावेळी सावंत यांनी बोलताना संविधानांची सर्वाना आवश्यकता असून, अन्याय सहन करण्यासाठी सुध्दा मर्यादा असते, जेष्ठ नागरिक याचे वय साठ की पासष्ट हा घोळ सुरू आहे. संविधानाचे महत्व व या दिवसासाठी सर्व संघटनाचे पदाधिकारी एकत्र आल्याने समाधान व्यक्त केले. डाँ. उल्हास त्रिरत्ने यांनी डाँ. बाबासाहेब आंबेडकर यानी मानव मुक्ती साठी सर्व जाती धर्माचा विचार करून संविधानाची निर्मिती केली. त्या अगोदर समाज काय अवस्थेत होता हे समजून घेण्यासाठी संविधान व कलमाच्यावर चर्चा आवश्यक असलेचे सांगितले.
काशिनाथ मोरे यानी सजीवसृष्टीला न्याय देण्याचे काम संविधानाने केले असून आरोग्य शिक्षण सर्वाना मोफत असताना, जाणीव पूर्वक रिक्त जागा ठेवून संविधानाची पायमल्ली होत असल्याचे सांगितले. यावेळी संदीप दाभिलकर, काँ. शांताराम पाटील,संतोष मासोळे, सुर्यकांत कांबळे, संजय घाटगे,समिर तकीलदार यानी मत व्यक्त केले.
यावेळी सुरेश दिवेकर, परसू कांबळे, विजय कांबळे, जालिंदर कांबळे, गिता कांबळे याच्या सह विविध संघटनेचे पदाधिकारी उपस्थिती होते. आभार विश्वास कांबळे यांनी मानले.
व्यंकटराव शिक्षण संकुल

व्यंकटराव शिक्षण संकुलामध्ये संविधान दिन साजरा करण्यात आला संविधानाच्या पुस्तक प्रतीचे पूजन प्रशालेचे प्राचार्य .एम. एम.नागुर्डेकर , व्यंकटराव प्राथमिकचे मुख्याध्यापक आर.व्ही. देसाई व सर्व शिक्षक- शिक्षिका, शिक्षकेतर कर्मचारी यांच्या उपस्थितीत करणेत आले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक एस.वाय.भोये यांनी केले व संविधानाबद्दल श्री.व्ही
.टी.कांबळे यांनी आपल्या मनोगतातून सविस्तर मांडले व सर्व विद्यार्थ्यांना आपल्या घरी संविधानाची एक प्रत असावी असे आवाहन केले. तसेच या संविधानाचे आपल्या जीवनातील महत्त्व तसेच संविधानाने संपूर्ण भारतातील जनतेला जात, पात, धर्म, पंथ विसरून आपण एक भारतीय आहोत याची जाणीव करून दिलेली आहे. म्हणूनच प्रदेशात आपण आपली प्रथम ओळख करून देताना आम्ही भारतीय आहोत असे अभिमानाने सांगतो. या संविधानाच्या विस्तृत अभ्यासपूर्ण लेखनासाठी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी घेतलेली अभ्यासपूर्ण मेहनत आपल्या विचारातून स्पष्ट केली. या
प्राचार्य एम.एम. नागुर्डेकर यांनीही संविधानाबद्दल आपले विचार मांडले. या कार्यक्रमासाठी सौ. ईलगे, श्रीम.एन.ए.मोरे , श्रीमत एस.टी. पाटील, सौ. व्ही. ए. वडवळेकर, सौ.ए.एस.गुरव उपस्थित होते.
पी.व्ही.पाटील यांनी आभार मानले..
कार्यक्रमाच्या शेवटी मुंबई येथील २६/१२ रोजीच्या अतिरेक्यांच्या भ्याड हल्ल्यात शहीद झालेल्या नागरिक व कर्मचारी यांना श्रद्धांजली वाहण्यात आली.
पंडित दीनदयाळ विद्यालय

पंडित दीनदयाळ विद्यालय आजरा मध्ये ‘ संविधान दिन ‘ साजरा करण्यात आला. संविधान दिनाची माहिती प्रकाश प्रभू यांनी सांगितली.
संविधान दिन म्हणजे काय ? तो का साजरा केला जातो? या दिवसाचे महत्त्व काय आहे ? डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना संविधानाचे शिल्पकार का म्हटले जाते ? डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी विविध देशांच्या संविधानाचा अभ्यास व चिंतन करून भारतीय संविधानाचा मसुदा तयार केला. २७ नोव्हेंबर १९४९ रोजी संविधानाला मान्यता देण्यात येऊन त्याचा स्वीकार करण्यात आला. म्हणून २६ नोव्हेंबर हा दिवस ‘ संविधान दिन ‘ म्हणून साजरा केला जातो. २६ जानेवारी १९५० पासून भारत प्रजासत्ताक झाला. या दिवसापासून संविधानातील तरतुदीनुसार देशाचा कारभार सुरू झाला.
मुख्याध्यापक संजीव देसाई यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेचे पूजन केले. कार्यक्रमासाठी विद्यार्थी , विद्यार्थिनी ,शिक्षक , शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
आजरा हायस्कूल

जनता शिक्षण संस्था संचलित आजरा हायस्कूलमध्ये संविधान दिन उत्साहात साजरा झाला.
मुख्याध्यापक श्री. ए. एल. तोडकर सर व उपमुख्याध्यापिका सौ. एच. एस. कामत मॅडम यांच्या हस्ते संविधान प्रत पूजन झाले.
श्री. व्ही. ए. पोतदार सर यांनी विद्यार्थ्यांना संविधानातील मूल्ये, कर्तव्ये तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे संविधान निर्मितीतील योगदान याची माहिती दिली.
कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी संविधान उद्देशिकेचे सामूहिक वाचन करत संविधाननिष्ठेचा संकल्प केला.
शिक्षक व विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत हा प्रेरणादायी सोहळा संपन्न झाला.


