रविवार २९ जून २०२५


सापडलेल्याला वारस नाही… वारस आहे ते सापडत नाहीत…

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
गुरुवार दिनांक १९ रोजी चित्री नदीपात्रात संताजी पुलाखाली सापडलेल्या मृत व्यक्ती नेमकी कोण याचा अद्याप उलगडा झालेला नाही. अनोळखी व बेवारस समजून त्या व्यक्तीच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
दरम्यान शुक्रवारी भाचा व पत्नीसमोरच चित्री नदी पात्रात पडलेल्या गुणाजी खामकर यांचा मृतदेह अद्याप सापडला नाही. गडहिंग्लज येथील आपत्ती व्यवस्थापनची मंडळी आली होती. परंतु पाण्याचा वेग इतका प्रचंड होता की त्यांच्या शोध कार्यावर मर्यादा येताना दिसत होत्या. अखेर हे शोध कार्य थांबवावे लागले.
एकीकडे आठवडाभरापूर्वी सापडलेल्याला वारस सापडले नाहीत… तर दुसरीकडे ज्यांना वारस आहेत ते सापडत नाहीत अशी अवस्था झाली आहे.

दिवसा विश्रांती… सायंकाळी पाऊस

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
सकाळपासून दुपारपर्यंत विश्रांती तर सायंकाळनंतर पुन्हा पहाटेपर्यंत पाऊस असा दिनक्रम सध्या पावसाचा सुरू आहे.
दुपारच्या सत्रातील विश्रांतीमुळे शेतकरी वर्ग शेतीकामात गुंतलेला दिसत आहे. जून मध्येच सर्फनाला प्रकल्पासह छोटे-मोठे पाझर तलाव व धरणे पूर्ण क्षमतेने भरली आहेत. मे महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यापासून सुरू झालेला मान्सूनपूर्व पाऊस व त्यानंतर मान्सूनने लावलेली सलग हजेरी यामुळे शेतकरी वर्गाला मोठा फटका बसला आहे.
तालुक्यामध्ये घरांची मोठ्या प्रमाणावर पडझड झाली आहे. तर अनेकांचे भातांचे तरवे वाहून गेले आहेत. एकंदर परिस्थिती पाहता पावसाने आता पूर्ण विश्रांती घेण्याची गरज आहे.

कोल्हापूर विभागातील जिल्ह्यांच्या वन प्रश्नासाठी स्वतंत्र चर्चा करावी : वनमंत्री नाईक यांच्या सूचना

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
कोल्हापूर वन अधिकारी यांनी बैठक घेऊन कोल्हापूर, सांगली, सातारा, सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी या पाच जिल्ह्यातील प्रश्नांची स्वतंत्र चर्चा करावी असे निर्देश वनमंत्री गणेश नाईक यांनी काल पुणे येथे झालेल्या बैठकीत दिले. यावेळी राज्याच्या मुख्य वनसरंक्षक शौमिता बिस्वास, कॉ. संपत देसाई, प्रतिभा शिंदे, अविनाश भाले, राजेंद्र कांबळे, किरण लोहकरे, राहुल कदम यांच्यासह वन विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. अशी माहिती प्रकाश मोरुस्कर यांनी दिली.
यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या आदिवासी विकास केंद्राच्यावतीने शरद पवार यांच्या सुचनेनंतर आज पश्चिम महाराष्ट्र, कोकण आणि अहिल्यानगर येथील वन हक्कावर काम करणाऱ्या जनसंघटना आणि संस्थांच्या प्रमुख कार्यकर्त्यांची व्यापक बैठक बोलावली होती. वन हक्काचे दावे दाखल केल्यानंतर वनविभागाकडून योग्य सहकार्य मिळत नाही. कांही दावे फेटाळले जातात त्याबाबत सहकार्य करण्याचे निर्देश मंत्री महोदयांनी दिले.
आजरा, चंदगड, भूदारगड, दोडामार्ग, सावंतवाडी या कर्नाटक हद्दी लगत असलेल्या तालुक्यात हत्तीकडून पिकांची मोठ्या प्रमाणात पिकांची नुकसान होत असते. हत्ती, गवे, सांबर, रानडुक्कर यासारख्या वन्य प्राण्यांपासून पिकांच्या नुकसानी बरोबर माणसांच्यावर हल्ले पण होत आहेत. त्यात अनेकांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. यासंदर्भात कायमस्वरूपी ठोस उपाययोजना म्हणून जंगलाच्या समृद्धीकरणाची मोहीम हाती घेतली पाहिजे याबाबत कोल्हापूर वनवृत अधिकारी यांनी कोल्हापूर सांगली, सातारा, सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्यातील प्रमुख कार्यकर्त्यांची बैठक घ्यावी असे निर्देश मंत्री महोदयांनी दिले.
याबरोबरच या बैठकीत वन हक्क दाव्यांच्या अडचणी सोडवून पालघरच्या धर्तीवर पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणात वेगाने या कायद्याची अंमलबजावणी करण्यासाठी वनमंत्री श्री. नाईक यांनी सर्व अधिकाऱ्यांना सूचना दिल्या.

प्रा. लता शेटे यांना भौतिक शास्त्रातील पीएचडी
आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
आजरा महाविद्यालयातील प्रा.सौ.लता दिनेश शेटे यांनी भौतिकशास्त्रातील,” फोटो इलेक्ट्रो कॅटलेटिक डिग्रेडेशन ऑफ ऑरगॅनिक इम्प्युरिटीज युजिंग नॅनो क्रिस्टलाइन अल्युमिनियम डोपड कॅडमियम सेनेनाईड/टीटॅनियम डायॉक्साईड थीन फिल्म्स” या विषयातील शोधप्रबंध शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर येथे सादर केला होता. या अनुषंगाने शिवाजी विद्यापीठाने त्यांना नुकतीच पीएच डी. पदवी प्रदान केली.
सौ.शेटे यांचा या विषयाचा शोधनिबंध आंतरराष्ट्रीय शोधपत्रिकेमध्ये प्रसिद्ध झाला आहे. तसेच या विषयाचे संशोधन पोस्टर व पेपरही प्रकाशित झाले आहेत. प्रोफेसर डॉ. शिवानंद मस्ती, डॉ. घाळी कॉलेज गडहिंग्लज यांच्या मार्गदर्शनाखाली हे काम पूर्ण करण्यात आले. तसेच न्यू कॉलेज कोल्हापूर येतील भौतिकशास्त्र विभागाचे माजी विभागप्रमुख डॉ. श्री. महादेव शेडम,शिवराज कॉलेज चे प्रा.डॉ. राकेश शेडम यांचे मार्गदर्शन लाभले व आजरा महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. ए. एन. सादळे, कार्यालय अधिक्षक श्री. योगेश पाटील व जनता एज्युकेशन सोसायटी चे अध्यक्ष श्री. अशोकअण्णा चराटी व सर्व संचालक यांचेही सहकार्य लाभले.

ऋग्वेद चिल्ड्रन रिलीफ फंडाचे कार्य आता शाहूवाडीतही…

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
चैतन्य सृजन व सेवा संस्था आजरा यांचेमार्फत आर्थिक विवंचनेमुळे शिक्षणामध्ये अडथळे निर्माण होणाऱ्या विद्यार्थ्यांना, अनाथ विद्यार्थ्यांना आणि दुर्गम, डोंगराळ भागांतील धनगरवाडे, लमाण वसाहतीतील शाळांमधील विद्यार्थ्यांना दर वर्षी शाळेच्या प्रथम दिनीच शैक्षणिक साहित्य सन २०११ पासून दिले जाते. आत्तापर्यंत हे आजरा, गडहिंग्लज, चंदगड व सिंधुदुर्ग जिल्ह्यातील काही भागापर्यंत मर्यादित होतं, परंतु मासिक ऋग्वेदचे संपादक सुनील सुतार केंद्र प्रमुख पदोन्नतीने शाहूवाडी तालुक्यात कार्यरत झाल्याने या तालुक्यातील म्हाळसवडे व सुका माळ येथील दोन धनगरवाड्यांच्या शाळांमधील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचा लाभ या वर्षी शैक्षणिक वर्षाच्या पहिल्या सप्ताहातच दिलेला आहे.
या प्रसंगी गटशिक्षणाधिकारी डाॅ. विश्वास सुतार, सुनील सुतार मुख्याध्यापक कोकाटे शिक्षण विस्तार अधिकारी सदाशिव थोरात, केंद्र प्रमुख प्रकाश काळे, शिवराम मावची, गोपाळ जगताप लाभार्थी शाळेचे शिक्षक व विद्यार्थी आदि उपस्थित होते.

आरोग्य मंत्री आबिटकर यांच्या वाढदिवसानिमित्त विविध कार्यक्रम

महाराष्ट्र राज्याचे सार्वजनिक आरोग्य व कुंटुंब कल्याण मंत्री तथा पालक मंत्री ना. प्रकाश आबिटकर यांचा ३० जून रोजी वाढदिवस आहे. त्या निमित्य आजरा तालुका शिवसेनेच्या वतीने आजरा शहरातील अनाथ मुलांना शालेय कीट वाटप नामदार प्रकाश आबिटकर यांच्या संपर्क कार्यालयात करण्यात येणार आहे. त्याच बरोबर सायंकाळी श्री राम मंदीर येथे त्यांना दिर्घायुष्य लाभण्यासाठी महा आरती करण्यात येणार आहे.
सदरचे कार्यक्रम उप जिल्हा प्रमुख राजेंद्र सावंत ,तालुका प्रमुख संजय पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत व कोअर कमीटीच्या नियोजना खाली संपन्न होणार आहेत. शहरातील नागरीकांनी मोठया संख्येने उपस्थीत रहावे असे आवाहन श्री. विजय थोरवत शहर प्रमुख व श्री. मंदार बिरजे युवासेना तालुका प्रमुख यांनी केले आहे.

फोटो क्लिक…




