मंगळवार दिनांक ८ एप्रिल २०२५



पेरणोली येथील आगीत पाच लाखाचे नूकसान
नुकसान भरपाईची मागणी

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
पेरणोली ता. आजरा येथील जंगलाजवळील शेतात काल सोमवारी दुपारी अचानक आग लागून २५ एकरातील काजू बाग व मेसकाठी जळून खाक झाली यामध्ये सुमारे पाच लाखाचे नूकसान झाले आहे.
येथील कुरकुंदेश्वर महसूल मधील टेक नावाच्या शेतात विठ्ठल जाधव यांचे ५०० काजूच्या झाडांचे, ५०० आंबे व ५००० मेसकाठीचे नूकसान झाले.तर सदाशिव सावंत, पांडुरंग सावंत, संपत जाधव, नेताजी देसाई यांचेही काजू व मेसकाठीचे नूकसान झाले आहे.त्यामुळे तातडीने नूकसान भरपाई देण्याची मागणी करण्यात येत आहे.
यापूर्वी दाभेवाडी, पेद्रेवाडी,इटे येथेही मोठ्या प्रमाणात काजूची झाडे, ठिबक सिंचनचे नूकसान झाले आहे.आगीत काजू, मेसकाठीचे सातत्याने नूकसान होत असल्याने उपाय योजना करण्याची गरज व्यक्त होत आहे.


आज राजेंची मूर्ती काढणार...

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
आजरा शहरातील छत्रपती शिवरायांच्या नवीन अश्वारूढ मूर्तीच्या लोकार्पणाची तयारी जोरात सुरू झाली असून २८ ते ३० एप्रिल दरम्यान होणाऱ्या या कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर कित्येक आंदोलनाची साक्षीदार असणारी छत्रपती शिवरायांची जुनी मूर्ती काढण्यात येणार आहे.


गव्याचा हल्ला..
जखमीची प्रकृती स्थिर

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
काल सोमवारी सकाळी शेळ्या चारवण्यासाठी गेलेल्या सोहाळे ता. आजरा येथील चंद्रकांत भिकू कोंडुसकर (वय ४८) यांच्यावर खरीट शेत नावाच्या शेतामध्ये अचानक दोन गव्यांनी हल्ला केला. यात ते गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर आजरा ग्रामीण रुग्णालयात प्राथमिक उपचार करून त्यानंतर त्यांना उपचारासाठी गडहिंग्लजला हलवण्यात आले आहे.त्यांची प्रकृती स्थिर असून त्यांना अतिदक्षता विभागात ठेवण्यात आले आहे.
वनविभागाचे अधिकारी त्यांच्या प्रकृतीवर लक्ष ठेवून आहेत.


शेतकरी, कामगारांच्या मागण्यांची पूर्तता करा
शिवसेना उबाठाची मागणी
‘आजरा’ च्या कार्यकारी संचालकांना निवेदन

मृत्युंजय : महान्यूज वृत्तसेवा वृत्तसेवा
शेतकरी व कामगारांच्या मागण्यांची पुर्तता करावी अशी मागणी शिवसेना उध्दव माळासाहेब ठाकरे पक्षाने केली आहे याबाबतचे निवेदन वसंतराव देसाई आजरा साखर कारखान्याचे कार्यकारी संचालकाना दिले आहे.
निवेदनात म्हंटले आहे…
आजरा कारखान्याला राष्ट्रीय सहकार विकास निगम (एनसीडीसी) कडून १२२ कोटीचे कर्ज मंजूर झाले आहे याबाबत अध्यक्ष संचालकांचे अभिनंदन आहे. मिळालेल्या कर्जाचे नियोजन आपल्याकडून व्हावे. आजरा कारखाना अडचणीत असताना कामगारांनी पन्नास टक्के पगारामध्ये कपात स्विकारली आहे. टप्प्याटप्प्याने पगारवाढ करावयाची आहे. त्यांचा करार संपला आहे. त्यांना पूर्ण वेतन मिळावे. सभासद व उस उत्पादकांना साखर लवकरात लवकर द्यावी .अशी मागणीही
बाळासाहेब ठाकरे पक्षाने केली आहे.
याबाबतचे निवेदन बसंतराव देसाई आजरा साखर कारखान्याचे कार्यकारी संचालकांना दिले आहे.
निवेदनावर शिवसेना उबाठाचे तालुका प्रमुख युवराज पोवार, शिवाजी आढाव, दयानंद भोपळे यांच्यासह पदाधिकाऱ्याच्या सहया आहेत.


खेडे येथे दि. १८ पासून अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन
१८ ते २५ एप्रिल रोजी होणार सप्ताह

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
खेडे येथे दि. १८ ते २५ एप्रिल रोजी ज्ञानेश्वरी पारायण व अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. येथील ग्रामदैवत केदारलिंग मंदिरामध्ये हा सोहळा पार पडणार आहे. मुख्य प्रवर्तक व व्यासपीठ अधिकारी म्हणून ह.भ.प आनंदराय घोरपडे महाराज राहणार आहेत.
दि. १८ रोजी सकाळी ९ वाजता ज्ञानेश्वरी माऊलींच्या प्रतिमेची व पालखीची नगर प्रदक्षिणा काढून सोहळ्याला सुरवात करण्यात येणार आहे. खेडे येथील या सप्ताह सोहळ्याचे यंदाचे रौप्यमहोत्सवी वर्ष आहे.
हरिनाम सप्ताह काळात दररोज सकाळी ४.३० ते ६.३० या वेळेत काकडा आरती, सकाळी ८ ते १२ व दुपारी २ ते ५ या काळात ज्ञानेश्वरी पारायण, सायंकाळी ५ ते ५.३० तुकाराम गाथा भजन, सायंकाळी ५.३० ते ६.३० हरीपाठ, सायंकाळी ७ ते ८ प्रचचन, रात्री ९ ते ११ किर्तन तर त्यानंतर पहाटे ४ वाजेपर्यंत भजन असा कार्यक्रम होणार आहे.
या सोहळ्यात ह.भ.प शिवाजी सुतार (भादवण), ह.भ.प. दत्तात्रय सावंत (पेरणोली), ह.भ.प. अर्जुन जायव (शिप्पुर, निपाणी), किरण खटावकर (संकेश्वर), शामराव शिंदे (हासुर बु), श्रीधर जाधव (साळगाव), ह.भ.प. आनंदराव घोरपडे (सुलगाव) यांचे किर्तन होणार आहे. तसेच शुक्रवार दि. २५ रोजी सकाळी ८ वाजता ह.भ.प आनंदराव घोरपडे यांचे काल्याचे किर्तन झाल्यानंतर महाप्रसाद वाटप होणार आहे. सायंकाळी ५ वाजता पालखी सोहळा पार पडणार आहे या सोहळ्याला उपस्थित राहण्याचे आवाहन ग्रामस्थ मंडळ खेडे, वारकरी सांप्रदाय व सर्व तरूण मंडळे, खेडे व मुंबई, ग्रामस्थ खेडे यांच्यावतीने करण्यात आले आहे.

सहकार भारतीच्या आजरा तालुका संपर्कप्रमुखपदी रमेश कारेकर

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
सहकार भारतीच्या आजरा तालुका संपर्कप्रमुखपदी येथील आजरा मर्चंटस् क्रेडीट सोसायटीचे चेअरमन रमेश कारेकर यांची निवड करण्यात आली. सहकार क्षेत्रातील त्यांनी केलेल्या कार्याची दखल घेऊन सहकार भारतीच्या जिल्हा कार्यकारणीने ही निवड केली आहे.
या निवडीनंतर कारेकर यांचा सत्कार संस्थेचे व्हा. घेअरमन सुरज जाधव पांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी संचालक दिवाकर नलवडे, शिवलिंगाप्पा तेरणी, रुद्राणा पाटील, ऋषिकेश महाळंक, गोपाळ जाधव, उमा हुक्केरी, स्मिता टोपले, व्यवस्थापक गोपाळ पाटील यांच्यासह कर्मचारी उपस्थित होते.

आज विशेष …
सरपंच आरक्षण सोडत
वेळ: दु.३.०० वाजता
स्थळ : नूतन प्रशासकीय इमारत सभागृह, तहसील कार्यालय, आजरा


