बुधवार दि. ११ डिसेंबर २०२४

इंडिया – महाविकास आघाडीच्या वतीने सोमवारी ईव्हीएम विरोधात मोर्चा

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीमधील राधानगरी-भुदरगड मतदार संघातील महायुतीच्या उमेदवाराचा विजय हा ईव्हीएम मशीनचा विजय आहे, महाविकास आघाडीच्या सर्वच घटक पक्षांच्या कार्यकर्त्यांनी अतिशय चांगल्या पद्धतीने काम केले असून केवळ मशीन मुळे आपण हरलो. पुन्हा एकदा नव्या जोमाने संघटित होऊन कामाला लागूया आणि पंचायत समिती व जिल्हा परिषद निवडणूकीसह येणाऱ्या निवडणुकींना ताकदीने सामोरे जाऊन विजय खेचून आणूया असे आवाहन माजी आमदार के. पी. पाटील यांनी केले. आजरा येथे आयोजित इंडिया- महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांच्या बैठकीत होते. बैठकीमध्ये सोमवार दिनांक १६ डिसेंबर रोजी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यापासून ईव्हीएम विरोधात मोर्चा काढून संभाजी चौकामध्ये ठिय्या आंदोलन करण्याचा निर्णय घेण्यात आला.
यावेळी बोलताना कॉ.संपत देसाई म्हणाले, निवडणूक प्रक्रिया पाहिल्यास देशामध्ये हुकूमशाहीच्या पद्धतीने राज्यकर्त्यांची वाटचाल सुरू असल्याचे दिसत आहे. सत्तेसाठी कोणत्याही थराला जाऊन कोणताही मार्ग अवलंबण्याचे धोरण दिसत असून लोकशाहीचे अस्तित्व कायम ठेवण्यासाठी ईव्हीएम विरोधातील लढा तीव्र करण्याची गरज आहे.
राष्ट्रवादी शरद पवार गटाचे तालुकाध्यक्ष मुकुंदराव देसाई म्हणाले, कार्यकर्त्यांनी पराभवाने खचून जाऊ नये. असे अनुभव यापुढे येणार नाहीत यासाठी आतापासूनच दक्षता घेण्याची गरजही त्यांनी बोलून दाखवली.
यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख प्रा. सुनील शिंत्रे जिल्हा बँकेचे संचालक सुधीर देसाई यांचीही भाषणे झाली.
बैठकीस शिवसेना जिल्हा उपाध्यक्ष संभाजी पाटील, माजी पंचायत समिती सभापती उदय पवार, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष उमेश आपटे, राजू होलम, नौशाद बुडृडेखान, गोविंद पाटील, कॉ. शांताराम पाटील, रविंद्र भाटले, शिवाजी आढाव, जोतिबा चाळके, दिनेश कांबळे, नारायण भडांगे, महादेव होडगे महादेव गुरव,अमित गुरव,रंगराव माडभगत, समीर चांद ( शिवसेना ) यांच्यासह इंडिया- महाविकास आघाडीच्या घटक पक्षांचे कार्यकर्ते उपस्थित होते.
आभार शिवसेना तालुकाप्रमुख युवराज पोवार यांनी मानले.
शिवसेना शिंदे गटाकडून आजरा आगाराला विविध मागण्यांचे निवेदन

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळाचे आजरा आगार व्यवस्थापक पाटील यांची आजरा शिवसेना पदाधिकारी (शिंदे गट) यांनी भेट घेऊन विविध मागण्यांचे निवेदन दिले.
संकेश्वर-आंबोली महामार्गाच्या बांधणी आणि मजबुतीकरणाचे काम अपुर्ण आवस्थेत आहे. सदर मार्गावर पुर्वी निवारा शेड उपहारगृहा सुरु होती परंतू रस्त्याची बांधणी करते वेळी निवारा शेडचे डिझाईन चुकीच्या पद्धतीने केले असून आजरा तालुक्यामध्ये पावसाचे प्रमाण मोठ्या प्रमाणात असून सदर शेडचा उन्हाळी आणि पावसाळी कालावधीत प्रवाशांना कांहीही उपयोग होत नाही. त्याच बरोबर रस्ता बांधणी करतेवेळी नागमोडी वळणे काढल्यामुळे अंतर कमी झालेल आहे आजरा ते गडहिंग्लज साधारण २ .५ किमी अंतर कमी झालेल आहे. अंतर कमी झाल्याने तिकीट दर कमी होणे गरजेच आहे. परंतू महामंडळाने आहे तेच तिकीटदर कायम ठेवले आहेत ते कमी व्हावेत अशी मागणी करण्यात आली आहे.
शिवसेना तालुका प्रमुख संजय पाटील, उपजिल्हा प्रमुख राजू सांवत, शहरप्रमुख विजय थोरवत यांच्या नेतृत्वाखाली निवेदन देणेत आले.
या प्रसंगी युवासेना पदाधिकारी मंदार बिरजे, सुधाकर पाटील, शेळप उपसरपंच, दयानंद निऊंगरे, सुधीर जाधव शिवसैनिक उपस्थित होते.
आजरा न्यायालयात शनिवारी लोक अदालत

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
आजरा येथील कनिष्ठ स्तर दिवाणी न्यायालयात शनिवार दि. १४ डिसेंबर रोजी राष्ट्रीय लोक अदालत आयोजित करण्यात आली आहे. या लोकन्यायालयात दाखलपूर्व प्रकरणे व न्यायालयात प्रलंबित खटले ठेवण्यात येणार आहेत.
पक्षकारांमध्ये आपसात तडजोडीने अधिकाधिक खटले निकाली झाल्यास पक्षकारांचा वेळ व पैसा यांची बचत होणार आहे. या लोकअदालतीमध्ये अधिकाधिक तडजोडपात्र प्रकरणे ठेवून लोक अदालत यशस्वी करावी. तसेच लोकअदालती बाबतच्या अधिक माहितीसाठी आजरा तालुका विधीसेवा समितीचे अध्यक्ष आर. पी. थोरे, आजरा तालुका बार असोशिएशनचे अध्यक्ष ॲड. शैलेश देशपांडे यांनी केले आहे.
भारतीय समाजात सलोखा निर्माण होण्यासाठी मानवाधिकार दिनानिमित्त संकल्प आवश्यक : संतोष नागटिळक

नेसरी : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
नेसरी ता.गडहिंग्लज येथे मानव अधिकार दिनानिमित्त सलोखा रॅली व सभा पार पडली .
रॅलीची सुरुवात संतोष नागटिळक, गटविकास अधिकारी व सरपंच गिरीजादेवी शिंदे-नेसरीकर,मुख्य मार्गदर्शक अमित प्रभा वसंत,रमेश शिंगे व इतर मान्यवरांच्या हस्ते सरसेनापती प्रतापराव गुजर यांच्या पुतळ्याला अभिवादन करून सुरू करण्यात आली. रॅली येऊन छ.शिवाजी महाराज पुतळा महाराजांना अभिवादन करून त्यानंतर सभा झाली .
सभेची सुरुवात संविधानाच्या प्रास्ताविकेचे वाचन करून झाले.उद्घाटनपर भाषणात संतोष नागटिळक यांनी मानवाधिकार दिनाचे महत्त्व सांगितले.भारतीय समाजात सलोखा निर्माण होण्यासाठी खऱ्या अर्थाने मानवाधिकार दिना निमित्त संकल्प केला पाहिजे तसेच संविधानाच्या संवर्धनासाठी आपण सलोखा सभा घेणे ही गरजेचे गोष्ट आहे.महिलांसाठी पंचायत समितीच्या वतीने ज्या योजना आहेत यासाठी मदत करू. आपल्या न्याय हक्कासाठी त अर्ज करावेत. ज्या ज्या योजना आहेत त्या योजनेसाठी पात्र असाल त्या योजनेचे लाभ मिळवून देण्यास प्रयत्नशील असल्याचे सांगितले.
सरपंच गिरीजादेवी शिंदे- नेसरीकर म्हणाल्या, घरेलू कामगार ,परितक्त्या ,विधवा,अपंग व इतर महिलांसाठी जो संघर्ष सुरू केला आहे तो संघर्ष खूप महत्त्वपूर्ण आहे. मानव अधिकारदिनानिमित्त याचा आवाज बुलंद होत आहे.
संग्राम सावंत म्हणाले, की,कष्टकरी वर्गाच्या महिलांच्या न्याय हक्कासाठी, घरेलू कामगार यांना कामगार म्हणून दर्जा नाही. तसेच महिलांच्या वेगवेगळ्या प्रश्नांवर आवाज बुलंद करण्यासाठी व संविधानाच्या संवर्धनासाठी आता आपल्याला एकत्र येऊन लढा उभा करावा लागणार आहे. सभेमध्ये भारतीय समाजात सलोखा निर्माण होण्यासाठी संविधानाचा जागर करणे,कष्टकरी महिलांसाठी संघर्ष उभा करून त्यांच्या मुक्तीसाठी लढा उभा करणे यासह विविध ठराव करण्यात आले.
यावेळी अमित प्रभा वसंत, प्रकाश मुरकुटे, किरण हिडदुगी, रामचंद्र परीट, स्नेहल नावलगी, ज्योती देसाई, शांता सुतार ग्रामपंचायत सदस्य ,रमेश शिंगे, बाळू कांबळे, संजय कांबळे,विनायक कांबळे, हेमंत आयवळे, राहूल दास घरेलू संघटना राज्य सदस्या लक्ष्मी कांबळे, भारती पवार,सारिका चव्हाण, मलप्रभा जामुने, सुनिता ढवळे, उषा कांबळे, रेश्मा कांबळे, बरकत मुजावर, मंगल कांबळे,अनुसया कांबळे, मीरा हरणे, सुजाता नार्वेकर यांच्यासह महिला व पुरुष उपस्थितीत होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुभाष कांबळे यांनी केले.तर प्रास्ताविक लक्ष्मी कांबळे यांनी केले .
आम.शिवाजीराव पाटील यांचा आजपासून आभार दौरा

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
चंदगड विधानसभा मतदारसंघाचे नवनिर्वाचित आमदार शिवाजीभाऊ पाटील यांच्या आभार दौऱ्याचे आज बुधवार दिनांक ११ डिसेंबर पासून शुक्रवार दिनांक १३ डिसेंबर पर्यंत आयोजन करण्यात आले आहे.
आज बुधवार दि. ११ रोजी तुर्केवाडी जि. प. व माणगांव पं. स. मतदारसंघात सकाळी ११ वाजता स्वराज्य मल्टिपर्पज हॉल, कारवे येथे सत्कार समारंभ होणार आहे.सायंकाळी ४.०० वाजता कोवाड येथे तर ७.३० वाजता शिक्षक कॉलनी कारवे येथे शिक्षक संघटनांच्या वतीने सत्कार होणार आहे.
गुरुवार दि. १२ रोजी नूल, हलकर्णी, महागाव जिल्हा परिषद मतदारसंघात दुपारी १२ ते सायंकाळी ४ वाजता हनुमान मंदिर जवळील हॉल,नूल येथे सायंकाळी ६ वाजता साखरे मंगल कार्यालय, नेसरी येथे कार्यक्रम होणार आहे.
शुक्रवार दि. १३ रोजीसकाळी ११ वाजता न्यू इंग्लिश स्कूल, चंदगड येथे क्रिडा महोत्सव उद्घाटन व हेरे येथे सकाळी ११.३० वाजता व
कोळींद्रे जिल्हा परिषद मतदारसंघातील वाटंगी येथे दुपारी २ वाजता उपस्थित राहणार आहेत.





