
एसटी बसचे आजऱ्यातून आरक्षण बंद
प्रवासी वर्गात संताप

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
आजरा बस स्थानकातून यापूर्वी विविध मार्गावर धावणाऱ्या बस फेऱ्यांचे प्रवासी आरक्षण केले जात होते. अचानकपणे महामंडळाने हि सुविधा आजरा येथे बंद केली असून आता आरक्षणासाठी गडहिंग्लज किंवा कोल्हापूरला जाण्याशिवाय प्रवाशांना पर्याय नाही. महामंडळाच्या या निर्णयामुळे प्रवासी वर्गात संतप्त प्रतिक्रिया आहेत.
आजरा बस स्थानकावरून प्रवासासाठी कोठेही जाताना आरक्षणाची सुविधा करण्यात आली होती. वर्षांनुवर्षे सुरू असलेली ही सुविधा अचानकपणे रद्द करण्याचा निर्णय एस.टी. महामंडळाने घेतला. या निर्णयाचा फटका आता प्रवासी वर्गाला बसू लागला आहे. आरक्षणासाठी गडहिंग्लज किंवा कोल्हापूरला जावे लागत आहे. केवळ एसटीच्या प्रवासाकरता आरक्षणासाठी गडहिंग्लज येथे जाणे व तिथून आरक्षण करणे हे खर्चिक व वेळखाऊ असल्याने निश्चितच योग्य नाही. एस.टी. महामंडळाने प्रवासी वर्गाची अडचण लक्षात घेऊन हे आरक्षण पूर्ववत आजरा येथूनच सुरू करावे अशी मागणी प्रवासी वर्ग करत आहे.

आंदोलनांच्या इशाऱ्यानंतर तातडीने महामार्गाचे काम सुरू

आजरा: मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
आजरा शहर अन्याय निवारण समिती व शिवसेना ( उबाठा गट ) यांनी संकेश्वर- बांदा महामार्गावरील संभाजी चौक ते बस स्थानक परिसरातील रस्त्याचे रेंगाळलेले काम तातडीने सुरू न केल्यास आंदोलनाचा इशारा दिला होता. आंदोलनाचे हत्यार उपसताच तातडीने रस्त्याचे काम सुरू करण्यात आले आहे.
गेले दोन महिने रस्ता करण्यासाठी खुदाई करून अर्धवट अवस्थेत काम ठेवल्याने एसटी बस चालक, स्थानिक नागरिक व इतर वाहनधारक यांना या भागातून जाताना बऱ्याच कसरती कराव्या लागत होत्या. काम रेंगाळल्याबद्दल शहरवासीयांकडून संतप्त प्रतिक्रिया उमटत होत्या. या पार्श्वभूमीवर स्थानिक अन्याय निवारण समिती व शिवसेनेने आंदोलनाचा इशारा दिला होता. आंदोलनाच्या या इशाऱ्यानंतर तातडीने रस्त्याचे उर्वरित काम सुरू करण्यात आले आहे.

रस्त्याशेजारील जुन्या झाडांच्या फांद्या तोडण्याची गरज

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
आजरा तालुक्यातील विविध मार्गावर रस्त्याशेजारील अनेक झाडे धोकादायक स्थितीत उभी आहेत जोराचे वारे व पाऊस आल्यास ही झाडे रस्त्यावर कोसळण्याची शक्यता असून या झाडांच्या फांद्या वनविभागाने तातडीने तोडून संभाव्य धोका टाळण्याची गरज निर्माण झाली आहे.
तालुक्यातील ग्रामीण भागामध्ये राज्य व ग्रामीण मार्गावरील रस्त्याशेजारी अनेक झाडे वाकलेल्या स्थितीत व धोकादायक पद्धतीने उभी आहेत. वादळी पावसामध्ये बऱ्याच वेळा यापैकी अनेक झाडांच्या फांद्या तुटून, झाडे पडून वाहतुकीचा खोळंबा होताना दिसतो. यामुळे रस्त्या शेजारील असणारी ही धोकादायक झाडे काढून घेण्याची गरज आहे.

ऊस उत्पादक शेतकऱ्यांना अल्प दरात साखर द्या… शेतकऱ्यांची मागणी

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
आजरा साखर कारखान्याच्या ऊस उत्पादक शेतकऱ्यांना कित्येक वर्षे सभासद असूनही सवलतीच्या दरातील साखर मिळत नाही. मासिक पाच किलो याप्रमाणे प्रतिवर्षी साठ किलो इतकी साखर अल्प दराने कारखान्याने शेतकऱ्यांना पुरवठा करावी अशी मागणी उत्पादक शेतकऱ्यांनी वसंतराव देसाई आजरा साखर कारखान्याकडे लेखी पत्र देऊन केली आहे.
पत्रावर सुरेश शिंगटे, आप्पासो कुराडे, गणपती कानडे, शामराव खुळे,बाळू तेजम, एकनाथ गिलबिले, विजय देसाई, अशोक जाधव आधी ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या सह्या आहेत.

