

पाणी, महामार्ग प्रश्नी शिवसेना उद्या रस्त्यावर

आजरा: मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
गेले अनेक महिने आजरा शहरातील नागरिकांना पाणी पुरवठा सुरळीत नसल्याने लोकांचे पाण्याविना हाल होत आहेत. नगरपंचायतीला वारंवार लेखी, तोंडी सूचना देवूनही प्रशासनाने दुर्लक्ष केले आहे.आंबोली मार्गावरील भाई- भाई थिएटर ते तहसिल कार्यालय पर्यंतचे काम रखडले आहे.यामुळे वाहतूकीची समस्या निर्माण झाली आहे.किरकोळ अपघात होत आहे. व्यावसायिक व नागरिकांना धुळीचा त्रास सहन करावा लागत आहे.महामार्ग ठेकेदाराचे याकडे दुर्लक्ष आहे.
शहरभर सर्वत्र खुदाई केली आहे. ठिकठिकाणी मनमानी पद्धतीने पार्किंग केले जात असल्यामुळे शहरवासीयांचे प्रचंड हाल सुरू आहेत याच्या निषेधार्थ सोमवारी सकाळी ११ वाजता शिवसेना (ठाकरे गट) यांच्या वतीने संभाजी चौकात रास्ता रोको करण्यात येणार आहे.
आजरा पोलिस स्टेशनमध्ये निवेदन देण्यात आले आहे.निवेदनावर उपजिल्हा प्रमुख संभाजी पाटील, तालुका प्रमुख युवराज पोवार,शहर प्रमुख ओमकार माद्याळकर, समीर चांद, भिकाजी विभुते, महेश पाटील यांच्या सह्या आहेत.

मूरगुड प्रकरणाचा आज-यात निषेध… कारवाईची मागणी

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
शिवसेना (शिंदे गट) जिल्हाध्यक्ष राजेखान जमादार यांनी मुरगूड येथील पत्रकार प्रकाश तिराळे यांना बातमी दिली कारणाने मारहाण केली.आजरा तालुक्यातील पत्रकार व कोल्हापूर डिस्ट्रिक्ट रिपोर्टर्स वेल्फेअर असोसिएशनच्या आजरा शाखेच्या वतीने वतीने याचा निषेध करण्यात आला. मारहाण करणाऱ्या संबंधितांवर कारवाई व्हावी अशी मागणी करण्यात आली.याबाबतचे निवेदन आजरा पोलिस स्टेशन व तहसिलदार यांना देण्यात आले.
पत्रकारिता आणि लोकशाहीला मारक ठरणारी ही घटना असून पत्रकारांवर दहशत निर्माण करण्याचा हा जाणिवपूर्वक प्रयत्न आहे. तिराळे यांनी दिलेल्या बातमीत कोणाच्याही नावाचा उल्लेख नव्हता याशिवाय घडलेल्या घटनेची बातमी केली होती असे असताना जमादार व त्यांच्या सहकाऱ्यांनी केलेली मारहाण अयोग्य आहे.हा हल्ला म्हणजे पत्रकारिता आणि लोकशाहीवर केलेला हा हल्ला आहे. त्यामुळे जमादार व सहकार्य करणाऱ्या आसिफखान उर्फ मॉन्टी जमादार, संदीप सणगर यांच्यावर पत्रकार संरक्षण कायद्या अंतर्गत तातडीने कडक कारवाई करावी अशी मागणी निवेदनाद्वारे केली आहे.
यावेळी संघटनेचे जिल्हा कोअर कमिटी सदस्य ज्योतिप्रसाद सावंत, तालुका अध्यक्ष संभाजी जाधव, बशीर मुल्ला,रणजीत कालेकर, सुनील पाटील, कृष्णा सावंत, संभाजी जाधव, विकास सुतार,रविंद्र येसादे ,सुभाष पाटील, अमित गुरव, श्रीकांत देसाई उपस्थित होते.
आजऱ्यातील पुरोगामी पक्ष, संघटनांच्यावतीने निषेध
मुरगुड ता. कागल येथील शिवसेना एकनाथ शिंदे गटाचे जिल्हाध्यक्ष राजेखान जमादार यांनी ‘सकाळ’च्या पत्रकारांना केलेली मारहाण ही निषेधार्ह असून अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा गळा घोटणारी आहे. समाजात घडणाऱ्या घटना निर्भीडपणे मांडण्याचा अधिकार पत्रकारांना आहे. पण सत्य पचनी पडत नसल्याने आणि पराभव समोर दिसत असल्याने राजेखान जमादार यांनी ‘सकाळ’ च्या पत्रकारांना मारहाण केली. ही घटना अत्यंत लाजिरवाणी आहे.
हा हल्ला केवळ एका पत्रकारांवर नसून माध्यमांच्या स्वातंत्र्यावरचा हा हल्ला आहे. त्यामुळे आम्ही या घटनेचा तीव्र निषेध तर करतोच पण असे कृत्य करणाऱ्या व्यक्तीवर कडक कारवाई करावी अशी मागणी पुरोगामी पक्ष संघटनांच्या वतीने कॉ. संपत देसाई, प्रा. डॉ. नवनाथ शिंदे, प्रकाश मोरुस्कर, दशरथ घुरे, संजय घाटगे, काशिनाथ मोरे, कॉ. शांताराम पाटील, नारायण भडांगे, मायकेल बारदेस्कर, नारायण राणे, भीमराव माधव यांनी केली आहे

तालुक्याला पावसाने झोडपले…

आजरा: मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
आजरा शहरासह तालुक्यात शनिवारी वळीव पावसाने जोरदार हजेरी लावली. विजांच्या कडकडाटासह झालेल्या जोरदार पावसामुळे हवेत गारवा निर्माण झाला आहे. काही काळ का असेना वाढलेल्या उष्णतेपासून नागरिकांना दिलासा मिळाला आहे.
आज-यासह परिसरातही पाऊस झाला आहे. पावसामुळे बळीराजा सुखावला आहे. पेरणीपूर्व मशागत वेगावली आहे. शनिवारी सायंकाळी सुरू झालेला पाऊस रात्रभर सुरूच होता. पावसामुळे बराच काळ वीज पुरवठा खंडित झाला होता. शेतीपिकांच्या पाण्याचा प्रश्नही तुर्तास संपुष्टात आला आहे.

ब्रह्माकुमारी ईश्वरी विश्व विद्यालयामध्ये बाल व्यक्तिमत्व विकास शिबिराला सुरुवात

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्व विद्यालयामध्ये बाल व्यक्तिमत्व विकास शिबिराला सुरुवात झाली असल्याची माहिती संजयभाई सावंत यांनी दिली.
शिबिरामध्ये लहान मुलांना विविध उपक्रम शिकवण्यात येणार आहेत जेणेकरून त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा विकास होईल.आजरा शहरासह परिसरातील पालकांनी आपल्या मुलांना शिबिरामध्ये पाठवून सहकार्य करावे असे आवाहन संजयभाई सावंत यांनी केले आहे.


