गुरुवार दिनांक १० एप्रिल २०२५


कत्तलीसाठी नेण्यात येणाऱ्या ५ वासरांसह टेम्पो ताब्यात…
तिघांविरोधात गुन्हा नोंद
आजरा पोलिसांची कारवाई

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
कत्तलीसाठी विनापरवाना वासरे गाडीमध्ये भरून नेत असताना आजरा पोलीस पथकाने अनिकेत सुरेश कांबळे/ रा.पिंपळगाव, गुलाब म्हमुलाल लमतुरे, अरबाज गुलाब लमतुरे (दोघेही रा. उत्तूर ता. आजरा) यांना रंगेहात पकडून त्यांच्यावर प्राणी संरक्षण अधिनियमानुसार गुन्हा नोंद केला आहे. याप्रकरणी पोलिसांनी वाहनासह वासरांना ताब्यात घेतले आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी…
आरळगुंडीहून चिमणे मार्गे सदर वासरांची वाहतूक होणार आहे अशी माहिती पोलिसांना त्यांच्या खबऱ्यांकडून मिळाली. या माहितीच्या आधारे चिमणे प्राथमिक शाळेजवळ सहाय्यक पोलीस निरीक्षक नागेश यमगर व त्यांच्या सहकाऱ्यांनी वाहने अडवून तपासणी मोहीम बुधवारी सकाळी साडेअकरा वाजण्याच्या सुमारास सुरू केली. यावेळी टाटा पिकअप (MH -09 FL – 0757 या वाहनामध्ये वासरे आढळून आली याबाबत कांबळे व लमतुरे यांच्याकडे वाहतुकीसह कत्तलीचा परवाना चौकशी केली असता त्यांच्याकडे काहीही आढळून आले नाही. पोलिसांनी तातडीने सदर वाहन व जनावरे असा सव्वाचार लाख रुपयांचा मुद्देमाल ताब्यात घेऊन तिघांविरोधात आजरा पोलिसात गुन्हा नोंद केला आहे.
याबाबतची फिर्याद हवालदार अनंत देसाई यांनी पोलिसात दिली आहे.



निधन वार्ता
धोंडीबा नाईक

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
आजरा येथील धोंडीबा शंकर नाईक ( वय ८५ वर्षे) यांचे वृद्धापकाळाने निधन झाले.
आजरा बसस्थानकावरील जुने एस टी हमाल म्हणून ते आजरा तालुकावासीयांना परिचित होते.
त्यांच्या पश्चात एक विवाहित मुलगा, चार विवाहित मुली ,सून जावई, नातवंडे असा परिवार आहे.


महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती, आजरा शाखेचे त्रैवार्षिक अधिवेशन उत्साहात

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती, आजरा शाखेचे त्रैवार्षिक अधिवेशन आज दिनांक ९ एप्रिल २०२५ रोजी मोठ्या उत्साहात संपन्न झाले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राथमिक शिक्षक समिती कोल्हापूरचे जिल्हाध्यक्ष प्रमोद तौंदकर व प्रमुख पाहुणे महिला राज्याध्यक्षा वर्षा केनवडे या होत्या.
एकनाथ आजगेकर यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक करून मागील कार्याचा आढावा घेतला. त्यानंतर आजरा तालुका शाखेच्या वतीने सुनील शिंदे यांनी आपले मनोगत व्यक्त केले.आजरा तालुका प्राथमिक शिक्षक समितीच्या नूतन कार्यकारिणीची या अधिवेशनात निवड करण्यात आली. यात एकनाथ गिलबिले यांची अध्यक्षपदी, बळीराम तानवडे यांची सरचिटणीसपदी, नितीन पाटील यांची कार्याध्यक्षपदी, तर प्रकाश बडे यांची कोषाध्यक्ष पदी, तसेच शांताराम केसरकर, सदाशिव दिवेकर , अब्दुल मुनाफ उत्तूरकर ,अमित कांबळे यांची उपाध्यक्षपदी व प्रवक्ता पदी विनायक आमणगी यांची निवड झाली. कार्यकारणी मध्ये निलेश जाधव , किसन देसाई, मुजफ्फर बागवान , नितीन पाटील, आकाश देशमुख यांची निवड झाली.त्याचबरोबर जिल्हा उपाध्यक्ष म्हणून आनंदा पेंडसे,एकनाथ आजगेकर, जिल्हा सल्लागार म्हणून सुधाकर आजगेकर व तालुका नेते म्हणून शिवाजी बोलके यांचीही निवड करण्यात आली.
अधिवेशनात महिला कार्यकारिणी देखील जाहीर करण्यात आली. महिला अध्यक्ष म्हणून सारिका पाटील व सरचिटणीस पदी सौ.सुरेखा कांबळे कोषाध्यक्षा आशा पाटील, कार्याध्यक्षा अनुजा केणे ,प्रिती कांबळे यांची निवड करण्यात आली.
यावेळी कार्यकर्ता पुरस्कार वितरित करण्यात आले. यामध्ये बजरंग पुंडपळ ,सुरेखा कांबळे ,संयोगिता सुतार ,मीना खाडे ,चाळू खवरे ,पांडुरंग शिप्पुरकर ,अनिल बोलके यांना पुरस्कार देऊन गौरवण्यात आले तर आनंदराव नादवडेकर जीवनगौरव पुरस्काराने सेवानिवृत्त शिक्षकांना सन्मानित करण्यात आले. यामध्ये शिवाजी पंडित, शिवाजीराव नांदवडेकर , मंगला नादवडेकर व बळवंत शिंत्रे यांचा सत्कार करण्यात आला.
अध्यक्षीय भाषणात प्रमोद तौंदकर यांनी शिक्षक समितीच्या कार्याचा आढावा घेतला. शिक्षकांच्या समस्या व त्यांच्या हक्कांसाठी समिती नेहमीच कटिबद्ध राहील, असे आश्वासन दिले.
या अधिवेशनास सुभाष विभुते,चाळू खवरे ,सुनील सुतार , रावसाहेब पाटील , तुकाराम तरडेकर, संजय भोसले , विनायक पुंडपळ यांच्यासह शिक्षक- शिक्षिका उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सदाशिव दिवेकर व आभार एकनाथ गिलबिले यांनी मानले .

आजरा येथे गिरणी कामगार संघटनेची बैठक संपन्न…

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
आजरा येथे गिरणीकामगार संघटना कार्यालयात प्रमुख कार्यकर्त्यांची सभा झाली. या सभेला प्रत्येक गावातील अध्यक्षांची उपस्थिती होती. या सभेमध्ये संघटनेच्या विरोधात काम करणारे गिरणीकामगार आबा पाटील, जानबा धडाम, दादु मोकाशी व काका देसाई यांना संघटने मधून काढण्यात यावे, असा ठराव सर्वानुमते मंजूर करण्यात आला असून सर्व श्रमिक संघटने बरोबर असणाऱ्या कोणीही कामगारांनी त्यांच्याशी संपर्क करू नये. त्यांच्या सोबत असणाऱ्यांचे नुकसान झालेस, संघटना जबाबदार राहणार नाही. तसेच शासनाने काढलेला १५ मार्च २०२४ रोजीचा जी आर ताबडतोब रद्द करण्या संदर्भातील लढा तीव्र करण्याचे ठरले.
गिरणी कामगारांना मुंबई मध्ये मोफत घर देऊन पुनर्वसन करण्यात यावे यासह वांगणी सेलू येथील घरांचा विरोध करा अशी मागणी करत येणाऱ्या काळात सर्व पालकमंत्र्यांच्या घरावर मोर्चा काढण्याचा निर्णय घेण्यात आला.
यावेळी मोठ्या संख्येने गिरणी कामगार व वारसदार उपस्थित होते .


मंथन प्रज्ञाशोध परीक्षेत व्यंकटराव प्राथमिकचे यश

ज्ञआजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
मंथन प्रज्ञाशोध परीक्षेत व्यंकटराव प्राथमिकने घवघवीत यश मिळवले असून राज्यस्तरीय गुणवंत विद्यार्थी …
इयत्ता – पहिली
अविराज दयानंद पाटील,राज्य गुणवत्ता यादीमध्ये – दुसरा
सान्वी सागर किरूळकर, राज्य गुणवत्ता यादीमध्ये तिसरी
राजवीर युवराज पोवार
राज्य गुणवत्ता यादीमध्ये – चौथा अन्विता अजित चौगुले,राज्य गुणवत्ता यादी मध्ये – सहावी व जिल्हा गुणवत्ता यादीमध्ये -पहिली
स्वराली हनमंत गजरकर, राज्य गुणवत्ता यादी मध्ये – सहावी व जिल्हा गुणवत्ता यादीमध्ये – पहिली,
रितुल विवेक चव्हाण,
राज्यामध्ये नववा व जिल्ह्यामध्ये चौथा,
वरद एकनाथ वंजारे
राज्यामध्ये दहावा व जिल्ह्यामध्ये पाचवा,
इयत्ता – दुसरी
ज्ञाना विलास गवारी*
राज्यगुणवत्ता यादीमध्ये – पाचवी
माधुरी खोत ,नीता हरेर
नयना हासबे ,रणजीत देसाई ,दीपक डेळेकर
ऋतिका गजरकर ,लता कुंभार यांचे मार्गदर्शन मिळाले .


दाभिल मध्ये हनुमान जयंती निमित्त विविध कार्यक्रम

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
हनुमान जयंती निमित्त दाभिल ता. आजरा येथील विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
शुक्रवार दि.११ रोजी जागरा निमित्त रात्री ८ ते ९:३० वाजता भजन, रात्री ९:३० ते ११:३० वाजता महाप्रसाद (भोजन) गावातील सर्व भक्त आणि बाहेर गावातील भक्तांसाठी रात्री ठिक १२:०० वाजता ,श्री देव महापुरुष दशावतार नाट्य मंडळ सावंतवाडी – गोठण यांचे “भक्ती महिमा” हा नाट्य प्रयोग होणार आहे.
या जयंतीचे नियोजन आनंदराव येडूलकर , नामदेव गुरव,अनिल नार्वेकर,रणजित कदम,शांताराम पाटील,तानाजी प्रभू,मारुती पाटील, सुरेश नार्वेकर, आनंदा गुरव,विलास पाटील,संभाजी हासबे,गजानन पाटील,सीताराम पाटील, जगन्नाथ परब,पांडुरंग पाटील,पांडुरंग गायकवाड,बाळू सुतार,ज्ञानदेव येसणे,शंकर पाटील, कृष्णा पाटील , हालेस फर्नांडिस,गोपाळ लाड, आणि सर्व दाभिल ग्रामस्थ मंडळींनी केले आहे.



