


आजरा साखर कारखान्याच्या स्वीकृत संचालकपदी रशीद पठाण व नामदेव नार्वेकर

आजरा:प्रतिनिधी
वसंतराव देसाई आजरा तालुका शेतकरी सहकारी साखर कारखान्याच्या स्वीकृत संचालक पदी रशीद महंमद पठाण व नामदेव विठ्ठल नार्वेकर यांची निवड करण्यात आली.
शनिवारी झालेल्या कारखाना संचालक मंडळाच्या बैठकीत संचालक निवडी बाबतचा विषय होता. या बैठकीमध्ये पठाण व नार्वेकर यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले. नेते मंडळींनी आपल्यावर विश्वास दाखवून आपणाला संचालक पदाची संधी दिल्याबद्दल पठाण व नार्वेकर यांनी अध्यक्ष उपाध्यक्ष संचालक मंडळाचे आभार मानले. सभासदांच्या हितासाठी आपण प्रयत्न करू असे दोघांनी यावेळी सांगितले. कारखान्याचे अध्यक्ष वसंतराव धुरे व उपाध्यक्ष देसाई यांच्या हस्ते दोघांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी जिल्हा बँकेचे संचालक सुधीर देसाई, ज्येष्ठ संचालक विष्णुपंत केसरकर , मुकुंददादा देसाई,सुभाष देसाई,दिपक देसाई,अनिल फडके, रणजीत देसाई,राजू मुरकुटे, दीपक देसाई, शिवाजी नांदवडेकर, सौ.रचना होलम,सौ.मनिषा देसाई,गोविंद पाटील, संभाजी पाटील, यांच्यासह सर्व संचालक, अबूताहेर तकीलदार, रियाज तकीलदार, अबुलास दरवाजकर व कारखान्याचे अधिकारी उपस्थित होते.



काजू दरासाठी संघटित लढ्याची गरज :कॉ. सुभाष काकुस्ते
काजू उत्पादक परिषद उत्साहात

आजरा: प्रतिनिधी
कोरोना नंतर काजू उत्पादकांची अवस्था फार बिकट होत चालली आहे. शासनाकडे काही मागितल्याशिवाय मिळत नाही. शेतकरी मागणी करत नसतील तर काहीही साध्य होणार नाही. शासनाला सर्वसामान्य शेतकऱ्यांची काळजी असेल तर काजू बियांना दोनशे रुपये प्रतिकिलो हमीभाव मिळालाच पाहिजे असे प्रतिपादन महाराष्ट्र राज्य श्रमिक शेतकरी संघटनेचे सचिव कॉ. सुभाष काकुस्ते यांनी केले. आजरा येथील जे.पी. नाईक सभागृहात आयोजित काजू परिषदेमध्ये ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राज्य श्रमिक शेतकरी संघटनेचे अध्यक्ष कॉ. राजेंद्र बावके होते.
उपस्थितांचे स्वागत धोंडीबा कुंभार यांनी केले. प्रास्ताविकपर भाषणात सर्व श्रमिक संघटनेचे व त्यांनी कामगार संघटनेचे तालुकाध्यक्ष काँ. शांताराम पाटील यांनी काजू हंगाम सुरू झाला की हेतू पुरस्सर काजू बियांचा दर पाडला जातो.यासाठी रस्त्यावर उतरण्याची गरज आहे. गोवा व कर्नाटक राज्याप्रमाणे लढून भाव मिळवण्याची गरज आज प्रकर्षाने निर्माण झाली आहे असे स्पष्ट केले स्पष्ट केले.

कॉ. दत्तात्रय अत्याळकर म्हणाले, काजूला हमीभाव मिळण्यासाठी संघटित होण्याशिवाय पर्याय नाही. सोळाव्या शतकातील ब्राझील येथील हे पीक जमिनीची धूप थांबवण्याच्या उद्देशाने भारतात आणले गेले. कालांतराने ते सर्वसामान्य शेतकऱ्यांचे उत्पन्नाचे साधन बनले गेले.काजू हा नाशवंत नाही. प्रक्रिया केलेले काजू जर ३०० ते १२०० रुपये प्रति किलो प्रमाणे बाजारपेठेत विकले जात असतील तर काजू पिकाला किमान २०० रुपये प्रति किलो इतका हमीभाव मिळालाच पाहिजे असे स्पष्ट केले.
यावेळी कॉ. उदय भट, कॉ. अतुल दिघे, काँ. विजय कुलकर्णी, चंदगडचे तालुका अध्यक्ष गोपाळ गावडे, सिंधुदुर्ग येथील विलास सावंत यांनी मार्गदर्शन केले.
परिषदेला अमृत कोकितकर, नारायण राणे, शांताराम हरेर, आबासाहेब पाटील, नारायण भडांगे यांच्यासह काजू उत्पादक शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.



बलशाली देशासाठी श्रमसंस्कार शिबिरे गरजेची : किरण आमणगी

आजरा : प्रतिनिधी
भारत हा तरुणांचा देश आहे. भारतातील तरुणाई मोबाईल विश्वामध्ये अडकत चालली आहे. युवकांच्या सुप्त गुणांचा विकास करण्यासाठी, श्रमसंस्काराची बिजे रोवण्यासाठी श्रमसंस्कार शिबिरे अत्यंत महत्त्वाचे आहेत. श्रमाला प्रतिष्ठा मिळवून देण्यासाठी, युवकांच्या व्यक्तिमत्त्वाच्या विकासामध्ये वाढ घडून आणण्यासाठी, समाजभान निर्माण करण्यासाठी आणि माणसातील माणूसपण जिवंत ठेवण्यासाठी श्रमसंस्कार शिबिर महत्त्वाची भूमिका पार पाडत आहेत. असे मत सरपंच किरण आमणगी यांनी व्यक्त केले.
त उत्तूर येथे सुरु असलेल्या ओंकार शिक्षण प्रसारक मंडळ संचलित, कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय, गडहिंग्लज राष्ट्रीय सेवा योजना विशेष श्रम संस्कार शिबिर उद्घाटन प्रसंगी उद्घाटक म्हणून बोलत होते.
यावेळी अध्यक्ष राजन पेडणेकर यांनी आपल्या मनोगतात… आयुष्य एकदाच मिळते. संधीचे सोने करा. मन, मेंदू आणि मनगट मजबूत करा. यातूनच बलशाली भारताची निर्मिती होऊ शकेल. आपल्या आयुष्याला आकार देण्याचा प्रयत्न करा. स्वतःची प्रगती स्वतः करा. वेळेचे नियोजन, कठोर परिश्रम आणि समर्पण वृत्ती यातूनच समृद्ध युवक बनू शकतो असे मत व्यक्त केले.
प्रमुख पाहुणे म्हणून उद्योजक संजय केसरकर उपस्थित होते. प्रमुख उपस्थितीमध्ये प्र. प्राचार्य प्रा. डॉ. अनिल पाटील होते. प्रास्ताविक कार्यक्रम अधिकारी डॉ. काशिनाथ तनंगे, स्वागत व परिचय प्रा. भीमराव शिंदे, आभार कु. शर्वरी पाटील तर सूत्रसंचालन प्रतीक्षा गुरव यांनी केले.



छायावृत्त:-
अघोषित बंद…

आजरा बस स्थानक परिसरात राष्ट्रीय महामार्गाच्या कामास सुरुवात झाली आहे. या कामामुळे व्यावसायिकांची मोठी अडचण होत असून शनिवारी दिवसभर काही व्यावसायिक व व्यापाऱ्यांवर चक्क दिवसभर दुकाने बंद ठेवण्याची वेळ आली.

श्रीराम प्राणप्रतिष्ठा कार्यक्रम आजरा

🟪 सायंकाळी ५.३० वाजता राम मंदिर, आजरा येथे संगीत विशारद सौ.व श्री. अजित तोडकर यांचा भक्ती गीतांचा कार्यक्रम…
🟪 बाल भजनी मंडळ अलबादेवी चंदगड यांचे चक्रीभजन सायंकाळी सात वाजता
स्थळ:-राम मंदिर,आजरा.
🟪 संत गोरा कुंभार सामाजिक तरुण मंडळ यांचे वतीने रामायणावरील पात्रावर आधारित वेशभूषा स्पर्धा सायंकाळी आठ वाजता




