


बाळासाहेब आजगेकर यांचे निधन

आजरा साखर कारखान्याचे माजी संचालक व आजरा तालुका खरेदी विक्री संघाचे माजी अध्यक्ष बाळासाहेब उर्फ रामचंद्र आजगेकर यांचे रविवारी पहाटे प्रदीर्घ आजाराने निधन झाले. निधनसमयी त्यांचे वय ६० वर्षे होते.
पेंढारवाडीस्थित आजगेकर यांचा उत्तुर विभागातील राजकारणामध्ये चांगलाच दबदबा होता. आजगेकर यांच्या पश्चात चार भाऊ, विवाहित मुलगा, पत्नी, मुलगी, सून असा परिवार आहे. पेंढारवाडीच्या सरपंच सिंधुताई आजगेकर यांचे ते पती होत.
पेंढारवाडी येथे रविवारी सकाळी दहा वाजता अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.


क्रांतीज्योती सावित्रीबाईंच्या बदनामीचा
आज-यात निषेध…
भारतातील पहिल्या शिक्षिका क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची बदनामी करणाऱ्या इंडिक टेल्स या वेबचा श्रमिक मुक्ती दलाच्या वतीने बैठक घेऊन जाहीर निषेध करण्यात आला. त्याचबरोबर याच्या संपादक आणि लेखकावर तातडीने गुन्हा दाखल केला पाहिजे अशी मागणीही करण्यात आली आहे.
क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले या भारतातल्या आद्य शिक्षिका असून या देशात मुलींच्या शिक्षणाचा पाया त्यांनी घातला. आज ज्ञानाच्या क्षेत्रात सर्वच जात धर्मातील भारतीय मुली ज्या भरारी घेताहेत त्याची प्रेरणा सावित्रीमाई आहेत. त्यामुळे त्यांच्याबद्दल हीन पातळीला येऊन अत्यंत खोडसाळ आणि बदनामी करणाऱ्या या लेखाच्या लेखकावर आणि इंडिकटेल्सच्या संपादकावर तातडीने गुन्हा नोंदवून कारवाई झाली पाहिजे.
भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष आणि भाजपाचे खासदार ब्रिजभूषण शरण सिंह यांच्या विरोधात कांही महिला कुस्तीपटूनी लैंगिक गैरवर्तन केल्याचा आरोप केला आहे. त्यातील एक खेळाडू अल्पवयीन असून तिने ब्रिजभूषण यांच्यावर लैंगिक गैरवर्तनाची तक्रार नोंदवली आहे. ब्रिजभूषण यांच्यावर pocso / पोक्सो कायद्याखाली एफआयआर देखील नोंदवला आहे. एफआयआर नोंदवून कित्येक दिवस झाले तरी अजूनही त्यांना अटक झालेली नाही.
केवळ सत्ताधारी पक्षाचे खासदार असल्याने त्यांना पाठीशी घातले जात आहे. आंतरराष्ट्रीय पातळीवरील क्रीडा संघटनानी या घटनेची दखल घेत निषेध नोंदवला आहे. जागतिक पातळीवर भारताची बदनामी होत असतांना इथले सरकार या लैंगिक गैरवर्तन करणाऱ्या व्यक्तीला पाठीशी घालत आहे. हे अत्यंत वाईट आहे.
खर तर ऑलिम्पिक आणि इतर आंतरराष्ट्रीय पातळीवर पदके मिळविणे खूप कठीण आणि अवघड गोष्ट आहे. प्रचंड मेहनत आणि जिद्दीच्या जोरावरच ही पदके मिळवून भारतासाठी अभिमानास्पद कामगिरी केली आहे. अशा आंतरराष्ट्रीय पातळीवर भारताचा झेंडा फडकवणाऱ्या खेळाडूना न्याय मिळत नाही म्हणून त्यांनी आपली पदके गंगार्पण करण्याचा घेतलेला निर्णय कोणत्याही भारतीयाची मान लाजेने खाली झुकावी असाच आहे. शासनाने याबाबत ब्रिजभूषण यांच्याबाबत तातडीने कारवाई न केल्यास जनता या खेळाडूंच्या बाजूने रस्त्यावर उतरेल.
सोमवरी आजरा तहसील कार्यालयावर निघणाऱ्या मोर्चात मोठ्या संख्येने सहभागी होण्याचा निर्णय आजच्या बैठकीत करण्यात आला. बैठकीला कॉ. संपत देसाई,डॉ नवनाथ शिंदे, प्रा राजा शिरगुप्पे, कॉ. शांताराम पाटील, प्रकाश मोरूस्कर, युवराज जाधव, संजय घाटगे, दशरथ घुरे, मुकुंद नार्वेकर, संतोष सुतार, नारायण भडांगे, भीमराव माधव, काशिनाथ मोरे, सरिता कांबळे, निवृत्ती मिसाळे, जानाबा धडाम, अशोक मालव, प्रकाश शेटगे, कृष्णा सावंत यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.


एनसीसी तर्फे जागतिक पर्यावरण दिन

येथील आजरा महाविद्यालय, व्यंकटराव हायस्कूल व आजरा हायस्कूल या एनसीसी विभागामार्फत आजरा भाजी मार्केट येथील स्वच्छता करण्यात आली. यावेळी छात्र सैनिकांनी पर्यावरण संरक्षणाची शपथ घेतली.
या उपक्रमास ५६ महाराष्ट्र बटालियनचे कमांडिंग ऑफिसर कर्नल विजयंत थोरात यांचे मार्गदर्शन लाभले. कामाचे नियोजन लेफ्ट. डॉ संजय चव्हाण एनसीसी ऑफिसर अजित तोडकर व महेश पाटील यांनी केले.





