

अर्ध्या तासात पावसांने उडाली आजरेकरांची दैना ; ऐन आठवडी बाजारात पावसाचे थैमान

हवामान खात्याच्या अंदाजानुसार राज्यातील काही जिल्ह्यात पावसाची शक्यता असल्याचे सांगण्यात आले होते. आज आजरा तालूक्यासह शहरात वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाने हजेरी लावली. सायंकाळी ४ च्या सुमारास पावसाला सुरूवात झाली अक्षरश: पावसाने कहर केला.
या पावसाने आजरा शहरात धडकी भरावी एवढ्या जोरात विजेच्या कडकडाटासह हजेरी लावली. फक्त ३० मिनिटे झालेल्या पावसाने अक्षरश: सर्वत्र पाणीच पाणी झाले. पावसांने आठवडी बाजाराला आलेल्या व्यापारी व नागरिकांचे मोठ्या प्रमाणात हाल झाले तर आजरा शहरातील मुख्य चौक असणाऱ्या संभाजी चौकात पाणी साचल्याने काही काळ वाहतूक खोळंबली होती.
गेले आठवडाभर सुरू असलेल्या पावसामुळे भातासह इतर पिकांचे मोठे नुकसान होणार असून आजरा साखर कारखान्याचा गळीत हंगाम लांबणार आहे.
सायंकाळी उशिरापर्यंत पाऊस सुरूच होता.



