
उत्तूर येथून चोरीस गेलेल्या चारचाकीसह 17 लाखाचा मुद्देमाल ताब्यात
अनेक ठिकाणच्या चोऱ्या उघडकीस

उत्तूर येथून चोरीस गेलेल्या चारचाकीसाह इतर दोन अशा एकूण तीन चारचाकी व या चारचाकींचा वापर करून अनेक ठिकाणी चो-या कारणा-या दोघांना जेरबंद करण्यात पोलिसांना यश आले असून गाडयांसह चोरीतील 17 लाख रुपये किंमतीचा मुद्देमाल ताब्यात घेतला आहे.
पोलीस अधीक्षक, श्री. शैलेश बलकवडे यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक संजय गोर्ले यांना दिलेल्या सुचनांप्रमाणे पोलीस निरीक्षक संजय गोर्ले यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण कोल्हापूर कडील वेगवेगळी पथके तयार करुन माहिती काढुन गुन्हे उघडकीस आणणेचा प्रयत्न चालू असताना गोपनीय बातमीदारामार्फत माहिती मिळाली,उत्तूर (ता. आजरा ) येथून चोरलेली मारुती कंपनीची इको गाडी क्र. एमएच-09-एफक्यु 0385 ही घेवून दोन व्यक्ती कोल्हापूर ते कागल जाणा-या हायवेवरील कणेरी फाट्यावर येणार असले बाबत माहिती मिळालेने पोलीस निरीक्षक संजय गोर्ले यांचे मार्गदर्शनाप्रमाणे सहा. पोलीस निरीक्षक किरण भोसले, पोलीस अमंलदार रणजित पाटील, प्रशांत कांबळे, रामचंद्र कोळी, सुरेश पाटील, रणजित कांबळे, विनोद कांबळे, आसिफ कलायगार व अनिल जाधव यांच्या तपास पथकाने कोल्हापूर ते कागल जाणारे एनएच-4 हायवेवरील कणेरी फाट्यावर सापळा लावून ईश्वरसिंह रणवीरसिंह राजपूत, (वय 30, रा.घर नं. 176, जुनसवाडा, मार्केम, नॉर्थ गोवा मुळ गांव-जुनी बाली, ता. बागोडा, जि. जालोर, राज्य – राजस्थान व 02) कृष्णकुमार राणाराम देवासी (वय 27, रा. करासवाडा, चार रास्ता, म्हापसा, गोवा मुळ गांव-हरटवाव, ता. गुड्डामालानी, जि. बाडमेर, राज्य राजस्थान) यांना त्यांचे कब्जातील इको गाडी क्र. एमएच-09-एफक्यु 0385 सह पकडले.
सदर आरोपींना ताब्यात घेवून त्यांचेकडे अधिक चौकशी केली असता त्यांनी त्यांचे साथीदारांसह मिळुन आजरा, गांधीनगर व करवीर पोलीस ठाणेचे हद्दीत घरफोडी चोरी तसेच इको गाड्या चोरीचे गुन्हे केलेची माहिती सांगितले.त्यांच्या माहितीवरुन त्यांचे कब्जातील चोरलेली इको गाडी क्र. एमएच-09-एफक्यु-0385 एक तसेच आणखी एक चोरीची इको गाडी व गुन्हे करणेकरीता वापरलेली एक इको गाडी अशा एकूण तीन इको गाड्या तसेच घरफोडी चोरीतील साहित्य असा एकूण 17,00,000/- (सतरा लाख) रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे.
आरोपी हे मुळचे राजस्थान राज्यातील असून ते सध्या गोवा राज्यात राहणेस आहेत. ते गोवा येथुन त्यांचे मालकीचे चारचाकी इको गाडीतून रात्रौचे वेळी कोल्हापूर येथे येवून चो-या करुन परत जात असलेचे निष्पन झाले आहे. आरोपींचे कब्जात उत्तूर मधील चोरीस गेलेली इको गाडी क्र. एमएच-09- एफक्यु 0385 ही मिळुन आलेने आरोपींना आजरा पोलीस ठाणे येथे हजर करणेची प्रक्रिया सुरु आहे.
सदरची कारवाई पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे व अप्पर पोलीस अधीक्षक, तिरूपती काकडे यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक संजय गोर्ले, जिल्हा विशेष शाखेचे पोलीस निरीक्षक तानाजी सावंत तसेच स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडील सहा. पोलीस निरीक्षक किरण भोसले, श्रेणी पोलीस उपनिरीक्षक महादेव कुराडे व पथकाने केली.
येत्या पाच वर्षात आजरा अर्बन शेड्युल्ड करण्यास प्रयत्नशील : डॉ. अनिल देशपांडे

सभासदांनी दाखवलेला विश्वास व कर्मचारी वर्गाचे सहकार्य या जोरावर आजरा अर्बन बँकेची घोद-द ड सुरू असून येत्या पाच वर्षांमध्ये बँकेच्या ठेवीचा टप्पा एक हजार कोटी पार करण्याबरोबरच बँकेचे शेड्युल्ड बँकेत रूपांतर करण्यास आपण प्रयत्नशील असल्याची माहिती आजरा अर्बन बँकेचे अध्यक्ष डॉ. देशपांडे यांनी बँकेच्या 62 व्या वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये अध्यक्षपदावरुन बोलताना दिली.
बँकेची सभा शांततेत व उत्साहात पार पडली. यावेळी बोलताना डॉ. देशपांडे म्हणाले, बँकेचे आधुनिकीकरण करण्याच्या दृष्टीने शाखांचे नूतनीकरण सुरू आहे ग्रामीण भागामध्ये विविध सुविधा देण्याच्या दृष्टीने बिझनेस करस्पाँडंट, मोबाईल व्हॅन यासारख्या सुविधा सुरू करण्याचा विचार सध्या सुरू आहे.
सभेमध्ये आर्थिक पत्रकांचे वाचन बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रशांत गंभीर यांनी केले. यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवरांसह वयाची 75 वर्षे पूर्ण केलेल्या ज्येष्ठ सभासदांचा विशेष गौरव करण्यात आला. यावेळी अण्णा भाऊ संस्था समूहाचे प्रमुख अशोक चराटी यांनीही मनोगत व्यक्त केले.
सभेस नगराध्यक्षा ज्योत्स्ना चराटी, सर्व संचालक, अधिकारी-कर्मचारी यांच्यासह सभासद उपस्थित होते.
उपाध्यक्ष किशोर भुसारी यांनी आभार मानले.
कर्मचारी वर्गास १२ टक्के प्रमाणे बोनस देण्यात येणार असल्याचे डॉ.देशपांडे यांनी सांगितले.

आज-यात आज आरोग्य तपासणी शिबिर
राष्ट्रीय नेता ते राष्ट्रपिता सेवा पंधरवडा अंतर्गत नगरपंचायत आजरा यांच्यातर्फे आजरा शहरातील ज्येष्ठ नागरीकांकरीता आरोग्य तपासणी शिबिराचे आज गुरुवार दिनांक २९ रोजी सकाळी नऊ ते दोन या वेळेत आयोजित करण्यात आले आहे.
नगरपंचायतीच्या , सभागृहामध्ये होणाऱ्या या शिबिराचे उद्घाटन नगराध्यक्ष ज्योत्स्ना चराटी यांच्या हस्ते होणार आहे. याकरीता प्राथमिक आरोग्य केंद्र वाटंगी,आजरा ग्रामीण रुग्णालय यांचे पथक तैनात करण्यात आले आहे.


अण्णाभाऊ संस्था समूह विश्वासाचे प्रतीक : अशोक चराटी
आजरा सूतगिरणीची वार्षिक सभा उत्साहात

कापसाचे दर प्रचंड वाढले आहेत.सुताच्या दरात मात्र फारशी वाढ न झाल्याने राज्यातील सर्व सूतगिरण्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे.केवळ अण्णाभाऊ संस्था समूह विश्वासाचे प्रतीक असल्याने त्या बळावरच सुतगिरणी अनेक अडचणींवर मात करत सुरू ठेवण्यात आली आहे.सूतगिरणीच्या वापरात नसलेल्या जागेवर ३० कोटीचे दोन प्रकल्प आणण्यासाठी आपण प्रयत्नशील आहोत असे प्रतिपादन अण्णाभाऊ संस्था समूहाचे प्रमुख अशोक चराटी यांनी आजरा तालुका शेतकरी सहकारी सूत गिरणीच्या ४३ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत बोलताना केले. सभेच्या अध्यक्षस्थानी सूतगिरणीच्या अध्यक्षा अन्नपूर्णादेवी चराटी होत्या.
चराटी पुढे म्हणाले, सूतगिरण्यांना गेली तीन वर्षे अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. महाराष्ट्रात १५६ पैकी आजरा व गारगोटी या दोनच सूतगिरण्या सुरू आहेत. शासनाने एकूण तोट्याच्या दहा टक्के तोटा भरून देण्याचे धोरण स्वीकारल्याने त्याचा फायदा सूतगिरणीला होईल.
सभेस उपस्थितांचे स्वागत अध्यक्षा अन्नपूर्णादेवी चराटी यांनी केले. नोटीस वाचन विष्णू पोवार यांनी केले. यावेळी विविध क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी केलेल्या मान्यवरांचा विशेष गौरव करण्यात आला.
उपाध्यक्ष डॉ. अनिल देशपांडे यांच्यासह सर्व संचालक, सभासद, सूतगिरणीचे अधिकारी, कर्मचारी सभेस उपस्थित होते. आभार संचालक राजाराम पोतनीस यांनी मानले.
तीनही जि. प. सदस्य आमचेच …अशोक चराटी
सध्या राज्यामध्ये भाजपा – शिंदे गटाचे सरकार असल्याने व आपण भाजपाचे असल्यामुळे जे मागेल ते देण्याचे आश्वासन मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी दिले आहे. तालुक्यातील ७६ पैकी ४० सरपंच हे आपल्या गटाचे असून येत्या जिल्हा परिषद निवडणुकीत तालुक्यातील तीनही जिल्हा परिषद सदस्य हे आपल्या गटाचे निवडून येतील असा दावाही चराटी यांनी यावेळी केला.


