


दुचाकीच्या अपघातात कानोली येथील एक तरुण ठार … एक जखमी.
सुट्टीनिमित्त दुचाकीवरुन पर्यटनासाठी गेलेल्या कानोली ता. आजरा येथील निखील संजय सावरतकर (वय 34 वर्षे) या तरुणाचे कुडाळनजिक साळगाव येथे अपघाती निधन झाले, तर नेताजी दिगंबर भोगन हा त्याचा सहप्रवासी मित्र जखमी झाला आहे.सायंकाळी 7 वाजण्याच्या सुमारास सदर घटना घडली.
याबाबत अधिक माहिती अशी की, नितीन व नेताजी हे दोघेही सुट्टी निमित्त शनिवारी पर्यटनासाठी कोकणात गेले होते. रविवारी सायंकाळी ते आज-याच्या दिशेने परतत असताना कुडाळ नजीक असणाऱ्या साळगाव येथे समोरून येणाऱ्या पादचाऱ्याला चुकवण्याच्या नादामध्ये मोटरसायकल घसरून पडले. यामध्ये नितीन याचा जागीच मृत्यू झाला तर नेताजी हा जखमी झाला आहे. नितिन हा मुंबई येथे वाहन चालक म्हणून काम करत होता. त्याच्या पश्चात भाऊ, आई, वडील असा परिवार आहे. नितीनच्या निधनाचे वृत्त समजताच सर्वत्र दुःखाचे वातावरण पसरले आहे.
आधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्याने शेती व शेतकऱ्याला समृद्ध करुया : आमदार हे आबिटकर

आपल्याकडे उपलब्ध असलेल्या शेतीमधूनच अधिकाधिक उत्पादन घेऊन स्वत:ची आणि कुटुंबाची उन्नती साधली पाहिजे. आधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग शेतीमध्ये करून उत्पादन वाढविण्यासाठी प्रत्येक शेतकऱ्याने प्रयत्न करण्याची गरज आहे. यासाठी या विभागाचा लोकप्रतिनिधी म्हणून सर्वतोपरी सहकार्य केले जाईल अशी ग्वाही देत शेती आणि शेतकरी दोघांनाही समृद्ध बनवूया असे आवाहन आमदार प्रकाश आबिटकर यांनी केले. आजरा येथे आयोजित करण्यात आलेल्या एकरी ६० टन ऊस उत्पादकता वाढ अभियानात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष जयवंतराव शिंपी होते.
प्रास्ताविक जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी ज्ञानदेव वाकुरे यांनी केले. यानंतर प्रगतशील शेतकऱ्यांचा सन्मान मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी आमदार आबिटकर म्हणाले, शेतकऱ्यांना मार्गदर्शन देण्यासाठी कृषी विभागाने वारंवार अशा प्रकारच्या मार्गदर्शन कार्यक्रमांचे आयोजन करावे. कृषी विभागाच्या अनेक योजना चांगल्या असून त्याचा लाभ शेतकऱ्यांना मिळावा यासाठी प्रयत्न होणे गरजेचे आहे. कृषी विभागाच्या माध्यमातून आगामी काळात शेतकऱ्यांच्या हिताच्या योजना शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी आपले प्रयत्न राहणार आहेत. शेतकऱ्यांनी शेतीच्या आरोग्याची काळजी घेताना सर्वप्रथम माती परिक्षण करून घ्या. शेतीत कमी असणारे घटक शेतीला द्या उत्पादन वाढण्यास मदत होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

शेतकऱ्यांना मार्गदर्शन मिळावे यासाठी यापुढील आपण शेतकऱ्यांच्या अभ्यास सहलींचे आयोजन करणार असल्याचेही आमदार आबिटकर यांनी सांगितले. चित्री व आंबेओहोळच्या माध्यमातून पाण्याचा प्रश्न सुटला आहे. पुढीलवर्षी सर्फनाला प -कल्पामध्ये पाणी अडविले जाईल, त्यामुळे पाण्याचा प्रश्न निकालात निघेल. आपली पाण्यासाठी जशी धडपड सुरू आहे तशीच शेतीच्या प्रगतीसाठीही ठेवूया असे आवाहन त्यांनी केले.
यानंतर राहुरी कृषी विद्यापीठाचे अशासकीय सदस्य दत्तात्रय उगले यांनी मनोगतात शेतकऱ्यांच्या उन्नतीसाठी आमदार आबिटकर यांनी हे अभियान हाती घेतले असल्याचे सांगितले. अध्यक्षीय भाषणात जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष शिंपी म्हणाले, आमदारांच्या संकल्पनेतून राबविण्यात येत असलेले हे अभियान शेतकऱ्यांना निश्चितपणे समृद्ध करणारे आहे. या अभियानाच्या माध्यमातून शेतीशी संबंधित राबविण्यात येणाऱ्या योजना मार्गदर्शनाचा लाभ शेतकऱ्यांनी घ्यावा व आपल्या शेतीमध्ये त्याचा उपयोग करावा असे आवाहन शिंपी यांनी केले. या कार्यक्रमाला उपविभागीय कृषी अधिकारी भाग्यश्री फरांदे, तालुका कृषी अधिकारी के. एम. मोमीन यांच्यासह तालुक्यातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. मंडल कृषी अधिकारी निर्मलकुमार ऐतवडे यांनी आभार मानले.
📢🏆 सर्वाधिक ऊस उत्पादन घेणाऱ्या शेतकऱ्यांना बक्षिस देणार 📢🏆
६० टन ऊस उत्पादन वाढ अभियानाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना सातत्याने मार्गदर्शन केले जाणार आहे. तर पुढील वर्षी तालुक्यात एकरी सर्वाधिक ऊस उत्पादन घेणाऱ्या पहिल्या तीन शेतकऱ्यांना अनुक्रमे २५ हजार, १५ हजार व १० हजार रूपयांचे रोख पारितोषिक देण्याची घोषणा यावेळी आम.आबिटकर यानी केली.
कृषी विभागाला गांभीर्य नाही…
एकीकडे आमदार प्रकाश आबिटकर हे हा कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी प्रयत्नशील असताना दुसरीकडे कृषी खाते मात्र सुस्त दिसत होते. अनेक स्थानिक पदाधिकाऱ्यांना या कार्यक्रमाचे निमंत्रण दिले गेले नाही. पत्रकारांनाही या कार्यक्रमापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न कृषी खात्याकडून झाल्याचे दिसत होते.





