तुम्ही पुन्हा आला…. कशाला?
आमचं वाटोळ लावायला…..?
ज्योतिप्रसाद सावंत
वास्तविक तुम्हाला आम्ही कंटाळलो होतो. म्हणूनच तुम्ही कधी एकदा जाल याची प्रतीक्षा आमच्याकडून सुरू होती. सुदैवाने तुम्ही गेलात. पण पुन्हा म्हणे तुम्ही आफ्रिकेवरुन डायरेक्ट भारतात परत आला. नव्या रंगात, नव्या ढंगात तुमची झालेली एंट्री आमची डोकेदुखी वाढवणारी आहे. वास्तविक गेल्या दोन वर्षात तुमच्या वास्तव्यानं देशाचं पार वाटोळे करून टाकलेल आहे. तरुणांना काम मिळेना… शाळा बंद असल्याने पोरं शाळेला जाईनात… शाळेला गेली तरी त्यांना अभ्यासातलं काही येईना. महागाई मरणाची वाढली. त्यातच तुम्ही पुन्हा आलात. आमचे महाराज म्हणतात बसा आमच्या बोकांडीवर… पण बोकांडी म्हणजे काय? व ती नेमकी जागा कोणती ? हे तुम्हालाही माहीत नसावं म्हणूनच कदाचीत तुम्ही कन्फ्यूज होवून असंच जगभर वरवर फिरू लागला आहात. अहो भारतासारख्या आमच्या देशात लोकशाही किती महत्त्वाची…आणि वेगवेगळ्या निवडणुका म्हणजे लोकशाहीचा उत्सवच. बाकी सगळे ठीक आहे हो पण या लोकशाहीच्या उत्सवात तुमची आम्हाला फार अडचण व्हायला लागले. पाच वर्षातून एकदा साजरा होणारा हा उत्सव गावागावात दणक्यात साजरा केला जातो. या उत्सवावर देखील तुमचं सावट. त्यातच जत्रा,यात्रा बंद आणि मटणाचा दर सहाशे रुपयावर गेला असल्यामुळे घरात मटण आणून खाण कुणाला परवडतंय ? या उत्सवानिमित्त तरी सभा, मेळावे, बैठकांची शोभा वाढवून झणझणीत मटण आणि रश्श्यावर ताव मारता आला असता. पण आमचे हे सुख गेली दोन वर्ष तुम्हाला बघवनासे झाले आहे. बरं तुम्ही एकटं आला असता तरी गोष्ट वेगळी होती.येताना पाऊसपण घेऊन यायलाय. तो ही डिसेंबर महिन्यात ? मग आम्ही जगायचं कसं ? मागच्या वेळेला घरात कोंडून घातल्यामुळे घरा-घरात नुसती नवरा- बायको, भाऊ- भाऊ, जावा- जावा यांच्यात भांडणाचा धुमडा उडाला होता. ही भांडणे मिटवेपर्यंत पंचकमिट्या घाईला आल्या होत्या. आता कुठे जरा सुरळीत चाललं होतं तोवर परत तुम्ही आला. तिकडे एसटीच्या कर्मचाऱ्यांना या..या म्हणून पायघड्या घालायची वेळ आली आहे. आणि तुम्ही मात्र बोलवायच्या आधीच येऊन देखील पोहोचला. आता आलाच आहात तर बसा आमच्या बोकांडीवर. आणि दुसरं एक महत्त्वाचं आधीच सांगून ठेवतो …बोकांडी म्हणजे काय… ?आणि ती नेमकी असते कुठे…? हे प्रश्न आम्हाला विचारण्याऐजी त्या महाराजांनाच विचारून या.
…………….







