अशोकअण्णा की सुधीरभाऊ?
जिल्हा बँकेकरीता आजऱ्यात मोठी चुरस
ज्योतिप्रसाद सावंत
आजरा तालुक्यातून जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँके करीता एकेकाळी एकाच वेळी आजरा साखर कारखान्याचे अनुक्रमे अध्यक्ष व उपाध्यक्ष पद भूषविलेले अशोकअण्णा चराटी व सुधीर देसाई हे परस्परांविरोधात रिंगणात आहेत. अशोकअण्णा चराटी यांनी यापूर्वीच विजयाचा दावा करत विरोधी उमेदवार सुधीर देसाई यांना निवडणूक बिनविरोध करण्याचे आवाहन केले होते. जिल्हा परिषद उपाध्यक्ष जयवंतराव शिंपी यांची त्यांना साथ मिळाल्याने अण्णा-भाऊ गटाचा आत्मविश्वास बळावला आहे. चराटी यांना या निवडणुकीकरिता जिल्हा स्तरावरून फारशी रसद मिळणार नाही असे दिसत आहे त्यामुळे स्थानिक पातळीवरच सर्व ताकद लावावी लागणार आहे. याउलट सुधीर देसाई यांच्या पाठीशी ग्राम विकास मंत्री हसन मुश्रीफ, गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांच्यासह महा विकास आघाडीतील जिल्हा पातळीवरील घटक पक्षांची मोठी ताकद रहाणार आहे. सुरुवातीला एकतर्फी वाटणारी ही निवडणूक चराटी यांना फारशी सोपी राहिलेली नाही हे देखील सध्या सुरू असणाऱ्या घडामोडींवरून स्पष्ट होत आहे. १०६ ठरावधारकांचे मतदान या निवडणुकीत होणार आहे. चराटी यांनी यापूर्वी आपल्याकडे ६५ ठरावधारक मतदार असल्याचा दावा केला आहे. तर सुधीर देसाई यांनी सावध भूमिका घेत मतदानाची आकडेवारी गुलदस्त्यात ठेवली आहे. राष्ट्रवादीतून जिल्हा परिषदेकरीता निवडून आलेल्या जयवंतराव शिंपी यांनी अशोक चराटी यांना दिलेली साथ राष्ट्रवादीच्या नेतृत्वाला निश्चितच मान्य नाही. एकाच वेळी अशोक चराटी व जयवंतराव शिंपी यांची राजकीय गेम करण्यासाठी वरिष्ठ पातळीवरून जोरदार हालचाली सुरू झाल्या आहेत. यामुळे या लढतीकडे केवळ आजरा तालुकावासीयांचेच नव्हे तर संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागून राहिले आहे.
सुळेरान येथील मंडल अधिकारी व तलाठी यांच्याविरोधात आमरण उपोषणाचा इशारा
सुळेरान (ता.आजरा )येथील तलाठी , मंडल अधिकारी यांच्या बेजबाबदार कामकाजाविरोधात आजरा तहसील कार्यालयासमोर दि . ८ डिसेंबर पासून आमरण उपोषण करणार असल्याचा इशारा चंदगड येथील सामाजिक कार्यकर्ते व दिव्यांग संघटनेचे संचालक आसिस कुतिनो यांनी दिला आहे . सुळेरान(ता.आजरा) येथील गट नं . २२१ ही जमिन गेली २३ वर्षे ते स्वतः कसत असून शेतात त्यांच्या पत्नी रिबेका कुतिनो यांच्या नावे वीज मोटरपंप , सर्वोदय सेवा संस्थेमध्ये कर्जदार सभासद असून आजतागायत शेतात ऊस , भाजीपाला , अशी शेती करीत आहेत . सेवा सोसायटीचे १५ हजार रुपये कर्ज शासनाकडून माफ झाले . सोसायटीचा बोजा नोंद कमी करण्याचे सोडून सुळेरान येथील तलाठी यांनी कोणतीही सुचना न देता रिबेका कुतिनो क ‘ नुसार यांचे सातबारावरील नाव कमी केले आहे . तलाठी, मंडल अधिकारी यांनी कायदा कलम ११ हितसंबंधीताना लेखी नोटीस काढणे कायद्याने बंधनकारक असताना देखील या कायद्याकडे दुर्लक्ष केले आहे . गट न . २२१ व २२८ चे मूळ खातेदार रिबेका कुतीनो यांचे आजोबा पावसू बार्देस्कर हे होते . गट नं . २२८ मध्येही गैर व्यवहार होऊन त्याबाबत लेखी तक्रार देऊनही त्याची तलाठी, मंडल अधिकारी यांनी दखल घेतली नाही असा आरोपही करण्यात आला असून या संबंधीचे पत्र पालकमंत्री सतेज पाटील , ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ , आमदार राजेश पाटील , जिल्हाधिकारी , तहसीलदार आजरा यांना देऊन डायरी दुरुस्ती करून सातबारा पूर्ववत करावा अशी मागणी केली आहे .
२० वर्षांनी उत्तूर येथील महालक्ष्मी मंदिर परिसर उजळून गेला
………………उत्तूर:- प्रतिनिधी………………
गेल्या २० वर्षात पहिल्यांदाच उत्तुर (ता.आजरा येथील महालक्ष्मी मंदिर उजळून गेले. जि.प. सदस्य उमेश आपटे व सरपंच सौ. वैशाली आपटे यांच्या प्रयत्नाने उत्तुर मध्ये सहा ठिकाणी मोठे मर्क्युरी दिवे बसवण्यात आले आहेत त्यामुळे रात्रीच्या वेळी वाहनचालक आणि नागरिकांना ठिकाणी पुरेसा प्रकाश असल्याने दिलासा मिळाला आहे. परिसर उजळून गेल्यामुळे उत्तूरवासीयांमधून समाधान व्यक्त होत आहे.
वाटंगी परिसरात हत्तीचा धुमाकूळ
आजरा तालुक्यातील वाटंगी-मोरेवाडी परिसरात हत्तीने धुमाकूळ घालत ऊस, भात, नाचणा पिकाचे मोठे नुकसान केले आहे. मंगळवारी रात्रीच्या दरम्यान हत्तीने जॉन्सन गोवस, मारुती कुंभार, शंकर सोनार, प्रकाश घेवडे आदींच्या शेतातील पिकांचे मोठे नुकसान केले. पहाटेच्या दरम्यान चाळोबावाडीच्या दिशेने हत्ती निघून गेला. ऐन सुगीच्या काळात हत्ती कडून कापणी केलेल्या पिकांचे नुकसान होत असल्याने शेतकऱ्यांमधून हत्तीचा बंदोबस्त करण्याची मागणी केली जात आहे.




अशोकअण्णा की सुधीरभाऊ?
सुळेरान येथील मंडल अधिकारी व तलाठी यांच्याविरोधात आमरण उपोषणाचा इशारा
