शुक्रवार ५ जून २०२६


भरधाव मालवाहू गाडीने चौघांना उडवले…
आई-वडिलांसह दोन मुलांचा दुर्दैवी मृत्यू

पावसामुळे रस्त्याशेजारी दुचाकी लावून झाडाखाली उभारलेल्या होन्याळी ता. आजरा येथील मुंबई स्थित एकाच कुटुंबातील चौघांना भरधाव आयशर गाडीवरील ताबा सुटून गाडीने उडवल्याने चौघांचाही मृत्यू झाल्याची घटना आजरा बहिरेवाडी- मार्गावरील मुम्मेवाडी घाटात काल गुरुवारी सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास घडली.दीपक दत्ताराम चांदे/४० वर्षे, सौ. शोभा दीपक चांदे/ ३५ वर्षे, पूर्वा दीपक चांदे/६ वर्षे व जय दीपक चांदे/९ वर्षे अशी मृतांची नावे आहेत.
या दुर्घटनेची अधिक माहिती अशी…
मुंबईस्थित ( पवई ) चांदे कुटुंबीय सुट्टीसाठी सध्या होन्याळी येथे मूळ गावी आले होते. काल सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास दीपक चांदे हे पत्नी शोभा तिच्यासह मुलगी पूर्वा व मुलगा जय याला दुचाकीवरून दुंडगे/ माद्याळ या गावी निघाले होते. उत्तर कडगाव मुख्य रस्त्याचे काँक्रिटीकरणाचे काम सुरू असल्यामुळे वाहतूक बहिरेवाडी या पर्यायी मार्गाने सुरू होती. चांदे कुटुंबीयांनी या मार्गाचा वापर केला.
होन्याळी येथून प्रवासात बाहेर पडल्यानंतर मुमेवाडी परिसरात पावसाला सुरुवात झाली. चांदी कुटुंबीय रस्त्या शेजारी गाडी लावून एका झाडाखाली आश्रयाला उभे होते. दरम्यान नेरूळ/नवी मुंबई येथून गोव्याच्या दिशेने जाणारा आयशर ट्रक मुंमेवाडी घाटातील वळणावर आला. चांदे कुटुंबीय उभारलेल्या वळणावर गाडीवरील ताबा सुटल्याने चालकाने ब्रेक मारला. पावसामुळे रस्ता ओला असल्याने व जोराचा ब्रेक मारल्याने गाडी घसटत थेट चांदे कुटुंबीयांच्या दिशेने आली व चौघांनाही गाडीने चिरडले. यामध्ये चौघांचाही मृत्यू झाला.मोटरसायकलचेही नुकसान झाले आहे. घटनेनंतर चालकाने गाडी तेथेच सोडून पुढे काढला. या ठिकाणी प्रचंड गर्दी झाली होती. तातडीने पोलीसही दाखल झाले.

याबाबतची फिर्याद सुभाष शंकर पाटील उत्तुर यांनी आजरा पोलिसात दिली आहे.
या फिर्यादीवरून वाहन चालक प्रेम रामदास चंद्र ( रा.सेमरौता/शिवरतनगंज/ तालुका तिलोही/ जिल्हा अमेठी/ रा. उत्तर प्रदेश याच्या विरोधात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. रात्री उशिरा चालक पोलिसात हजर झाला असून पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले आहे.
पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक संजय पाटील करीत आहेत.
दुचाकीसह चौघांना ३० मीटर पर्यंत फरपटत नेले
वाहन चालकाचा वाहनावरील ताबा सुटल्याने चांदे कुटुंबीयांना दुचाकी सह सुमारे ३० मीटर ट्रकने फरपटत नेले.
उपस्थितांचे डोळे पाणावले…
सदर घटनेनंतर नागरिकांनी प्रचंड गर्दी केली होती. एकाच कुटुंबातील दोन मुलांसह चौघांचे मृतदेह बाहेर काढताना उपस्थितांचे डोळे पाणावले.
मध्यमवर्गीय कुटुंबाचा शेवट …
दीपक चांदे हे मुंबई येथे एका खाजगी कंपनीत कामाला आहेत. संपूर्ण कुटुंब मृत्युमुखी पडल्याने होन्याळीसह उत्तुर पंचक्रोशीत हळहळ व्यक्त होत आहे. आता या कुटुंबामध्ये दीपक यांच्या आईसह दोन बहिणी आहेत.
सलग दुसरी घटना…
चार दिवसापूर्वी हाळोली नजिक असाच अपघात होऊन रस्त्याशेजारील चौघांना चारचाकीने उडवल्याने सध्या हे चौघेही रुग्णालयात उपचार घेत आहेत. एकंदरीत या मार्गावरील अपघातांचा प्रश्न गंभीर झाला आहे.

आजऱ्यात २१ हजार ९०० हेक्टरवर होणार खरीपाची लागवड
जमिन तयार करण्याच्या कामाला वेग : बियाण्यांच्या दुकानात गर्दी

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
पावसाळा तोंडावर आल्याने शेतकरी खरीपाच्या तयारीला लागला आहे. शेतकऱ्यांकडून जमीन तयार करण्याचे काम सुरु झाले आहे. बियाण्याच्या दुकानातही गर्दी वाढली आहे. खरीपाची कृषी विभागाकडून जय्यत तयारी सूरू असून यंदा २१ हजार ९०० हेक्टरवर खरीप पिकांची लागवड होणार आहे.
एप्रिल महीन्यापासून खरीप हंगामाची तयारी सुरु होते. गतवर्षी वळवाचा पाऊस मोठ्या प्रमाणात झाला.
मे महीन्यात पावसाने दिलेली सलामी पावसाळ्या अखेर कायम राहीली. पावसामुळे शेतकऱ्यांना घात साधता आली नाही. त्यामुळे खरीप हंगामाची प्रेशी तयारी शेतकरी करू शकला नाही. तालुक्यात लागवडी अभावी जमिन तशीच पड राहीली. यंदा मात्र शेतकऱ्याला खरीपाची तयारी करण्यासाठी पावसाची तेवढी अडचण दिसत नाही. शेतकऱ्यांनी जमिन तयार करण्याची कामे सुरु केली आहेत. पूर्व भागातील शेतकरी, महीला जमिन नांगरणी, सड वेचणीची कामे करीत आहेत. यंदाचा खरीप हंगाम यशस्वी करण्यासाठी शेतकरी व कृषी विभाग धडपडत आहे. शेतकरी रोहिणीचा पेरा साधण्यासाठी. जमिन लवकर तयार करीत आहे. बियाण्यांच्या दूकानात शेतकरी बि-बियाणे खरेदीसाटी गर्दी केली आहे. संकरीत, सुधारीत, संशोधीत जातीची बियाणे खरेदी करीत आहेत. त्याचबरोबर घनसाळ, चंपाकळी, सोरटी या भाताच्या विविध देशी वाणांचीही लागवड यंदा मोठ्या प्रमाणात देशी वाणांचीही लागवड यंदा मोठ्या प्रमाणात होणार आहे.
पिकनिहाय होणारी लागवड हेक्टरमधे
भात – ९ हजार ७००
नागली- ३ हजार
भुईमुग – १० हजार ४००
सोयाबीन- ७००
ज्वारी २५
ऊस ७ हजार ७५.
मलिग्रे येथे जिल्हास्तरीय समिती कडून समाधान व्यक्त

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान अंतर्गत जिल्हास्तरीय तपासणी साठी, लातूर जिल्हा परीषद मुल्यांकन समिती कडून मलिग्रे ता. आजरा येथे भेट देऊन केलेल्या उपक्रमाचे कौतुक व समाधान व्यक्त केले. स्वागत प्रशासक शारदा गुरव यांनी केले.
यामध्ये घरकुल, पानंद रस्ते, स्मशानशेड, मराठी शाळा, अंगणवाडी, प्राथमिक आरोग्य केंद्र, वृक्षारोपण, रेनवाँटर हार्वेस्टिंग, सौर ऊर्जा, सि सि टिव्ही, इत्यादी उपक्रमांची व दप्तर तपासणी प्रकल्प संचालक समिती प्रमुख संजय इंगळे जिल्हापरिषद लातूर, बालाजी पोतदार, बाळकृष्ण बंडे (RGSY ) यानी प्रत्यक्ष पहाणी करून केलेल्या सर्व उपक्रमाचे कौतुक करून समाधान व्यक्त केले.
यावेळी पंचायत समिती सदस्य समिर पारदे, आजरा गटविकास अधिकारी सुभाष सावंत, बाबासाहेब कुंभार वि. अ.( पं) प्रमुख, जे एस बोकडे उपसरपंच चाळू केंगारे, राजाराम नावलगी, शोभा जाधव, कल्पना बुगडे ग्रामपंचायत सदस्य, संस्थेचे पदाधिकारी, तरूण मंडळाचे कार्यकर्ते,ग्रामस्थ उपस्थित होते आभार ग्रामपंचायत अधिकारी धनाजी पाटील यानी मानले.

चंद्रकांत डोंगरे यांचे निधन

आजरा: मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
भादवण येथील चंद्रकांत महादेव डोंगरे यांचे हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने निधन झाले. ते आजरा येथील स्वामी विवेकानंद पतसंस्थेचे माजी शाखाध्यक्ष होते.
त्यांच्या पश्चात एक मुलगा, सून, दोन मुली, जावई, नातवंडे असा परिवार आहे.

आजचे पंचांग
दिनांक : ५ जून २०२६
वार : शुक्रवार
माह (अमावस्यांत) : अधिक ज्येष्ठ
माह (पूर्णिमांत) : अधिक ज्येष्ठ
ऋतु : ग्रीष्म
आयन : उत्तरायण
पक्ष : कृष्ण पक्ष
तिथी : पंचमी (६ जून रात्री ०१.२० पर्यंत) त्यानंतर षष्ठी तिथी
नक्षत्र : श्रवण नक्षत्र (६ जून सकाळी ०६.०२ पर्यंत) त्यानंतर धनिष्ठा नक्षत्र
योग : ब्रह्म योग (सकाळी ०९.४२ पर्यंत) त्यानंतर इन्द्र योग
करण : कौलव करण (दुपारी १२.२८ पर्यंत) त्यानंतर तैतुला करण
चंद्र राशी : मकर राशी
सूर्य राशी : वृषभ राशी
अशुभ मुहूर्त:
राहु काळ : सकाळी १०.५८ ते दुपारी १२.३७ पर्यंत
शुभ मुहूर्त:
अभिजित : दुपारी १२.११ ते दुपारी ०१.०३
सूर्योदय : सकाळी ०६.०१
सूर्यास्त : सायंकाळी ०७.१३
संवत्सर : पराभव
संवत्सर(उत्तर) : रौद्र
विक्रम संवत: २०८३ विक्रम संवत
शक संवत : १९४८ शक संवत

गोकुळ न्यूज
कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघाशी/गोकुळ संलग्न असलेल्या ४२७ संस्था अपात्र ठरवण्यात आल्या होत्या. मात्र तातडीने यापैकी २६९ संस्थांकडून सहाय्यक निबंध/दुग्ध कार्यालयाकडून ठराव मागणी करण्यात आल्याने या संस्था मतदानात पात्र ठरणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. सदर संस्थांनी न्यायालयात दाद मागण्याचा इशारा दिला होता.
यातूनही चार संस्थांनी कोल्हापूर सर्किट बेंच मध्ये निबंधकांच्या अपात्रतेच्या निर्णयाविरोधात याचिका दाखल केली आहे. येत्या सोमवारी या संदर्भात सुनावणी होणार आहे.



