सोमवार दि. ८ डिसेंबर २०२५


लांडग्यांच्या हल्ल्यात शेळी ठार

उत्तूर : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
उत्तूर या.आजरा येथील बामणे गल्लीतील रहिवासी सचिन उत्तूरकर यांच्या गोठ्यात पहाटे साडेतीनच्या सुमारास लांडग्यांच्या कळपाने बंद दरवाजा उचकटून आता प्रवेश करून एक शेळी ठार केली. गुरांच्या ओरडण्यामुळे घरातील मंडळी जागी झाली, मात्र तोपर्यंत कळपाने पळ काढला होता. वन्यप्राणी घरापर्यंत पोहोचल्यामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
घटनेची माहिती मिळताच वनपाल सागर पवार (गडहिंग्लज), वनरक्षक आर. व्ही. पाटील, वनसेवक आनंदा कुंभार तसेच पशुवैद्यकीय अधिकारी निखिल यादव यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. पंचनाम्याचा अहवाल वनविभागाकडे सादर करण्यात आला आहे. या घटनेत झालेल्या नुकसानीबाबत उत्तूरकर कुटुंबीयांनी नुकसान भरपाईची मागणी केली आहे. सदर घटनेची माहिती ग्रामपंचायत सदस्य संदेश रायकर व डी. बी. सावंत यांनी दिली.

रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी यांच्या सिद्ध पादुकांचा सरोळी येथे कार्यक्रम
स्वयंरोजगारासाठी १६ घरघंट्यांचे मोफत वाटप

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
जगद्गुरु रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी दक्षिण पीठ नाणीजधाम, रत्नागिरी यांचा बुधवार दि.१० डिसेंबर २०२५ रोजी सरोळी ता.आजरा येथे सकाळी ९ वाजले पासून पादुका दर्शन सोहळा सामाजिक उपक्रमासह संपन्न होत आहे.
या सोहळ्यासाठी विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित राहणार आहेत दि. ९ डिसेंबर रोजी जगद्गुरु रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी यांच्या दिव्य पादुकांचे सरोळी येथील आकाराम देसाई यांच्या निवासस्थानी मुक्कामी राहणार आहेत स्वागत पादुका पूजन व भजन सोहळा संपन्न होणार आहे दिनांक १० डिसेंबर रोजी सकाळी ९ वाजले पासून सरोळी गावातून जगद्गुरूंच्या सिद्ध पादुकांची रथातून भव्य शोभायात्रा निघणार आहे या शोभायात्रेमध्ये विविध पथक असणार आहेत. ही शोभायात्रा गावातील प्रमुख मार्गावरून निघणार आहे १० वाजेपर्यंत शोभायात्रेचे कार्यक्रम स्थळी प्रस्थान होणार आहे त्यानंतर ११ वाजता ज.न.म. संस्थानाच्या सामाजिक उपक्रमांतर्गत दुर्बल घटक पुनर्वसन उपक्रमा अंतर्गत गरीब व गरजू महिलांना स्वयंरोजगारासाठी १६ घरघंटीचे वाटप प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत होणार आहे.यावेळी पादुका व गुरुपूजन सोहळा आरती सोहळा ज.न.म. प्रवचनकार भूषण सौ गौराताई चौगुले यांचे प्रवचन संपन्न होणार आहे .
रामानंद संप्रदायामध्ये नविन समाविष्ट होणाऱ्या भक्तगणांना उपासक दीक्षा व पादुका दर्शन सोहळा संपन्न होणार आहे .या कार्यक्रमात उपस्थिती राहून आध्यात्मिक शांतीचा अनुभव घ्यावा.असे आव्हान रामानंद संप्रदाय कोल्हापूर जिल्हा सेवा समितीच्या वतीने करण्यात येत आहे. या कार्यक्रमासाठी सुमारे दहा ते पंधरा हजार भाविक भक्तगण उपस्थित राहणार आहेत तसेच सर्वांना महाप्रसादाची व्यवस्था केली आहे.हा कार्यक्रम संपन्न करण्यासाठी कोल्हापूर जिल्हा सेवा समितीचे आजी माजी पदाधिकारी
व आजरा तालुक्यातील पदाधिकारी प्रयत्न करीत आहेत.या कार्यक्रमासाठी भव्य मंडप व्यवस्था करण्यात आली आहे या कार्यक्रमाची सांगता पुष्पवृष्टीने होणार आहे.

मलिग्रे हायस्कूल ऊर्जितावस्थेत आणणार : दत्ता मराठे

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
आजरा तालुक्यातील पूर्व भागातील मलिग्रे हायस्कूल हे सर्वात पहिले व नामवंत हायस्कूल म्हणून पाहिले जाते. १९७२ साली जुन्या जाणत्या अशिक्षित मंडळीनी, गावचा विकास डोळ्या समोर ठेऊन मुलाच्या शैक्षणीक प्रगती करीता महात्मा फुले हायस्कूल महागावच्या शाखेची स्थापना करून गोर- गरीब बहूजन समाजाच्या मुलाच्या शिक्षणाची सोय करून दिली. अनंत अडचणीतून शिक्षक व ग्रामस्थांनी या शाळेला योगदान दिले. पण आज या शाळेची दयनिय अवस्था झाली असून गावच्या एकोप्यातून या हायस्कू ला पून्हा ऊर्जितावस्थेत आणणार असलेचे दत्ता मराठे मुंबई ग्रामसेवा मंडळाचे अध्यक्ष यांनी सांगितले. या ग्रामसभेच्या अध्यक्षस्थानी सरपंच शारदा गुरव होत्या.
मराठे यांनी हायस्कूलच्या एकून कामकाजाचा आढावा घेत, मंडळाची स्वतः ची शाळा इमारत व प्रशस्त मैदान असून ही, महागावच्या संस्था चालकांनी या शाखेकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करून, मनमानी केल्याने व शिक्षेकांची आदलाबदल करून शैक्षणिक धोरणाप्रमाणे सेवा सुविधा नाकारल्याने या हायस्कूलची दुरावस्था झाल्याचा गंभीर आरोप केला. यासाठीच डिसेंबर मध्येच ग्रामसभा घेऊन ग्रामस्थाच्या अडचणी समजावून घेत, संस्था चालकाना चार महीन्यांची संधी देत असल्याचे सागितले.
यावेळी मुंबई मंडळचे माजी अध्यक्ष व साखर कारखाना संचालक अशोक तर्डेकर यांनी मुंबई मंडळाने गावच्या शाळेच्या अडचणी साठी मंडळामार्फत शाळा इमारत व इतर सुविधा देण्याचा प्रयत्न केला आहे. यासाठी पून्हा देणगीरूपाने मंडळ व माजी विध्यार्थी मदत करतील पण संस्था चालकानी वेळीच लक्ष द्यावे. तसेच शिक्षणाचा दर्जा कमी झाल्याने ग्रामस्थानी मुले इतर संस्थेकडे पाठवली या मुलाचा सर्वे करून, पालकांची मानसिकता तयार करून घेऊन, पटसंख्या वाढीसाठी व दर्जेदार शिक्षण मिळण्यासाठी संस्था चालकांबरोबर निर्णय होत नसेल तर पर्यायी मार्ग शोधून गावची शाळा वाचवण्याचा प्रयत्न करावा असे मत व्यक्त केले.
माजी सरपंच समिर पारदे यांनी आमची शाळा म्हणून या शाळेकडे पाहीले आहे. परंतू २०१६ पासून संस्था अध्यक्ष भेटत नाहीत. त्याना शाखा चालवणे शक्य नसेल तर ग्रामस्थाच्या ताब्यात द्यावी अशी मागणी केली.माजी सरपंच अशोक शिंदे यानी पंचवीस वर्षी पूर्वी शाळा गावच्या ताब्यात असावी यासाठीच प्रयत्न केला होता.
तर ग्रामसभा अध्यक्ष सरपंच शारदा गुरव यांनी शिक्षण गुणवत्ता पुर्ण असेल तरच गावचा विकास होतो यासाठी मुंबई मंडळने घेतलेली भुमिका योग्य असून मलिग्रे ग्रामस्थ पाठीशी असलेचे सांगितले.
यावेळी संजय घाटगे सुरेश पारदे, अनिल कागिनकर, शिवाजी भगुत्रे, विजय बुगडे,विश्वास बुगडे, अनिल तर्डेकर यानी मनोगत व्यक्त केली. यावेळी उपसरपंच चाळू केंगारे, शोभा जाधव सुरेखा तर्डेकर, विठ्ठल नेसरीकर, ऊत्तम भगूत्रे, महादेव तर्डेकर,श्रीपाद देशपांडे, तानाजी भनगे, उदय देशपांडे, प्रकाश सावंत, कृष्णा जाधव यांच्यासह मुंबई मंडळाचे पदाधिकारी व ग्रामस्थ उपस्थित होते आभार अनिल आसबे यांनी मांडले.

शिरसंगी येथे १९ डिसेंबर पासून विज्ञान प्रदर्शन
दोन दिवस कार्यक्रम मान्यवरांची उपस्थिती

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
शिरसंगी (ता. आजरा) येथे ५३ वे तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनाचे पंचायत समिती शिक्षण विभाग आज आदर्श हायस्कूल शिरसंगी यांच्यावतीने आयोजन केले आहे. विकसित आणि आत्मनिर्भर भारतासाठी विज्ञान व तंत्रज्ञान हा विषय आहे.
चंदगडचे आमदार शिवाजीराव पाटील यांच्या हस्ते बुधवार (ता. १९) उद्घाटन होईल. आजरा महाल शिक्षण मंडळाचे अध्यक्ष जयवंतराव शिंपी कार्यक्रमाचे अध्यक्ष आहेत. मराठी विज्ञान परिषद गडहिंग्लजचे प्रा. डॉ. एस. के. नेर्ले प्रमुख वक्ते असून ‘ विकसीत आणि आत्मनिर्भर भारतासाठी विज्ञान व तंत्रज्ञान’ हा विषय मांडतील. तहसीलदार समीर माने, गटविकास अधिकारी सुभाष सावंत उपस्थित राहणार आहेत. जिल्हा परिषद शिक्षणविभागाच्या शिक्षणाधिकारी (माध्यमिक) सुवर्णा सावंत, उपशिक्षणाधिकारी रविंद्र चौगुले, गटशिक्षणाधिकारी बसवराज गुरव, शिक्षणविस्तार अधिकारी निवृत्ती यादव, केद्रप्रमुख रावसाहेब देसाई, सरपंच संदिप चाग्ले प्रमुख अतिथी आहेत. गुरुवार (ता. ११) पारितोषिक वितरण व समारोप कार्यक्रम होईल.
वैदयकिय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ, पालकमंत्री प्रकाश आबिटकर प्रमुख पाहुणे आहेत. जयवंतराव शिंपी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी आहेत. जिल्हा शिक्षणाधिकारी (प्राथमिक) मीना शेंडकर, गटशिक्षणाधिकारी बसवराज गुरव, निवृत्ती यादव, रावसाहेब देसाई, प्राथमिक शिक्षक बँकेचे संचालक शिवाजी बोलके, सुनिल शिंदे, प्रकाश तिबीले, एकनाथ गिलबिले, धनाजी रावण, मायकेल फर्नांडीस, शिवाजी सावंत, परेश देशमुख, विजय पोतदार, बाळकृष्ण सूर्यवंशी, अरुण गोंधळी, एस. एस. नागुर्डेकर, मारुती मुगुटकर, विजय कोड्सकर आदीसह मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

सिरसंगीत विविध विकास कामांचा शुभारंभ

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
सिरसंगी या.आजरा येथे विविध विकासकामांचा शुभारंभ सरपंच संदिप चौगले यांच्या उपस्थितीत करण्यात आला.
गावांतर्गत रस्ते खडीकरण व डांबरीकरण करण्यात आले . शुद्ध पिण्याचे पाणी पुरवठ्यासाठी वाॅटर एटीएम बसवले असून २४ तास पाणीपुरवठा होणार असल्याची माहिती सरपंच चौगले यांनी दिली . या एटीएमद्वारे शुद्ध पाण्याचा पुरवठा फक्त ५ रू मध्ये १० ली ॲक्वाचे पाणी मिळू लागले आहे. त्यामुळे गावात सुरक्षेच्या दृष्टीने संपूर्ण गावात तसेच ग्रामपंचायत, प्राथमिक शाळा, बस स्टँड परिसर इ ठिकाणी एकूण १८ सी. सी. टी.व्ही. कॅमेरे बसवले असल्याची तसेच गावातील मुख्य रस्ता डांबरीकरण करणेत आल्याची माहिती सरपंच चौगले यांनी दिली.
यावेळी तंटामुक्त समितीचे अध्यक्ष शिवाजी होडगे, माजी उपसरपंच पांडुरंग टकेकर, संतोष चौगुले, सी.आर.देसाई, अमृत देसाई, भैरु टकेकर, वसंत सुतार, थळबा कांबळे, सरिता कुंभार, सुमन होडगे, रेश्मा कांबळे ,सागर कुंभार यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.

व्यंकटराव शिक्षण संकुलात डॉ. बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिन साजरा.

येथील व्यंकटराव शिक्षण संकुलामध्ये भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त प्रशालेचे प्राचार्य एम.एम. नागुर्डेकर, पर्यवेक्षिका सौ. व्ही. जे. शेलार यांचे हस्ते प्रतिमेचे पूजन करण्यात आले.
एस.वाय.भोये यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या जीवन कार्याबद्दल विद्यार्थ्यांना माहिती सांगितली.
एम.एम.नागुर्डेकर यांनी देखील आपल्या मनोगतात डॉ. बाबासाहेब यांना वाचनाची खूप आवड होती ग्रंथालयामध्ये ते अठरा तास अभ्यास करत असत. परिस्थिती हालाखीची असल्याने यादरम्यान वाचन करत असताना भूक लागू नये म्हणून ते निव्वळ पाव खाऊन त्यावर तांब्याभर पाणी पीत असत. अशा प्रतिकूल परिस्थितीवर मात करत त्यांनी देशात तसेच परदेशात जाऊन आपले शिक्षण पूर्ण केले.
कार्यक्रमासाठी सर्व शिक्षक, शिक्षिका, शिक्षकेतर कर्मचारी व सर्व विद्यार्थी उपस्थित होते.
आजरा हायस्कूल

येथील आजरा हायस्कूलमध्ये महापरिनिर्वाण दिन उत्साहात साजरा करण्यात आला. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमा पूजनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली मुख्याध्यापक तोडकर उपमुख्याध्यापक सौ एच एस कामत यांच्या हस्ते प्रतिमा पूजन करण्यात आले.
श्रीमती एम.एस.कांबळे यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विषयी माहिती सांगितली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार व्ही.पी.हरेर यांनी केले. कार्यक्रमास सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
पं.दिनदयाळ विद्यालय

पं. दीनदयाळ विद्यालय आजरा मध्ये भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिन साजरा करण्यात आला.
पालक अमोल कुंभार यांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन केले. संविधानाचे शिल्पकार डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे प्रेरणादायी विचार तसेच त्यांचे संविधानातील योगदान , समस्त भारतीयांचे उद्धार कर्ते ,मानवतेचे मित्र ,थोर समाज सुधारक ,स्त्रियांचे तसेच उपेक्षितांचे कैवारी शोषितांचे कुशल संघटक, स्वातंत्र्य ,समता ,बंधुता या जीवन मूल्यांचे प्रबळ समर्थ यासंदर्भात डॉ .बाबासाहेब आंबेडकर यांची माहिती सहा.शिक्षिका शालन कांबळे यांनी विद्यार्थ्यांना सांगितली. कार्यक्रमासाठी विद्यालयातील शिक्षक ,शिक्षकेतर कर्मचारी तसेच विद्यार्थी – विद्यार्थिनी उपस्थित होते.

निधन वार्ता
दत्तू वंजारे

आमराई गल्ली/ शिवाजीनगर येथील दत्तू आबा वंजारे ( वय ९८ वर्षे ) यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या पश्चात तीन विवाहित मुले, एक विवाहित मुलगी, जावई, सुना, नातवंडे असा परिवार आहे. आजरा महाविद्यालयाचे वरिष्ठ लिपिक सुधाकर वंजारे यांचे ते वडील होत.
रक्षा विसर्जन आज सोमवारी सकाळी आजरा येथे आहे.



