रविवार दि. २१ सप्टेंबर २०२५

आजरा येथे भरधाव कंटेनरवरील चालकाचा ताबा सुटला
चार चाकी सह दुचाकी चक्काचूर ,चौघे जखमी

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
गोव्याहून कोल्हापूरच्या दिशेने जाणाऱ्या कंटेनरवरील चालकाचा वाहनावरील ताबा सुटून भरधाव वेगाने येथील संभाजी चौकात हॉटेल मॉर्निंग स्टार जवळ उभ्या अवस्थेत असणाऱ्या मारुती अल्टो चार चाकीसह दुचाकीला जोरदार धडक दिल्याने चारचाकी मधील चौघेजण जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी गडहिंग्लज व कोल्हापुर येथील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. शनिवारी रात्री सव्वा करा वागण्याच्या सुमारास सदर प्रकार घडला.
याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की..
सदर कंटेनर (MP 09 ZQ 7271) वरील चालकाचा ताबा सुटल्याने कंटेनर सुसाट येऊन चार चाकी (MH 09 EK 8930 ) सह दुचाकीवर आदळला. चार चाकी मध्ये कोल्हापूर येथून परतलेले चाफे गल्ली/ नागझरी परिसरातील विमा एजंट संजय शंकर यादव कुटुंबातील चौघे जण होते ते गाडीत अडकल्याने व जोराची धडक बसल्याने जखमी झाले. तर येथेच उभे असणारी स्प्लेंडर मोटरसायकल (MH 09 FE 2780) कंटेनर खाली सापडून तिचेही मोठे नुकसान झाले.
अपघात झाल्यानंतर मोठा आवाज आल्याने घटनेनंतर नागरिकांनी घटनास्थळी प्रचंड गर्दी केली होती. तातडीने चार चाकी मधील जखमींना कोल्हापूर येथे उपचारासाठी हलवण्यात आले आहे.
रात्रीची वेळ असल्याने सुदैवाने या गजबजलेल्या चौकामध्ये जीवितहानी झाली नाही. हीच घटना दिवसा घेतली असती तर मोठा अनर्थ घेतला असता.
आजरा पोलीस पुढील तपास करीत आहेत.
संजय गोपाळ यादव पण गोपाळ यादव कमल संजय यादव, मुलगा
बांबूतून आर्थिक विकासाची संधी ; प्रा.अजय राणे
आजरा येथे बांबू लागवड व हस्तकला कार्यशाळा उत्साहात

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
शासनाचे सकारात्मक धोरण व आजरा तालुक्यातील शेतकऱ्यांनी बांबू पिकासाठी उभारलेली चळवळ यामुळे शेतकऱ्यांचा बांबूकडे बघण्याचा दृष्टीकोन बदलला आहे. यामुळे शेतकरी बांबू पिकाकडे वळत आहे. यातून आर्थिक विकासाची संधी मिळेल. असा विश्वास कोकण कृषी विद्यापिठाचे वनशास्त्र महाविद्यालयाचे सहाय्यक प्राध्यापक डा अजय राणे यांनी व्यक्त केला.
आजरा येथे बांबू लागवड तंत्रज्ञान व हस्तकला कार्यशाळा झाली. जनता एज्युकेशन सोसायटीचे मुख्यकार्यकारी अधिकारी डॉ. अनिल देशपांडे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. कृषी उपसंचालक बसवारज मास्तोळे, आयसीईसीचे कार्यकारी संचालक डॉ. प्रमोदकुमार, आयआयटी पवईचे राजाराम देसाई, आयसीईसीचे डा. सहा. प्रा. विलास जाधव, सहाय्यक गटविकास अधिकारी दिनेश शेटे, उपविभागीय कृषी अधिकारी किरण पाटील, आत्मा कृषी समितीचे माजी अध्यक्ष इंद्रजीत देसाई, ज्योत्स्ना चराटी, के.व्ही. येसणे, अनिकेत चराटी, बांबू तज्ञ सतिश कांबळे, कृष्णा वरेकर, प्राचार्य डॉ. अशोक सादळे, सुधीर कुंभार, जी. एम. पाटील, वसंतराव तारळेकर, ॲड. विकास पाटील, निवृत्ती कांबळे, सी. आर. देसाई, रणजित सरदेसाई, विजय थोरवत, आदी प्रमुख उपस्थित होते. कृषी विभाग, आत्मा, आजरा बांबू क्लस्टर फौंडेशन, आजरा महाविद्यालयाच्यावतीने कार्यशाळा झाली.

तालुका कृषी अधिकारी भूषण पाटील यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. डॉ. अजय राणेंनी बांबू लागवड तंत्रज्ञान, संगोपन, बांबू काढणी व विक्री व्यवस्थापन याबाबत माहीती दिली. बांबू डिझायनर (इंजिनिअर) रितेश ढोले म्हणाले, बांबूला संसाधन म्हणून न्याय मिळणे आवश्यक आहे. करीता बांबूचा औद्योगिक वापर वाढला पाहीजेत. या वापरासोबत स्थानिक बांबू कारागीर आणि तरुणांना रोजगार उपलब्ध होतील. बांबू आधारीत उद्योग इतर क्षेत्रालाही पुरक ठरेल. या वेळी डॉ.प्रमोद कुमार म्हणाले, बांबू बाबत केंद्रशासनाने मिशन राबविले आहे. याचा प्रयोगिक प्रयोग आजरा तालुक्यात सुरु आहे. बांबू शेतकऱ्यांची नोंदी करण्याबरोबर त्यांना तांत्रिक मदत करण्याचे काम बेंगळूरची इन्स्टिटूट आफ सोशल इकॉनामिक संस्था करणार आहे. श्री. मास्तोळी, श्री. देसाई,
रणजित सरदेसाई यांची भाषणे झाली.
कार्यक्रमास राजू पोतनीस, मंगेश पोतनीस, संभाजीराव सावंत, पी. बी. कोळेकर, प्रा. मल्लीकार्जुन शिंत्रे, नचिकेत भद्रापुर, शिवाजी येसणे, अमित येमगेकर, डॉ. धनाजी राणे, रामदास देसाई, श्री. डेळेकर प्रा.दिलीप भालेराव, निवृत्ती कांबळे,यांच्यासह कृषी विभागाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. प्रदीप माळी यांनी आभार मानले.

मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानांतर्गत, सोहाळे गावात ‘वृक्षारोपणाचा – वृक्षदिंडीसह अभिनव उपक्रम

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
मृदंग- टाळाच्या गजरात अभंगाचा ताल, सजविलेली पालखी, पारंपारिक वेषभूशेतील ग्रामस्थ आणि शाळकरी विद्यार्थी यांचे एक तालबद्ध आणि शिस्तप्रिय पण भक्तीभाव पूर्ण वातावरण सोहाळे गावात पहायला मिळाले
निमित्त होते मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानांतर्गत ‘अनोख्या वृक्षदिंडी’ कार्यक्रमाचे.
ग्रुप ग्रामपंचायत सोहाळे बाची व सामाजिक वनीकरण विभाग गडहिंग्लज यांच्या संयुक्त विद्यमाने मौजे सोहाळेवाडी येथील गायरानान ४५०० रोपांचे वृक्षारोपण करण्यात आले. लोकसहभागातुन ‘हरित गाव’ ही संकल्पना साध्य करण्यासाठी वृक्षारोपणाचा मोठा उपक्रम राबविण्यात आला. सर्वप्रथम वृक्षदिंडीसाठी आवश्यक पालखीचे पूजन सरपंच सौ. भारती डेळेकर व उपास्थित् महिला पदाधिकारी यांचे हस्ते करण्यात आले गावातील भजनी मंडळाच्या साथीने ग्रामस्थ, पदाधिकारी, सर्व कर्मचारी, विद्यार्थी या दिंडीत सहभागी झाले होते.तसेच वृक्षारोपण कार्यक्रम स्थळी वृक्ष लागवड कार्यक्रमाची सुरुवात सरपंच संघटनेचे तालुकाध्यक्ष श्री. बापू नेऊंगरे, संस्थापक अध्यक्ष श्री. संभाजी सरदेसाई व सामाजिक वनीकरण चे वनपाल श्री. संजय निळकंठ यांचे हस्ते करणेत आली.
सदर कार्यक्रम साठी उपसरपंच श्री वसंत कोंडूसकर ,सदस्य सौ. निर्मला दोरुगडे आदीसह ग्रामपंचायत सर्व सदस्य, कर्मचारी, वनविभाग आजरा चे कर्मचारी, सौ. रेखा कांबळे महसूल अधिकारी,श्री. सूर्यकांत दोरुगडे, सोहाळे, सोहाळेवाडी गावातील भजनी मंडळे, विद्या मंदिर सोहाळे शाळेचे विद्यार्थी व शिक्षक , अंगणवाडी कर्मचारी आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपास्थित होते.

आजरा आगार व्यवस्थापन कारभाराबाबत शिवसेना काढणार तिरडी मोर्चा

आजरा: मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
गेले काही महिने तालुक्यातील एसटी चे वेळापत्रक पूर्णपणे कोलमडले असून बस वेळेवर स्थानकावर येत नाहीत तर कांही ठिकाणच्या वस्तीच्या गाड्या बंद केल्या आहेत. यामुळे शाळकरी विद्यार्थ्यांसह तालुका वासीयांचे मोठे हाल होत आहेत. वारंवार विनंती करूनही यामध्ये सुधारणा होत नसल्याने अखेर आजरा आगारावर २६ सप्टेंबर रोजी तिरडी मोर्चा काढण्याचा इशारा शिवसेना उबाठा गटाने दिला आहे.
महाराष्ट्रात प्रथम क्रमांकावर असणारा आजरा आगार व्यवस्थापनाच्या ढिसाळ नियोजनामुळे बंद होण्याच्या मार्गावर आलेले आहे. मुळातच तालुका हा डोंगराळ व ग्रामीण भाग असलेले आजरा शहरातील मुख्य बाजारपेठेमध्ये बाजारहाटीसाठी, दवाखान्यासाठी, शैक्षणिक कामांसाठी व शासकीय कामांसाठी तालुका वासिय मोठ्या प्रमाणावर ये-जा करत असतात आगाराच्या या कारभारामुळे त्यांचे मोठे नुकसान होत आहे. या पार्श्वभूमीवर आगार प्रशासनाला जाग आणण्यासाठी सदर मोर्चा काढण्यात येणार आहे असे लेखी निवेदनात म्हटले आहे. निवेदनावर शिवसेना उपजिल्हाप्रमुख संभाजी पाटील, तालुकाप्रमुख युवराज पोवार, अमित गुरव, यांच्यासह पदाधिकाऱ्यांच्या सह्या आहेत.

छाया वृत्त

जेऊर – आजरा रोडवर कासार कांडगाव आणि जेऊर च्या मध्ये काल शनिवार सायंकाळी ६:३० वाजण्याच्या सुमारास हत्तीने खुलेआम दर्शन दिले.
या मार्गावरील वाहनधारकांची मात्र चांगलीच धावपळ उडाली.

निधन वार्ता
शेवंता वांद्रे

मोरेवाडी या.आजरा येथील शेवंता नारायण वांद्रे (वय ७६ वर्षे) यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात पती, एक मुलगा, दोन मुली, सुन जावई, नातवंडे असा परिवार आहे.
वांटंगी हायस्कूलचे कर्मचारी चंद्रकांत वांद्रे यांच्या त्या आई होत. रक्षा विसर्जन सोमवार दि. २२ रोजी होईल.
विष्णू जाधव

चाफे गल्ली, आजरा येथील विष्णू चंद्रू जाधव (वय ९० वर्षे ) यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या पश्चात दोन मुले, दोन मुली, सुना, जावई ,नातवंडे असा परिवार आहे.
करपादेवी दूध संस्थेचे ते माजी संचालक होते.

अभिनंदनीय..

प्रतीक कांबळे याची लंडनमधील महाविद्यालयात सायबर सिक्युरिटी मास्टरसाठी निवड झाली आहे. प्रतीक हा भादवण ता.आजरा येथील असून वडिलांच्या पश्चात आई व भावाच्या मदतीने त्याने लंडन येथील युसीएल या जगातील नऊ नंबरच्या महाविद्यालयात प्रवेश मिळवल्याने त्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.

वक्तृत्व स्पर्धेत खुल्या गटात संकेत पाटील तर शालेय गटात पृथ्वीराज चव्हाण, समृध्दी वांद्रे प्रथम

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
श्रीमंत गंगामाई वाचन मंदिर आजरा संचालित ‘मृत्युंजय’कार शिवाजी सावंत सांस्कृतिक मंचतर्फे कै. पांडुरंग बिडकर गुरूजी स्मृती खुल्या वक्तृत्व स्पर्धेत संकेत कृष्णात पाटील पाडळी ता. करवीर यांनी प्रथम क्रमांक मिळवीला, तर कै. लक्ष्मण पाटील गुरूजी स्मृती प्राथमिक शालेय वक्तृत्व स्पर्धत कु. पृथ्वीराज सर्जेराव चव्हाण – कुमार विद्यामंदिर सरंबळवाडी व कै. रमेश टोपले स्मृती माध्यमिक शालेय वक्तृत्व स्पर्धेत कु. समृध्दी उत्तम वांद्रे – पेरणोली हायस्कुल पेरणोली यांनी प्रथम कमांक पटकाविला.
खुल्या वक्तृत्व स्पर्धेत व्दितीय क्रमांक चैतन्य कुंडलिक कांबळे कोळवण ता. भुदरगड, तृतीय क्रमांक कु. अमृता पांडुरंग सागर शिप्पूर ता. गडहिंग्लज, चतुर्थ क्रमांक चारूदत्त महादेव माळी -अब्दुललाट ता. शिरोळ व पाचवा क्रमांक कु. श्रृती विष्णू कांबळे मडिलगे, ता. आजरा यांना मिळाला. शालेय वक्तृत्व स्पर्धेत प्राथमिक गटात व्दितीय क्रमांक कु. रिया संतोष पारपोलकर आजरा हायस्कुल आजरा, तृतीय क्रमांक कु. सानिया सिकंदर शिदलाळे आजरा हायस्कुल आजरा तर कु. शिवराज बाजीराव देसाई – विद्यामंदिर कोरीवडे यांना उत्तेजनार्थ क्रमांक मिळाला. माध्यमिक गटात व्दितीय क्रमांक कु. हाजिक इरफान सय्यद व्यंकटराव हायस्कुल आजरा, तृतीय क्रमांक कु. सानवी लक्ष्मण चौगुले -व्यंकटराव हायस्कुल आजरा तर कु. युविका अमर पोवार पं. दीनदयाळ विद्यालय आजरा यांना उत्तेजनार्थ क्रमांक मिळाला. या स्पर्धामध्ये ६५ स्पर्धकांनी उत्स्फुर्त सहभाग घेतला.
स्पर्धेच्या अध्यक्षस्थानी वाचनालयाचे अध्यक्ष श्री. वामन सामंत होते. श्री संजय बिडकर, विजयकुमार पाटील, निनाद टोपले व चंद्रशेखर बटकडली हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
या स्पर्धेतील विजेत्यांना प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते पारितोषिकांचे वितरण करण्यात आले.
वाचनालयाचे अध्यक्ष वामन सामंत यांनी स्वागत व प्रास्ताविक केले, कार्यवाह कुंडलिक नावलकर व विजय राजोपाध्ये यांनी सुत्रसंचालन केले तर उपाध्यक्षा विद्या हरेर- पाटील यांनी आभार मानले.



