mrityunjaymahanews
कोल्हापूरगुन्हाठळक बातम्यामहाराष्ट्र

चिमणे येथील एकाचा चिकोत्रा धरणाच्या पाण्यात बुडून मृत्यू

चिमणे येथील एकाचा चिकोत्रा धरणाच्या पाण्यात बुडून मृत्यू

 

चिमणे (ता. आजरा) येथील प्रकाश पांडुरंग खाडे (वय 43) यांचा चिकोत्रा प्रकल्पाच्या पाणी पात्रात पडून मृत्यू झाला.

आज सकाळी त्यांचा मृतदेह प्रकल्पाच्या पाण्यामध्ये तरंगताना आढळला. दोन ते तीन दिवसांपूर्वी सदर घटना घडली असावी असा अंदाज वर्तवला जात आहे.प्रकाश हे शेतकरी कुटुंबातील असून त्यांच्या  पश्चात  आई,पत्नी,दोन मुले असा परीवार आहे.श्रीकांत पांडुरंग भोसले यांनी याबाबत वर्दी दिली आहे.

…..

 

कोवाडे येथील गोठ्यातून ५१ हजार किमतीच्या ५ शेळ्या चोरीस

कोवाडे (ता. आजरा) येथील दिपक चंद्रकांत मेणे यांच्या गोठ्यात बांधलेल्या पाच शेळ्या अज्ञात चोरट्याने चोरुन नेल्याचा प्रकार सोमवारी उघडकीस आला. तक्रारदार दिपक मेणे यांची एक शेळी व राजीव तुकाराम हुंदळेकर यांच्या चार शेळ्या अशा एकूण पाच शेळ्या अंदाजे ५१ हजार रुपये किंमतीच्या चोरीस गेल्या असल्याची नोंद आजरा पोलीस ठाण्यात झाली आहे.
अधिक तपास आजरा पोलिस करीत आहेत.
———–

आजर्‍यातील हाजगोळी बंधार्‍याच्या दुरुस्तीच्या नावावर लाखो रुपर्‍याचा चुराडा , स्थानिक नागरिकांतून संतापाची लाट

पाटबंधारे विभागासह संबंधित प्रशासकीय यंत्रणेचे दुर्लक्ष


दीड वर्षापूर्वी वर्क ऑर्डर मिळूनही ऐन पावसाळ्यात आजरा तालूक्यातील हिरण्यकेशी नदीवरील हाजगोळी बंधाऱ्याचे डागडुजी करण्याची धडपड संबंधित ठेकेदाराकडून सुरू असून लोकप्रतिनिधींसह प्रशासकीय यंत्रणेचा वरदहस्त असल्याने हे लाखो रुपये सध्यातरी पाण्यातच जाण्याची शक्यता जाणकारांकडून व्यक्त केली जात आहे.

गेले आठ दिवस हाजगोळी बंधाऱ्याच्या मजबुतीकरणाच्या उद्देशाने बंधाऱ्याच्या पायथ्याशी असणारा दगडी भराव काढून तेथे सिमेंट काँक्रीट टाकण्याचे काम सुरू आहे .मुळातच पावसाळ्यात अशी कामे करू नयेत अशा शासनाच्या सक्त सूचना असताना ऐन पावसामध्ये हे काम सुरू ठेवण्याचे गौडबंगाल कायम आहे .दर्जाचा पत्ता नसणा-या या कामाकडे पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱयांसह महसूल व इतर प्रशासकीय यंत्रणेचे सोयीस्कररीत्या दुर्लक्ष होत असलेले प्राधान्याने दिसत आहे.

दीड वर्षापूर्वी वर्क ऑर्डर मिळाली असुनही ऐन पावसामध्ये हे काम सुरू करण्यामागचा ठेकेदाराचा हेतू स्पष्ट होत नाही .हे काम तातडीने थांबविण्याशिवाय सध्यातरी पर्याय नाही असे असतानाही वरून पाऊस आणी नदीमध्ये वहाते पाणी अशी परिस्थिती असून यामध्येच काँक्रीट टाकण्याचे काम सुरू आहे. हे काँक्रीट खरोखरच टिकाऊ होणार का व बंधारा मजबूत होणार का? हा आता संशोधनाचा विषय बनू लागला आहे.

सुमारे पंचवीस लाख रुपये या कामी खर्च होणार असून एकंदर कामांचा दर्जा पाहिल्यास हे लाखो रुपये पाण्यात जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे.अचानकपणे पावसाचा जोर वाढल्यास बंधाऱ्याचे मजबुतीकरण होण्याऐवजी बंधाऱ्याचा पायालगतचा भरावही वाहून जाण्याची शक्यता नाकारता येत नाही.

नदीमध्ये पाणी असताना व पावसामध्ये हा प्रकार सुरू असल्याने स्थानिक नागरिकांकडून तीव्र संताप व्यक्त होत आहे.याबाबत शिवसेनेच्या काही पदाधिकाऱ्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना जाब विचारला असून अधिकार्यांकडून उडवाउडवीची उत्तरे देण्यात आल्यानेही काम पूर्ण करण्यामागचा उद्देश स्पष्ट होत नाही.

शेकडो ब्रास मुरूम व मातीचे उत्खनन


या बंधाऱ्याच्या दुरुस्तीसाठी शेकडो ब्रास विनापरवाना माती व मुरुमाचे उत्खनन झाल्याची चर्चा या परिसरात असून शेतातील ट्रॉलीभर मुरूम अथवा मातीचे उत्खनन करताना दंडात्मक कारवाईचा बडगा उगारणा-या अधिकारी वर्गाने शेकडो ब्रास मुरुम व मातीचे उत्खनन झाले असताना धृतराष्ट्राची भूमिका घेण्यामागचे कारण अनुत्तरीतच  आहे .

नदीचे पाणी अडवण्यासाठी शेकडो ब्रास मुरुम व मातीचा खुलेआम वापर करण्यात आला आहे.बंधाऱ्याच्या एका बाजुला नवीन मातीचा बंधारा तयार करण्यात आला आहे असे म्हटल्यास वावगे ठरू नये.सदर माती व मुरूम काढण्यासाठी संबंधित ठेकेदाराने परवानगी घेतली आहे का? असा प्रश्न आता या भागातील रहिवाशी विचारू लागले आहेत.

वास्तविक मुरूम व मातीचे उत्खनन करताना महसूल विभागाची रीतसर परवानगी घेणे आवश्यक आहे प्रत्यक्षात अशी परवानगी घेतली नसल्याचेही समजते. घेतली असल्यास नेमकी किती ब्रासची परवानगी घेतली होती व प्रत्यक्ष किती व नेमके कोठे उत्खनन झाले आहे, हे पाहणे गरजेचे आहे.हा सर्व प्रकार सुरू असताना संबंधित तलाठी, मंडल अधिकारी व महसूल विभागाची इतर यंत्रणा काय करत आहे? असा प्रश्न उपस्थित करण्याजोगी परिस्थिती सध्या हाजगोळी बंधारा परिसरात दिसत आहे .

या उत्खनना संदर्भात अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता बघतो, करतो अशा स्वरुपाची जुजबी व उडवाउडवीची उत्तरे देऊन वेळ मारून नेण्याचे काम अधिकाऱ्यांनी केल्याचे समोर येत आहे.

एकीकडे बंधाऱ्याची डागडुजी सुरू असतानाच एसटीसह इतर वाहतूक सोमवारी संध्याकाळपर्यंत बंधार्‍यावरून सुरू होती.परिणामी वाहतुकीमध्ये मोठा व्यत्यय येताना दिसत होता.

 

एलिफंट गो बॅक मोहीमेला आजऱ्यात यश…
टस्कर आंबोलीकडे  घाटकरवाडी जंगलात मोहीम


गेले आठवडाभर घाटकरवाडी परिसरात धुमाकूळ घालणाऱ्या टस्कराला आंबोलीच्या जंगल भागात इसकावून लावण्यात वनविभागाच्या यश आले आहे. सोमवारी सकाळी ‘एलिफंट गो बॅक ‘ मोहीम राबविण्यात आली. तब्बल चार तासाच्या अथक प्रयत्नानंतर टस्कर आंबोलीच्या जंगल भागात गेला आहे. त्यामुळे वनविभागाचे अधिकारी, कर्मचारी व शेतकऱ्यांनी समाधानाचा श्वास घेतला आहे.

आठवड्याहून अधिक काळ टस्कर घाटकरवाडी परिसरात ठाण मांडून आहे. टस्काराने मोठे नुकसान केले आहे. रविवारी रात्री देखील टस्कराने चंतन यादव, दिपक यादव, बाळकृष्ण पाटील यांच्या ऊस. काजू पिकाचे नुकसान केल्याने शेतकरी चांगलेच वैतागले होते. त्यांनी वनविभागाकडे त्याचा बंदोबस्त करावा व परिसरातून हुसकावून लावावे मागणी होती. अखेर वनविभागाला ‘एलिफेंट गो बॅक ‘ मोहीम राबवावी लागली. घाटकरवाडी जंगलात टस्कर असल्याची खात्री पटल्यावर फटाक्यांचा आवाज करत टस्कराला हुसकावून लावले.टस्कर आंबोलीच्या जंगलात गेला. वनपाल एस. पी. गुरव, वनरक्षक तानाजी कवळीकट्टी, श्री. नावगेकर, रोहन कांबळे, प्रियंका पाटील, यांनी मोहीमेत सहभाग घेतला.

: छाया वृत्त :

आजरा साखर कारखाना बेरिंग चोरी प्रकरणाचा तपास खोलवर व्हावा अशा मागणीचे निवेदन आजरा तालुका मनसेच्यावतीने सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील हारुगडे यांना देण्यात आले.

…….

गोकुळ दूध सहकारी संस्था, वाटंगी च्या अध्यक्षपदी बाबुराव जोतिबा गिलबिले व उपाध्यक्षपदी बाळू आप्पा तेजम यांची बिनविरोध निवड करण्यात आली.

                         …..    

शिवसेना भादवण शाखेच्यावतीने विविध परीक्षांमध्ये यश संपादन केलेल्या विद्यार्थी-विद्यार्थिनींची चा सत्कार सोहळा भादवण चे सरपंच संजय पाटील यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला.

निधन वार्ता :                      


शिवाजीनगर, आजरा येथील दत्तात्रय गंगाधर यादव यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात दोन मुले, पत्नी,आई असा परिवार आहे.

…….

संबंधित पोस्ट

Breaking News…

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

‘न्यूजमेकर्स ‘ग्रुपच्या’ वतीने सुरू करण्यात आलेल्या ‘मृत्युंजय ‘महान्यूज’ या पोर्टल चॅनलचे आमदार प्रकाश आबिटकर , जिल्हा बँकेचे संचालक अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते व ‘गोकुळ’च्या संचालिका श्रीमती अंजनाताई रेडेकर, नगराध्यक्षा जोत्स्ना चराटी, आजरा साखर कारखान्याचे संचालक सुधीर देसाई, शिवसेना जिल्हा उपप्रमुख संभाजी पाटील, नगरसेवक आलम नाईकवाडे, स्वामी विवेकानंद पतसंस्थेचे अध्यक्ष जनार्दन टोपले,माजी पं.स. सभापती मसणु सुतार, भाजपा तालुकाध्यक्ष सुधीर कुंभार, विजयकुमार पाटील, विलास नाईक यांच्या प्रमुख उपस्थितीत थाटात उद्घाटन करण्यात आले.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा परिषद उपाध्यक्ष जयवंतराव शिंपी होते.

mrityunjay mahanews

वेळवट्टी येथे मारामारी… दोघे जखमी… पाच जणांविरोधात गुन्हा नोंद

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews
error: Content is protected !!