

डोक्यात दगड घालून जखमी केल्याप्रकरणी एका विरोधात गुन्हा नोंद
आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
खोराटवाडी ता.आजरा येथे जमिनीच्या वादातून शिवीगाळ करत डोक्यात दगड घालून दोघांना जखमी केल्याच्या फिर्यादीवरून पांडुरंग हरी खोराटे यांच्या विरोधात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. याबाबतची फिर्याद प्रकाश लक्ष्मण खोराटे रा. खोराटवाडी ( सध्या रा. सोनारपाडा, डोंबिवली, ठाणे )यांनी पोलिसात दिली आहे.
प्रकाश व पांडुरंग हे दोघे नातेवाईक असून त्यांच्यामध्ये जमिनीचा वाद आहे. रविवारी सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास आंब्याचे शेत नावाच्या गट नंबर २९९ मधील शेतामध्ये प्रकाश हे आपल्या आईसह जमिनीची लेवल सुरू असलेल्या ठिकाणी थांबले असताना तेथे पांडुरंग हे आले व त्यांनी दोघांना शिवीगाळ करण्यास सुरुवात केली.
सदर प्रकाराचे पर्यवसान मारामारीत झाले व पांडुरंग यांनी प्रकाश यांच्या डोक्यात दगड घालून त्यांना जखमी केले तर त्यांच्या आईलाही मारहाण केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. यावरून पांडुरंग यांच्या विरोधात गुन्हा नोंद केला आहे.
पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल बाजीराव कांबळे करीत आहेत.

भरधाव गाडी गॅरेज मध्ये घुसली

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
गडहिंग्लज -आजरा मार्गावर भरधाव येणाऱ्या इनोव्हा चालकाचा गाडीवरील ताबा सुटल्याने हॉटेल मेजवानी शेजारी असणाऱ्या एका गॅरेज गाडी थेट घुसली. या प्रकारामुळे आजूबाजूच्या नागरिकांची चांगलीच धांदल उडाली. सुदैवाने रात्रीची वेळ असल्याने या परिसरामध्ये कोणीही नसल्याने मनुष्यहानी टळली. यामध्ये गाडीसह एका दुचाकीचे नुकसान झाले आहे. रविवारी रात्री उशिरा सदर प्रकार घडला.
याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की, रात्री दहा वाजण्याच्या सुमारास सदर इनोव्हा चालक आज-याच्या दिशेने चालला असताना सुसाट जाणाऱ्या या गाडीवरील चालकाचा ताबा सुटला. गाडी वेगात असल्याने ती थेट रस्त्याशेजारी असणाऱ्या गॅरेजमध्ये घुसली. जोराचा आवाज झाल्याने आजूबाजूचे नागरिक येथे गोळा झाले. गॅरेज व इनोव्हा गाडीसह येथे लावलेल्या एका दुचाकीचे नुकसान यामध्ये झाले आहे.

टोलबाबत आज फैसला…?
सर्वपक्षीय मोर्चाचे आयोजन

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
संकेश्वर-बांदा महामार्गावर आजरा-आंबोली दरम्यान मसोली गावानजीक उभा करण्यात आलेल्या टोल नाक्याला तालुकावासीयांनी विरोध दर्शवला असून ‘आम्ही हा अन्यायकारक टोल भरणार नाही ‘ असा निर्धार करत टोल विरोधात सर्वपक्षीय मोर्चाचे आज सोमवार दिनांक २४ रोजी आयोजन करण्यात आले आहे. या मोर्चाच्या पार्श्वभूमीवर व्यापारी असोसिएशनने आजरा बंदची हाकही दिली आहे. यामुळे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष या मोर्चाकडे लागून आहे.
टोल मुक्ती संघर्ष समितीने या मोर्चाची जय्यत तयारी केली आहे. समितीने केलेल्या आवाहनाला तालुक्यातून मोठा प्रतिसाद मिळाला असून सरपंच संघटनेसह विविध तरुण मंडळे, व्यापारी असोसिएशन, राजकीय पक्ष, गट,संघटना यांनी या मोर्चाला पाठिंबा दर्शवल्याने या आंदोलनाची धार वाढली आहे.
सकाळी १०-३० वाजता हॉटेल मिनर्वा येथून सदर मोर्चा निघणार आहे.

सातेवाडी येथे शेतीशाळा संपन्न
मान्यवरांचे मार्गदर्शन

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन (स्मार्ट) प्रकल्प अंतर्गत खरीप हंगाम भात पीक शेतीशाळा मौजे सातेवाडी ता. आजरा येथे घेणेत आली. या शेतीशाळा वर्ग कार्यक्रमात प्रमुख मार्गदर्शक म्हणुन जयसिंग नार्वेकर, रिसोर्स फार्मर उपस्थित होते.त्यांनी जमिनीची मशागत, भात बियाणे निवड, बीजप्रक्रीया पद्धती, भात रोपवाटिका व्यवस्थापन याबाबत मार्गदर्शन केले. भात बीजप्रक्रीया प्रात्यक्षिक करून दाखविले.
अनिल फोंडे, तालुका कृषी अधिकारी आजरा यांनी शेतकरी उत्पादक कंपनी च्या माध्यमातून शेतकर्यांनी एकत्र येऊन बाजारभिमुख उत्पादन घेण्याचे आवाहन केले. अरुण खोत, प्र. मंडल कृषी अधिकारी गडहिंग्लज यांनी शेतकर्यांना खत व्यवस्थापन, नैसर्गिक शेतीचे महत्व, हुमणी नियंत्रण पद्धती याबाबत माहिती दिली. विजय खोराटे कृषी सहाय्यक गडहिंग्लज यांनी कीड व रोग नियंत्रण पद्धती तसेच कृषी विभागाच्या योजनांची माहिती दिली.
संभाजीराव सावंत, चेअरमन आजरा एग्रो प्रोड्युसर कंपनी लिमिटेड, आजरा यांनी स्मार्ट प्रकल्प योजनेची माहिती दिली.
अमित यमगेकर यांनी प्रास्ताविकात शेतीशाळा कार्यक्रमाचे महत्व व संकल्पना सांगितली.
यावेळी संभाजी पोतनीस, मंगेश पोतनीस , मारुती पोतनीस,शंकर पोतनीस,अरुण कांबळे, हरीश खोत, माधुरी पाटील,लक्ष्मी पाटील आदी उपस्थित होते.




