


विटे येथील धान्यपुरवठा पूर्ववत देऊळवाडी येथूनच करावा…
शिधापत्रिका धारकांची मागणी
विटे (ता. आजरा ) येथील स्वस्त धान्य दुकानातून होणारा धान्यपुरवठा देऊळवाडी येथून करण्यात यावा अशी मागणी शिधापत्रिकाधारकांनी केली आहे.कार्डधारकांची दुकानदाराकडून पिळवणूक होत असल्याने सदर स्वस्त धान्य दुकानदाराचा धान्य परवाना रद्द करावा असेही शिधापत्रिकाधारकांचे म्हणणे आहे. याबाबतचे लेखी निवेदन आजरा तहसीलदारांना शिधापत्रिकाधारकांनी दिले असून यावर विलास पाटील,रामचंद्र पाटील, नामदेव फगरे, शिवाजी पाटील, परशुराम फगरे, सटू प्रभू, प विष्णू सुकवे, युवराज कांबळे, गुणाजी पाटील ,पांडुरंग पाटील, आदींच्या सह्या आहेत. प्रसंगी जिल्हा पुरवठा अधिकारी यांचेकडे दाद मागण्याचा इशाराही देण्यात आला आहे.


दुकानांच्या पाट्या मराठीत लावा अन्यथा मनसे स्टाईलने आंदोलन

एकीकडे मुंबई शहराच्या मध्ये मराठी वाचवा मोहीम सुरू असताना महाराष्ट्रातील काही व्यापारी महाराष्ट्रात राहून आपल्या दुकानांवरील पाट्या मात्र मराठीत लावत नसल्याचे निदर्शनास येत आहे. या गोष्टीचा मनसेकडून निषेध करण्यात येत आहे. मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा महत्त्वपूर्ण निर्णय होऊनदेखील काही व्यापारी जाणीवपूर्वक मराठीत पाट्या लावत नसल्याचे दिसून येत असल्याने आजरा शहरातील व तालुक्यातील दुकानदार यांनी तातडीने आपल्या दुकानावर मराठी भाषेतील नावाचे फलक लावावेत अन्यथा मनसे स्टाईलने आंदोलन केले जाईल असा इशारा मनसेच्या वतीने व्यापारी वर्गाला देण्यात आला आहे. याबाबतचे लेखी निवेदन तहसीलदारांना देण्यात आले असून निवेदनावर मनसेचे जिल्हा उपाध्यक्ष सुधीर सुपल,पुनम भादवणकर, आजरा तालुका अध्यक्ष अनिल डोंगरे,आनंदा घंटे, चंद्रकांत सांबरेकर,तेजस्विनी देसाई ,अश्विन राणे आदींच्या सह्या आहेत.


‘चैतन्य’चे महिलांसाठी आरोग्य शिबीर

आजरा येथील चैतन्य सूजन व सेवा संस्थेच्या वतीने महिलांसाठी आरोग्य शिबीर पार पडले. सदर शिबिरामध्ये रक्तातील कमतरता,कॅल्शियम व शुगर, हिमोग्लोबीन इत्यादी घटकांची तपासणी करण्यात आली. सुरज लॅबोरेटरी चे उमेश पारपोलकर यांच्या सहकार्याने सदर शिबिर पार पडले रक्तातील हिमोग्लोबिन आणि कॅल्शियम कमी असणाऱ्या महिलांना आवश्यक त्या गोळ्यांचा डोस देण्यात आला. यावेळी डॉ. अंजली देशपांडे डॉ. रश्मी राऊत-गाडगीळ, नेहा पाटील, माधुरी पाचवडेकर, छाया तिप्पट, सुचेता गड्डी, विनया मायदेव,श्रद्धा वाटवे, सुवर्णा सटाले, पूनम बुरुड आदी उपस्थित होत्या. शिबिराचे संयोजन डॉ. शिवशंकर उपासे, संतोष जाधव, निकिता स्वामी, संजय तेजम,देवदत्त देशपांडे, सुभाष पाटील व तुषार येरुडकर यांनी केले.


गडहिंग्लज आंबोली मार्गावरील रस्त्याची तातडीने दुरुस्ती करावी…
प्रवासी संघटनेची मागणी

आजरा तालुक्यातून जाणाऱ्या गडहिंग्लज ते आंबोली या मार्गाची दुर्दशा झाली असून या मार्गावर ठिकठिकाणी प्रचंड खड्डे पडले आहे यामुळे वाहनचालकांना त्रास सहन करावा लागत आहे छोटे-मोठे अपघात ही होत असल्याने या रस्त्यांची दुरुस्ती तातडीने होणे आवश्यक आहे अशी मागणी आजरा तालुका प्रवासी संघटनेच्या वतीने राष्ट्रीय महामार्ग विभागाच्या कार्यकारी अभियंता यांचकडे करण्यात अधिक आहे
याबाबतचे लेखी निवेदन संघटनेच्यावतीने देण्यात आले असून निवेदनावर संघटनेचे अध्यक्ष शिवाजी गुरव,मधुकर चोथे, राहूल नाईक,शांताराम पाटील, निवृत्ती मिसाळ,शांताराम हरेर, संजय घाडगे आदींच्या सह्या आहेत.




