सोमवार १० नोव्हेंबर २०२५

तरुणीचा विनयभंग…
ग्रामस्थांनी आरोपीला चोप देऊन दिले पोलिसांच्या ताब्यात

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
खेडे ता. आजरा येथील एका नोकरदार महिलेशी प्रमोद मडिवाळप्प दोडरेड्डी रा. बसरकोड जिल्हा विजयपूर( कर्नाटक) याने लज्जास्पद वर्तन करून विनयभंग केल्याचे प्रकरण घडल्यानंतर स्थानिक नागरिकांनी प्रमोद याला चांगलाच चोप देत पोलिसांच्या स्वाधीन केले. संबंधित महिलेने दिलेल्या फिर्यादीवरून प्रमोद याच्या विरोधात विनयभंगाचा गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी व स्थानिक ग्रामस्थांनी दिलेली माहिती अशी…
आजरा येथे रोजगारानिमीत्य येणारी पीडित महिला शनिवार दिनांक ८ रोजी सायंकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास खेडे येथील बस थांबल्यावर उतरली असता प्रमोद याने तिच्याशी गैरवर्तन केले. महिलेने आरडाओरडा केल्यानंतर आजूबाजूच्या ग्रामस्थांनी एकत्र येऊन प्रमोद याला चांगलाच चोप दिला व पोलिसांच्या स्वाधीन केले. पीडित महिलेच्या फिर्यादीवरुन प्रमोद याच्या विरोधात गुन्हा नोंद करण्यात आला असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक संजय पाटील करीत आहेत.

भुरट्या चोरांचा वाटंगीत धुमाकूळ
नऊ घरामधील तांब्या पितळेच्या भांड्यांसह कोंबड्याही पळवल्या

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
थंडीचा कडाका वाढल्याने ग्रामस्थ झोपेत असल्याचा फायदा उठवत रविवारी पहाटे वाटंगी येथे भुरट्या चोरांनी अक्षरशः धुमाकूळ घालत घराशेजारील व घरातील तांब्या पितळेच्या हंड्यांचं तेल डबा कोंबड्या व हाताला लागेल ते साहित्य घेऊन पोबारा केला.
रविवारी पहाटे तीन नंतर चोरट्यांनी विठ्ठल दळवी, सुभाष कुंभार, विलास चौगुले, धनंजय देसाई, वसंत मलगोंडे, कृष्णा बिरजे, सुमन घेवडे यांच्या घरातील तांब्या पितळेचे हांडे तर शामराव गुरव यांच्या घरातील तेलाचा डबा व जेरोन डायस यांच्या सात कोंबड्या लंपास केल्या.
अलीकडे अशा भुरट्या चोऱ्यांचे प्रमाण तालुक्यात प्रचंड वाढले आहे. हे भुरटे चोर म्हणजे पोलिसांच्या दृष्टीने डोकेदुखी ठरवू लागले आहेत.

आजपासून धुमशान…
मुहूर्तांचीशोधाशोध

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
आजरा नगरपंचायतीच्या पंचवार्षिक निवडणुकीचे धुमशान आज सोमवार दिनांक १० पासून सुरू होत असून आजपासून उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सुरुवात होणार आहे. अद्यापही आघाड्यांबाबत अंतिम निर्णय झालेले नाहीत. प्रमुख नेते मंडळींनी मात्र इच्छुक कार्यकर्त्यांना ‘कामाला लागा’ असे आदेश दिले आहेत. अर्ज दाखल करण्यासाठी चांगला मूहूर्त शोधण्यासाठी इच्छुकांची धावपळ सुरू आहे.
नगरपंचायत निवडणुकीबाबत शहरवासीयांना प्रचंड उत्सुकता आहे. गत वेळी झालेल्या निवडणुकीत ताराराणी आघाडीने ज्योत्स्ना चराटी यांच्या माध्यमातून पहिले नगराध्यक्षपद मिळवले होते. पाच वर्षात बऱ्याच घडामोडी होत गेल्या. विरोधकांना सोबत घेऊन सत्ताधाऱ्यांनी वाटचाल सुरू ठेवली.
दरम्यान अस्तित्वात आलेल्या अन्याय निवारण समितीने सत्ताधाऱ्यांच्या विरोधात जोरदार रान उठवले. विशेषता शहरातील पाणीपुरवठा योजना, रस्ते, गटर्ससह इतर विकास कामांवर बोट ठेवत निवेदन व आंदोलनांचा भडीमार करत सत्ताधाऱ्यांना कोंडीत पकडण्याची वेळोवेळी आलेली संधी सोडली नाही.
रेंगाळलेली पाणीपुरवठा योजना, रस्ते, गटर्स, स्वच्छता, डीपी प्लॅन मंजुरीवेळी झालेला सावळा गोंधळ या सर्वच बाबी या निवडणुकीत प्रचाराचे मुद्दे ठरण्याची शक्यता आहे. अशोकअण्णा चराटी यांच्या नेतृत्वाखाली पुन्हा एक वेळ ताराराणी आघाडीची मोट बांधली जात आहे. तर चराटी विरोधकांचाही सक्षम आघाडी तयार करण्यावर भर दिसू लागला आहे.
या सर्व घडामोडी घडत असताना वरिष्ठ नेते मंडळींच्या भूमिकाही संदीग्ध असल्याने दोन्ही आघाड्यांकडून नेतेमंडळींचा ‘आशीर्वाद’ आपणालाच असल्याचे सांगितले जात आहे.
आघाड्या व उमेदवार यांचे चित्र जवळजवळ स्पष्ट असले तरी ऐनवेळी अनेकांच्या उमेदवाऱ्यांना कात्री लागण्याची शक्यता नाकारता येत नाही.
रिफ्लेक्टरअभावी अपघातांचा धोका…
उत्तूर ते मुमेवाडी रिंग रोड परिसर

उत्तूर : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
उत्तूर ते मुमेवाडी रिंग रोड परिसरात कॉन्ट्रॅक्टरकडून रस्त्याच्या वळणांवर व मोडांवर ठिकठिकाणी मोठमोठे खडकांचे ढिगारे टाकण्यात आले आहेत. मात्र या ढिगार्यांवर कोणतेही रिफ्लेक्टर किंवा चेतावणी फलक लावलेले नाहीत. त्यामुळे रात्रीच्या अंधारात हे ढिगारे वाहनधारकांना दिसत नाहीत आणि अपघात होण्याचा गंभीर धोका निर्माण झाला आहे.
गेल्या आठवड्यात दोन मोटरसायकलस्वार या ढिगाऱ्यांना धडकून गंभीर जखमी झाले आहेत.स्थानिक नागरिकांनी संबंधित कॉन्ट्रॅक्टर तसेच सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी यांचे लक्ष याकडे वेधले आहे. लोकांच्या सुरक्षिततेची जबाबदारीही कॉन्ट्रॅक्टरनी घ्यावी व रिफ्लेक्टर व चेतावणी फलक तातडीने लावावेत व अपघात टाळण्यासाठी आवश्यक सुरक्षा उपाययोजना कराव्यात, अशी नागरिकांची मागणी आहे.

पर्यावरण संवर्धनाची जबाबदारी सर्वांचीच – सरपंच किरण आमणगी

उत्तूर : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
आंतरराष्ट्रीय पर्यावरण संवर्धनाची जबाबदारी गावपातळीपर्यंत येऊन ठेपली आहे. विविध देशांमध्ये वेगवेगळ्या उपाययोजना करून पर्यावरण संवर्धन जतन केले जात आहे. बिहार, हरियाणा यासारख्या राज्यामध्ये पर्यावरणाच्या हानीमुळे कॅन्सर सारख्या दुर्दम्य आजाराला बालके बळी पडत आहेत. त्यामुळे पर्यावरण संवर्धन ही काळाची गरज बनली आहे असे प्रतिपादन उत्तुरचे लोकनियुक्त सरपंच किरण आमणगी यांनी केले. येथील ग्रीन क्लबच्या वतीने आयोजित लोगो व टी-शर्ट अनावरण प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. अध्यक्षस्थानी सदस्य सेवानिवृत्त प्राचार्य शैलेंद्र आमणगी उपस्थित होते.
प्रस्ताविक प्रा. अतुल देशपांडे यांनी तर स्वागत व परिचय प्रवीण लोकरे यांनी केले. प्रमुख उपस्थितामध्ये पर्यावरण प्रेमी डी. बी. काटकर, गणपतराव यमगेकर, अतिशकुमार देसाई व महेश करंबळी यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी मान्यवरांच्या हस्ते लोगो व टी-शर्टचे अनावरण करण्यात आले.पर्यावरण प्रेमी डी. बी. काटकर यांनी झाडे फक्त लावून चालत नाहीत ती लहान मुलाप्रमाणे जतन करावी लागतात. झाडे लावण्यासाठी जानेवारीमध्ये खड्डा काढून ठेवावा व जूनच्या पहिल्या आठवड्यात वृक्षरोपण करावे. वेळोवेळी भांगलण, लागवड, पाणी यामुळे शंभर टक्के झाडे जगण्यास मदत होते असे मत व्यक्त केले.
सूत्रसंचालन मंदार हळवणकर यांनी तर आभार विजय पाटील यांनी मानले.
या कार्यक्रमासाठी ग्रामपंचायत सदस्य संदेश रायकर, सविता सावंत, महेश करंबळी लता गुरव, राजेंद्र खोराटे, सविता कुरुणकर तसेच क्लबचे दीपक भाईगडे, विजय वांद्रे, तुषार रावळ, प्रदीप लोकरे,मनोज लकांबळे, वसंत पटेल, प्रवीण स्वामी आदी सदस्य उपस्थित होते.

छायावृत्त…

पाटबंधारे विभागाकडून पावसाचा जोर कमी होताच बंधाऱ्यांमधील पाणी अडवण्यास सुरुवात झाली आहे. भादवण बंधाऱ्यावर बरगे टाकून पाणी अडवण्यात येत आहे.



