सोमवार दि.२७ आक्टोंबर २०२५


यावेळी तरी मतपत्रिकेत पक्षांच्या चिन्हांचे दर्शन होणार का ?
कार्यकर्त्यांचा सवाल

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
भाजपासह राष्ट्रवादी,मनसे व इतर पक्षांची अधिकृत चिन्हे बऱ्याच वर्षापासून मतपत्रिकेवर न दिसल्याने या पक्षांची अधिकृत चिन्हे निवडणूक माध्यमातून सर्वसामान्य मतदारांपर्यंत पोहोचणार तरी कधी ? असा सवाल आता कार्यकर्ते उपस्थित करत आहेत.
तालुक्यातील स्थानिक ग्रामपंचायती, नगरपंचायत, जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक या आघाड्या करून लढवल्या जात आहेत. विधानसभा व लोकसभा निवडणुकीत शिवसेनेचे दोन्ही गट व काँग्रेसने उमेदवारीवर दावा केल्याने या निवडणुकांमध्ये या दोन पक्षांची चिन्हे वाड्या वस्त्यांवर जाऊन पोहोचली आहेत. ती पोहोचवण्यासाठी इतर पक्षांनीही हातभार लावला आहे. मात्र शरद पवारांची राष्ट्रवादी, भारतीय जनता पार्टी यासह अन्य छोट्या मोठ्या पक्षांची यामुळे गोची झाली आहे. शरद पवारांच्या राष्ट्रवादीसह भारतीय जनता पक्षाची तर ताकद असूनही केवळ अंतर्गत तडजोडी व आघाड्यामुळे ही चिन्हे मतपत्रिकेवरून गायब झालेली दिसतात. लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला महाविकास आघाडीने उमेदवारी दिल्याने काँग्रेसचा ‘हात’ सर्वसामान्य पर्यंत पोहोचला आहे. तीच अवस्था शिवसेना शिंदे पक्षाची आहे. विधानसभेसह लोकसभेलाही पक्षाचा अधिकृत उमेदवार महायुतीतून निवडणुकीला सामोरा गेल्याने या पक्षाचे चिन्ह हे तळागाळापर्यंत पोहोचले आहे.
आघाडीच्या या राजकीय तडजोडीत अनेक पक्षांना जनमत आजमावण्याची संधीच मिळत नसल्याने अप्रत्यक्षरीत्या इतर काही पक्षांना रसद पुरवण्याशिवाय पर्याय राहत नाही हे वास्तव आहे. आता या पक्षांची चिन्हे मतपत्रिकेबाबत उपेक्षितच आहेत असेच म्हणावे लागेल.
पालकमंत्र्यांची जबाबदारी वाढली…
शिवसेनेत उभी फूट पडल्यानंतर थेट कॅबिनेट मंत्रीपदी निवड झालेल्या पालकमंत्री प्रकाश आबीटकर यांच्यावरील जिल्ह्यामध्ये पक्ष वाढीची जबाबदारी देण्यात आली आहे. आता येत्या नगरपंचायतीसह जि. प. व पंचायत समिती निवडणुकांमध्ये मतपत्रिकेत चिन्ह येण्यासाठी ते कोणती भूमिका घेणार याकडे जिल्ह्याचे लक्ष लागून आहे.

अवकाळीचा दणका…
शेकडो एकरावरील भात पीक अडचणीत

ऑक्टोबर महिना संपत आला तरीही पावसाच्या सरी कोसळत असल्याने अवकाळीच्या या दणक्याने तालुक्यातील भात पीक अडचणीत आले आहे. सुगीच्या दिवसात पावसाने दररोजची हजेरी लावण्यास सुरुवात केली असून यामुळे भात पीक आडवे होऊ लागले आहे. गतसाली अचानकपणे मे महिन्यातच पावसाला सुरुवात झाली. यामुळे गाफील राहिलेल्या शेतकरी वर्गाला जनावरांच्या चाऱ्याची निर्गत लावता आली नाही. यामुळे जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न गंभीर बनला होता. यावर्षी पिके उत्तम स्थितीत असताना अवकाळीने पुन्हा एक वेळ शेतकऱ्याला अडचणीत आणले आहे.
एकीकडे हत्ती, गवे, वानर, रानडुकरे यांचा उपद्रव सुरू असताना दुसरीकडे अवकाळी पाऊस विश्रांती घेण्यास तयार नाही. या दुहेरी संकटामुळे यावर्षी हातातोंडाशी आलेले भात पीक वाया जाणार असे दिसू लागले आहे.

बापू नेऊंगरे यांना ग्रामरत्न सरपंच पुरस्कार प्रदान

पंचायत राज विकास मंच महाराष्ट्र संचलित
आखिल भारतीय सरपंच परिषदेच्या वतीने देण्यात येणारा ग्रामरत्न सरपंच पुरस्कार मडीलगे येथील सरपंच बापू नेऊंगरे यांना भारतीय प्रशासन सेवेतील अधिकारी व कोल्हापूरची माजी जिल्हाधिकारी डॉ. मल्लीनाथ कलशेट्टी मुख्यमंत्री सहाय्यता कक्ष अधिकारी मंगेश चिवटे यांच्या हस्ते देण्यात आला.
सरपंच नेऊंगरे यांनी विविध उपक्रम राबवून गावातील सामाजिक प्रश्न सोडवण्यासह सर्वसामान्य जनतेला व सर्व घटकांना सोबत घेऊन काम करण्याचे कौशल्य, सरपंच मानधन योग्य कामासाठी वापरणे, शेतकऱ्यांच्या शेतीकडे जाण्यासाठी पाणंद रस्ते करण्यासाठी नियोजनबद्ध कार्यक्रम राबवणे इत्यादी कामे केली आहेत.
त्यांना देण्यात आलेल्या या पुरस्काराबद्दल सर्वत्र कौतुक होत आहे. ग्रामस्थांनी केलेल्या सहकार्यामुळे आपण गावामध्ये विविध विकासात्मक काम करू शकलो असे त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

जय हनुमान गृह तारण संस्थेचे पेरणोलीत उद्घाटन

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
आजरा तालुक्यात सहकाराची परंपरा मोठी असल्याने तालुक्याला सहकारीची पंढरी म्हणून ओळखले जाते. येथील पेरणोलीने सहकाराचा आदर्श उत्तम प्रकारे जपला आहे. येथील जय हनुमान गृहतारण संस्थाही या परंपरेचा पाईक होवून नावलौकिक मिळवेल. असा विश्वास जिल्हा बँकेचे संचालक प्राचार्य अर्जुन आबिटकर यांनी व्यक्त केला.
पेरणोली (ता. आजरा) येथील जय हनुमान गृहतारण संस्थेचे उद्घाटन प्राचार्य आबिटकर यांच्या हस्ते झाले. जिल्हा बँकेचे संचालक सुधीर देसाई कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. माजी सभापती उदयराज पवार, तालुका संघाचे उपाध्यक्ष डी. ए. पाटील, आजरा कारखाना संचालक रणजित देसाई, शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख राजेंद्र सावंत, युवा नेते अनिकेत चराटी, उद्योजक बबन तिबिले, उपाध्यक्ष फिलीफ लोबो यासह मान्यवर प्रमुख उपस्थित होते.
संस्थेचे अध्यक्ष सुभाष देसाई यांनी स्वागत केले. प्रास्ताविकात संस्था स्थापनेचा हेतू स्पष्ट केला. सुधीर देसाई म्हणाले, मानवाच्या अन्न, वस्त्र, निवारा या गरजा आहे. सर्वसामान्याच्या घराचे स्वप्न साकारण्याचे काम संस्था करेल. या संस्थेसाठी जिल्हा बँकेच्या माध्यमातून आवश्यक ती मदत केली जाईल. श्री. पाटील, श्री. पवार यांनी शुभेच्छा दिल्या.
कॉ.संपत देसाई, प्रविण जाधव, बजरंग पाटील, कारखाना संचालक हरीभाऊ कांबळे, चंद्रशेखर देसाई, सयाजी नार्वेकर, राजाराम पाटील, पेरणोली ग्रामपंचायत सदस्या सुनिता कालेकर, रुपाली पाईम, जयवंत येरूडकर, हिंदुराव कालेकर, पोलीस पाटील दिपाली कांबळे, काकासो देसाई, आनंदा मस्कर, संताजी सोले, शिवाजी मस्कर, विठ्ठल मस्कर. संस्थेचे संचालक राजाराम कालेकर व संचालक या वेळी उपस्थित होते. संजय मोहीते यांनी सुत्रसंचालन तर मानसिंग चव्हाण यांनी आभार मानले.
बँकेचे व्यवस्थापक मधुसुदन देसाई यांनी नियोजन केले.

हात्तिवडे येथे विकास कामांचा शुभारंभ

आजरा: मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
हात्तिवडे, ता.आजरा येथे हात्तिवडे – चांदेवाडी रस्त्याच्या ५० लाखांच्या पाणंद रस्त्यांच्या ८० लाखांच्या विकास कामाचा शुभारंभ अण्णाभाऊ संस्था समूहाचे प्रमुख अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते करण्यात आला.सदरची कामे जयवंत मसणू सुतार यांनी मंजूर करून आणली. याकामासाठी आमदार शिवाजीराव पाटील व अशोक चराटी यांनी विशेष प्रयत्न केले.
याप्रसंगी जयवंत सुतार, भाजपा तालुकाध्यक्ष अनिकेत चराटी, दशरथ अमृते, सरपंच शकुंतला सुतार,कारखाना संचालक संभाजी पाटील, अनिल पाटील, अतिशकुमार देसाई,संभाजी दिनकर पाटील, विश्वास चव्हाण, सदाशिव सुतार, शांताराम पाटील, सुधाकर होडगे, पोलीस पाटील विजय पाटील,एस.एल.हरेर, उदयकुमार सरदेसाई, आनंदा कातकर,अजित हरेर, विनय चव्हाण, संजय सावंत, तुकाराम बामणे, अभिजित रांगणेकर, इंजि.सिद्धेश सावंत, इंजि.साहिल पाटील आदी उपस्थित होते.

छायावृत्त…

भटक्या कुत्र्यांच्या बंदोबस्तासाठी विविध संघटनांनी नगरपंचायतीवर मोर्चे काढले आंदोलने केली. परंतु याचा काडीमात्र परिणाम नगरपंचायत प्रशासनावर झालेला दिसत नाही. शहरभर भटक्या कुत्र्यांचे कळप बिनधास्तपणे फिरताना दिसतात.




