

पावसाचा तडाखा…
वीज गायब

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
आजरा तालुक्यात गुरुवारी सायंकाळी जोरदार पावसाने हजेरी लावली. पावसामुळे ठिकठिकाणी झाडे कोसळून पडली असून वीजपुरवठा खंडीत झाला आहे. अद्याप तो सुरळीत झालेला नाही. कर दमदार पावसाने खरीप पूर्व शेती कामांनी वेग धरला आहे.
गुरुवारी सायंकाळनंतर विजेच्या कडकडाटासह तालुक्यात जोरदार पावसाने हजेरी लावली यावर्षी तालुक्यात वळीव पावसाची समाधानकारक हजेरी दिसत आहे. पावसामुळे जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न संपुष्टात येण्याची चिन्हे असून ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या पाण्याचा प्रश्नही निकालात निघाला आहे.
वादळी पावसामुळे ठिकठिकाणी वृक्ष कोलमडून पडले आहेत. यामुळे वीजपुरवठा खंडित झाला असून शुक्रवारी सकाळपर्यंत वीजपुरवठा सुरळीत झालेला नाही. याचा नळ पाणीपुरवठा योजनेवर ही परिणाम होणार असे दिसत आहे.

सुट्ट्या संपत आल्या… रामतीर्थवर पर्यटक वाढले

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
उन्हाळी सुट्ट्या संपत आल्याने व उष्णतेचा तडाखा कमी झाल्याने शेवटच्या टप्प्यात पर्यटक पर्यटनासाठी बाहेर पडू लागले असून आजरा येथील सुप्रसिद्ध रामतीर्थ पर्यटन स्थळाला पर्यटक मोठ्या संख्येने भेट देऊन लागले आहेत.
यावर्षी उष्णतेने कहर केल्याने उन्हाळी पर्यटक पर्यटनासाठी बाहेर पडण्यास धजावत नव्हते. परंतु गेले आठवडाभर वारंवार वळीव पावसाने हजेरी लावल्यामुळे उष्म्यात घट झाली आहे. परिणामी उन्हाळी सुट्ट्यांच्या शेवटच्या टप्प्यात पर्यटक रामतीर्थ परिसराला हजेरी लावताना दिसत आहेत.

रासूबाई मंदिर प्रश्नी आत्मदहनाचा इशारा

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
हरपवडे ता. आजरा येथील ग्रामदैवत श्री रासूबाई देवी मंदिर गेले सहा महिने कुलूपबंद अवस्थेत आहे. यामुळे गावातील व पंचक्रोशीतील भक्तांची अडचण होत आहे. गावातील काही मोजक्या राजकीय मंडळींमुळे संपूर्ण गावालि वेठीस धरले जात आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी यामध्ये तातडीने लक्ष देऊन मंदिर खुले न केल्यास आत्मदहन करण्याचा इशारा देवदास बळवंत गुरव यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिला आहे
याबाबत दिलेल्या पत्रामध्ये मंदिर खुले करण्यासंदर्भात गुरव समाजाने वेळोवेळी मागणी केली परंतु यामध्ये मागणीच्या गांभीर्याने विचार न करता मंदिर बंदच ठेवल्याने लोकसभा निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला. परंतु तहसीलदार कार्यालयात या पार्श्वभूमीवर झालेल्या बैठकीत याबाबत दोन दिवसात निर्णय देण्याचे आश्वासन देण्यात आले. अद्यापही याबाबत कोणताही निर्णय झालेला नाही.२७ मे पर्यंत मंदिर खुले करून पूर्वीप्रमाणे पूजा करण्याचे आदेश न झाल्यास मंगळवार दिनांक २८ मे रोजी जिल्हाधिकारी कार्यालय समोर आत्मदहन करण्याचा इशारा दिला आहे.

विजयकुमार पाटील जिल्हा अभियंता सेलच्या उपाध्यक्षपदी

आजरा: मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
भारतीय जनता पार्टीच्या कोल्हापूर जिल्हा अभियंता सेलच्या उपाध्यक्षपदी विजयकुमार लक्ष्मण पाटील यांची निवड करण्यात आली आहे.
सदर निवडीचे पत्र चंद्रकांत सावंत, कोल्हापूर जिल्हा अध्यक्ष ( ग्रामीण पश्चिम) भाजपा अभियंता सेल महाराष्ट्र प्रदेश यांनी त्यांना नुकतेच दिले आहे.



