उचंगी प्रकल्पग्रस्त व पोलिसांमध्ये झटापटी… बंदी आदेश झुगारून मोर्चाने प्रकल्पग्रस्त काम बंद पाडण्याकरता सरसावले..
घळभरणीच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने उचंगी प्रकल्पक्षेत्रात लागू केलेला बंदी आदेश झुगारून देत प्रकल्पग्रस्तांनी आज प्रलंबित मागण्यांच्या पार्श्वभूमीवर थेट घळभरणीचे काम बंद करण्याकरता मोर्चाने कूच केली. यामुळे प्रशासनाची चांगलीच दमछाक झाली प्रचंड संख्येने आलेले प्रकल्पग्रस्त व बंदोबस्त करतात तैनात करण्यात आलेले पोलीस दलाचे जवान यांच्यामध्ये यावेळी झटापट झाली. मोर्चाला रस्त्यावरच अडवत उपविभागीय अधिकारी वसुधा बारवे, तहसीलदार विकास अहिर, उपविभागीय पोलिस अधिकारी राजीव नवले, सहय्य्क पोलीस निरीक्षक सुनील हारुगडे यांनी मध्यस्थी करत प्रकल्पग्रस्तांची चर्चा केली.
यावेळी बोलताना उपविभागीय अधिकारी बारवे यांनी आयुक्त स्तरावर तातडीने बैठक घेऊन प्रकल्पग्रस्तांचे जे काही प्रश्न शिल्लक आहेत ते मार्गी लावण्याकरीता योग्य ते प्रयत्न केले जातील असे स्पष्ट केले. बुडीत क्षेत्रातील आठ प्रकल्पग्रस्तांच्या निर्वाह क्षेत्राचा प्रश्न, ज्यांची घरे पाण्याखाली जात आहेत अशा आठ शेतक-यांचा प्रश्न तातडीने मार्गी लावण्याबरोबरच शेती पंपांची वीज जोडणी तातडीने देण्याबाबत आवश्यक त्या सूचना केल्या. यावेळी प्रकल्पग्रस्तांनी आपल्या संतप्त भावना व्यक्त केल्या. गेली वीस वर्षे आमचे प्रश्न मार्गी लागण्याकरीता आंदोलने, मोर्चे सुरू आहेत. प्रकल्पाचे काम अल्पावधीतच पूर्णत्वास जाणार आहे एकदा प्रकल्पाचे काम पूर्ण झाले की आम्हाला वाली कोण? आमच्या प्रलंबित मागण्यांचे काय? असेही प्रश्न उपस्थित करण्यात आले. प्रकल्पग्रस्तांचे प्रश्न लवकरात लवकर मार्गी लागण्याकरता प्रशासन प्रयत्नशील आहे. अशी ग्वाही यावेळी उपस्थित अधिकाऱ्यांनी दिली. या चर्चेनंतर प्रकल्पग्रस्त ‘वेट अँन्ड वॉच भूमिका घेत’ पुन्हा एकदा माघारी परतले.
आजरा नगरपंचायतीच्या ‘उपनगराध्यक्ष’पदी सौ.संजीवनी सावंत
आजरा नगरपंचायतीच्या उपनगराध्यक्षपदी सौ. संजीवनी संजयभाऊ सावंत यांची बिनविरोध निवड करण्यात आली. निवडणूकिच्या पार्श्वभूमीवर नगराध्यक्षा श्रीमती ज्योत्स्ना चराटी यांच्या अध्यक्षतेखाली विशेष सभा पार पडली. यावेळी उपनगराध्यक्ष पदासाठी सौ. सावंत यांचे नाव सत्तारूढ आघाडीचे नेते व नगरसेवक अशोकअण्णा चराटी यांनी सुचवले तर नगरसेविका सौ. शकुंतला सलामवाडे यांनी अनुमोदन दिले उपनगराध्यक्ष पदासाठी एकमेव अर्ज दाखल झाल्याने सौ. सावंत यांची निवड बिनविरोध जाहीर करण्यात आली सौ सावंत या येथील रवळनाथ कॉलनी प्रभागाचे प्रतिनिधित्व करीत असून यापूर्वी त्यांनी आजरा ग्रामपंचायत कालावधीत सरपंचपदाची धुराही सक्षमपणे सांभाळलेली आहे. विद्यमान सभागृहाची त्यांनी महिला बालकल्याणसह विविध पदांची जबाबदारीही पार पाडली आहे. त्यांची निवड जाहीर होताच समर्थकांनी गुलालाची उधळण फटाक्यांची जोरदार आतषबाजी करत जल्लोष केला. यावेळी नगरपंचायतीच्या अधिकारी वर्गासह, विलास नाईक, अनिरुद्ध केसरकर, किरण कांबळे, अभिषेक शिंपी, आनंदा कुंभार व नगरसेवक उपस्थित होते.
दोन्ही मुख्य पदावर महिला पदाधिकारी
नगरपंचायतीची नगराध्यक्षपदाची धुरा श्रीमती ज्योत्स्ना चराटी तर उपनगराध्यक्ष पदाची धुरा संजीवनी सावंत यांच्याकडे आल्याने सद्यस्थितीला नगरपंचायतीच्या दोन प्रमुख पदावर महिलांचे वर्चस्व दिसत आहे .
….










