मंगळवार १७ फेब्रुवारी २०२६


भाविकांची प्रचंड गर्दी
रामतीर्थ यात्रा उत्साहात

आजरा ,: मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
भाविकांच्या प्रचंड उपस्थितीत आजरा येथील रामतीर्थ यात्रा उत्साहात पार पडली.या यात्रेसाठी कोल्हापूर जिल्ह्यातील भाविकांसह कर्नाटक व कोकणातील अनेक भाविकांनी उपस्थिती लावली.
खरेदीसाठी अनेक खाद्यपदार्थ व इतर स्टाॅल लावण्यात आले होते.दुपारी तीन वाजता श्री रवळनाथ मंदिर येथून पालखी रामतीर्थ नेण्यात आली.
यावेळी आजऱ्याचे तहसिलदार समीर माने , सहाय्यक पोलिस निरीक्षक नागेश यमगर अश्विन डोंगरे, नगरसेवक अनिकेत चराटी, डॉ.इंद्रजीत देसाई ,परेश पोतदार, मुख्याधिकारी सूरज सूर्वे, पोलिस पाटील सागर देसाई, तलाठी समीर जाधव, सुधीर कुंभार, गोरव देशपांडे, संदीप पारळे, यांच्यासह अनेक भाविक उपस्थित होते
आजरा आगाराने यात्रेसाठी गाड्यांची व्यवस्था केली होती. यात्रा कालावधीत कोणताही अनुचित प्रकार घडला नाही. नगरपंचायत प्रशासनानेही भाविकांची उत्तम सोय केली होती.

मलिग्रे येथील डोंगरावरील चाळोबादेवाची यात्रा उत्साहात

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
दरवर्षी प्रमाणे महाशिवरात्रीच्या दुसऱ्या दिवसी मलिग्रे येथील डोंगरातील चाळोबादेवाची यात्रा मोठ्या भक्तीभावाने साजरी केली जाते. यावर्षी देवस्थान कमिटी व मलिग्रे ग्रामस्थांनी यात्रेचे नेटके नियोजन केल्याने मुंबईकर ग्रामस्थाच्या व पंचक्रोशीतील भावीकांच्या उपस्थितीत यात्रा मोठ्या भक्तीभावाने संपन्न झाली.
मलिग्रे गावच्या पश्चिमेला दोन किलोमीटर वर डोंगरात महादेव व चाळोबाचे मंदिर असून महाशिवरात्री निमित्ताने अभिषेक भजन करीत यात्रेला सुरूवात झाली. सकाळी गावातून पालखी डोगरावर जावून प्रर्दक्षिणा घातल्यावर विधिवत पुजा करून भाविकाना दर्शना साठी खुले केले गेले. नैवेद्य झाल्यानंतर महाप्रसाद वाटप करण्यात आले.

जिल्हा परिषदेच्या शाळा गुणवत्तापूर्ण करण्यावर भर देणार : अमर चव्हाण

आजरा : मृत्यूंजय महान्यूज वृत्तसेवा
जिल्हा परिषदेच्या शाळा गुणवत्ता पूर्व बनवण्यावर भर देणारा असून सत्ताही लोककल्याणासाठी वापरण्याचे माध्यम आहे. असे प्रतिपादन जिल्हा परिषद नूतन सदस्य अमर चव्हाण यांनी आज आजरा येथे झालेल्या सत्कार प्रसंगी व्यक्त केले. श्रमिक मुक्ती दलाच्या वतीने चळवळीने मदत केलेल्या व निवडून आलेल्या जिल्हा परिषद सदस्य सुधीर देसाई, शिरीष देसाई, अमर चव्हाण आणि पं.स.सदस्या सौ. यशोदा पोवार यांच्या सत्कार प्रसंगी ते बोलत होते.
ते पुढे म्हणाले, खाजगी शाळांचे पेव आज महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात फुटले आहे. या खाजगी शाळांच्या तुलनेत जिल्हा परिषद शाळा दर्जेदार बनवण्यावर येत्या पाच वर्षात आम्ही भर देणार आहोत. शिक्षणानेच बहुजन समाजाची प्रगती शक्य आहे. त्यामुळे सरकारी शाळा गुणवत्ता पूर्ण करण्यावर आमचा भर राहणार आहे.
सत्काराला उत्तर देताना जि प सदस्य सुधीर देसाई म्हणाले, आजरा तालुक्यातील जनतेने जो विश्वास दाखवला त्या विश्वासाला पात्र राहून आम्ही पाच वर्षे काम करू. आदरणीय मंत्री मुश्रीफ यांनी जिल्ह्यच्या गटनेते पदाची जबाबदारी दिली. ती जबाबदारी समर्थपणे पार पाडू. तालुक्यातील अनेक प्रश्न प्रलंबित असून ते सोडवण्यासाठी भर देऊ.
शिरीष देसाई म्हणाले,आज आपल्याकडे रोजगार नसल्याने आपली पिढी पुण्या मुंबईकडे जात आहे त्यांना इथेच रोजगार मिळावा त्यासाठी काय करता येईल याचा विचार आम्ही या पाच वर्षात करू.
यावेळी युवराज पोवार, दशरथ घुरे, नारायण भडांगे, भीमराव माधव, मारुती चव्हाण, व्ही डी जाधव, युवराज जाधव यांनी मनोगत व्यक्त करून नूतन सदस्यांना शुभेच्छा दिल्या.
सुरुवातीला कॉम्रेड संपत देसाई यांनी स्वागत व प्रास्ताविक केले संजय घाटगे यांनी सूत्रसंचालन केले यावेळी संजय सावंत, निसार लाडजी, प्रकाश मोरुस्कर, प्रकाश कालेकर, नामदेव फगरे, सचिन देसाई, कृष्णा सावंत, कृष्णा गुडुळकर, अर्जुन शेडगे, बाळू जाधव, तानाजी मिसाळ, हभप गौरव सुतार, मारुती पाटील, कल्पना जाधव, गंगाराम येडगे, सरिता कांबळे यांच्यासह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

निधन वार्ता
गोविंद प्रभू

लिंगवाडी ता. आजरा येथील गोविंद गोपाळ प्रभू ( वय ७५ वर्षे ) यांचे वृद्धापकाळाने निधन झाले.त्यांच्या पश्चात पत्नी, तीन विवाहित मुले, सुना नातवंडे असा परिवार आहे. आजरा साखर कारखान्याचे कर्मचारी संतोष प्रभू यांचे ते वडील होत.

उत्तूरमध्ये ‘शिव संकल्प’ सेवा अभियान ; अनाथ व निराधारांसाठी ३६,५०० किलो धान्य संकलन

उत्तूर : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
उत्तूर–आजरा परिसरात सामाजिक बांधिलकी जपत Helping Hand Foundation यांच्या वतीने “शिव–संकल्प मोहिम २०२६” हा विशेष सेवा उपक्रम राबविण्यात येत आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त HIV बाधित अनाथ मुले आणि निराधार वृद्धांसाठी तब्बल ३६,५०० किलो पौष्टिक धान्य संकलित करण्याचा संकल्प संस्थेने केला आहे.
या मोहिमेअंतर्गत दि. १८ ते २२ फेब्रुवारी २०२६ या कालावधीत आजरा तालुक्यातील तसेच उत्तूर परिसरातील गावागावांत जाऊन नाचणी, मूग, मटकी, हरभरा, शेंगदाणे, गूळ आणि विविध श्रीधान्याचे संकलन केले जाणार आहे. एक मूठ धान्य अनाथांसाठी या संकल्पनेतून प्रत्येक घरातून मिळणारे योगदान गरजूंपर्यंत पोहोचविण्याचा संस्थेचा प्रयत्न आहे.
या उपक्रमातून समाजातील वंचित घटकांना पोषणमूल्य असलेले अन्नधान्य उपलब्ध करून देण्याचा हेतू असून नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत धान्य स्वरूपात सहकार्य करावे, असे आवाहन पदाधिकाऱ्यांनी केले आहे.

शिवजयंती निमित्त लाटगाव येथे गुरुवारी विविध कार्यक्रम

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
शिवजयंती निमित्त लाटगाव ता. आजरा येथे नागनाथ क्रांतिकारी तरुण मंडळाच्या वतीने विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
सकाळी सरसेनापती प्रतापराव गुजर स्मारक नेसरी येथून शिवज्योत आणण्यात येणार आहे. अकरा वाजता छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीचे पूजन करण्यात येणार असून दुपारी बारा ते दोन या वेळेत महाप्रसाद कार्यक्रम होणार आहे. संध्याकाळी सात ते नऊ वाजेपर्यंत महिलांचा हळदी कुंकू कार्यक्रम, छत्रपती शिवाजी महाराज पाळणा कार्यक्रम होणार आहे. रात्री दहा वाजता मान्यवर व विविध स्पर्धेतील गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान कार्यक्रम तर रात्री अकरा वाजता लाटगाव मंडळ आयोजित ऐतिहासिक नाटक ‘ स्वातंत्र्याची सिंहगर्जना ‘ सादर केले जाणार आहे.

हात्तिवडे येथे दहावीच्या विद्यार्थ्यांचा शुभेच्छा

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
हात्तिवडे येथील श्री सरस्वती हायस्कूल हत्तीवडे येथे इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांचा शुभेच्छा समारंभ उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे मुख्याध्यापक म उदय आमनगी होते.
विद्यार्थ्यांनी आपल्या शिक्षकांनी जीवनात दिशादर्शक म्हणून केलेल्या कार्याबद्दल मनोगते व्यक्त केली. शिक्षकांच्या मार्गदर्शनामुळे आत्मविश्वास वाढला आणि योग्य ध्येय निश्चित करण्यास मदत झाली, असे त्यांनी नमूद केले.
अध्यक्षीय भाषणात मुख्याध्यापक माननीय श्री आमनगी यांनी दहावी हा जीवनातील केवळ एक छोटासा टप्पा असल्याचे सांगितले. पुढील आयुष्यात विविध प्रसंगांना धैर्याने सामोरे जाताना सकारात्मक दृष्टीकोन ठेवावा, असे मार्गदर्शन त्यांनी केले. तसेच बोर्ड परीक्षेदरम्यान मानसिक स्थैर्य कसे राखावे, वेळेचे नियोजन कसे करावे आणि आत्मविश्वासाने परीक्षेला कसे सामोरे जावे याबाबत सखोल मार्गदर्शन केले.
या कार्यक्रमास शाळेतील सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

तालुक्यातील पंचायत समिती व जिल्हा परिषद निवडणूक निकालाचे रोखठोक विश्लेषण खालील लिंक वर पहा…




