mrityunjaymahanews
अन्य

सातच्या बातम्या

रवीवार दि.९ मार्च २०२५

तालुक्यात नारी शक्तीचा जागर…

          आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

मलिग्रे येथे महिला दिनानिमित्त केला विधवा महिलेचा सन्मान व सत्कार

        जागतिक महिला दिनानिमित्त मलीग्रे येथे महिला दिन-जनजागृती मोहीम कार्यक्रम, पोस्टर्स प्रदर्शन व महिलांच्यासाठीच्या वेगवेगळ्या स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते.

          संविधान सन्मानासाठी महिलांच्या सन्मानासाठी, महिलांच्या न्याय हक्कासाठी या विषयावर यामध्ये संजय घाटगे, संग्राम सावंत, सरपंच शारदा गुरव व मंगलताई कांबळे या मान्यवरांनी आपले विचार व्यक्त केले.

        त्याचबरोबर शाळेतील सुकन्या बुगडे, दूर्वा कागिनकर व दुर्वा बुगडे या मुलींनी भाषणे केली. यावेळी शाळेच्या आवारामध्ये आम्ही भारतीय लोक अभियान व मासूम संविधान फेलोशिप कार्यक्रम अंतर्गत पोस्टर प्रदर्शन लावण्यात आले होते.यामध्ये संविधानाच्या वेगवेगळ्या मूल्यांची माहिती देणारे तसेच छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहासाची माहिती देणारे पोस्टर प्रदर्शन शाळेच्या आवारात लावण्यात आले होते. महिलांच्या वेगवेगळ्या स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या.

       यावेळी विधवा महिलांचा सत्कार करून सन्मान करण्यात आला. यामध्ये शितल बुगडे यांनी त्यांचे पती वारल्यानंतर कुंकू दागिने व सुहासिनीचा मान न सोडता कायम त्यांनी ठेवला. तसा ठराव गावामध्ये करण्यात आला. हा एक क्रांतिकारी बद्दल झाल्याबद्दल त्यांचा विषय सत्कार सर्वांच्या वतीने घेण्यात आला.

      महात्मा ज्योतिबा फुले विद्यामंदिरात सरपंच शारदा गुरव यांच्या अध्यक्षतेखाली कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी उपसरपंच चाळू केंगारे, संविधान संवर्धन चळवळीचे कार्यकर्ते संग्राम सावंत, सदस्या शोभा जाधव, सुरेखा तर्डेकर, कल्पना बुगडे, महिला राज्यसत्ता आंदोलनाच्या नेत्या मंगलताई कांबळे, सामाजिक कार्यकर्ते संजय घाटगे, बाळू कांबळे, शिवाजी भगुत्रे, संजय कांबळे,सचिन लोहार, महाराष्ट्र राज्य घरकामगार युनियनच्या राज्य सदस्या लक्ष्मी कांबळे, माजी सरपंच अशोक शिंदे,शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा सविता कागिनकर, उपाध्यक्षा पुजा पन्हाळकर, अंगणवाडी सेविका शशिकला घोरपडे, अपूर्वा देशपांडे, नंदा पवार व लोहार मॅडम, मदतनीस नंदा बुगडे, शितल बुगडे व शोभा बुगडे यांच्यासह सविधान गटातील महिला व ग्रामस्थ महिला उपस्थित होत्या.

      यावेळी कार्यक्रमाची सुरुवात सावित्रीच्या ओवीने मंगल कांबळे यांनी केली. कार्यक्रमाचा शेवट शकुंतला बोरनाक यांनी तुकोबारायांच्या अभंग गाऊन केला.कार्यक्रमाचे स्वागत संविधानाची प्रास्ताविका व संविधानाचे पुस्तक देऊन मान्यवरांचे करण्यात आले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक मनीषा सुतार यांनी तर आभार कल्पना कोरवी यांनी मानले.

आरदाळ येथे
महिला लेझीम पथकासह विविध वेशभूषा ठरल्या लक्षवेधी

      महिलांचे लेझीम पथक, पारंपारिक वेशभूषा व विविध उपक्रमांनी आरदाळ येथे जागतिक महिला दिन उत्साहात संपन्न झाला. महिला दिनानिमित्त आरदाळ येथील क्रांतीज्योती महिला संविधान गट व ग्रामपंचायत आर्दाळ यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक महिला दिन विविध उपक्रमांनी साजरा करण्यात आला.

       महिलांच्या लेझीम पथकाचे उद्घाटन माजी सरपंच विजय वांगणेकर यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आली. त्यानंतर गावातून पदयात्रेला सुरुवात झाली. या पदयात्रेमध्ये आरदाळ गावच्या सरपंच रूपाली पाटील, पदाधिकारी,मान्यवर यांच्यासह विविध पारंपारिक वेशभूषेमध्ये गावातील नागरिक, स्त्री-पुरुष,प्राथमिक विद्यामंदिर आरदाळ शाळेतील विद्यार्थी, माध्यमिक विद्यालय आरदाळ शाळेतील विद्यार्थी व शिक्षक यांनी सहभाग घेतला.

         या पदयात्रेमध्ये आरदाळ गावच्या सरपंच रुपाली पाटील यांचे पती सूर्यकांत पाटील या पती-पत्नींनी ‘सावित्रीबाई फुले व महात्मा फुले’ यांची वेशभूषा केली होती. तर ग्रामपंचायत सदस्या संगीता सुतार यांनी पती सागर सुतार यांचे सोबत ‘विठ्ठल रुक्मिणी’ रूपातील वेशभूषा केली होती. त्याचबरोबर प्राथमिक व माध्यमिक शाळेच्या विद्यार्थ्यांनी देखील विविध क्षेत्रातील महिलांची कामगिरी अधोरेखित करणाऱ्या डॉक्टर, वकील, प्राध्यापक अशा वेशभूषा केल्या होत्या. त्याचबरोबर लोकपरंपरा दाखवणाऱ्या वासुदेव , वारकरी, टाळकरी, शेतकरी यांच्या वेशभूषित विद्यार्थी व गावातील गजानन पोवार महाराज यांचे भजनी मंडळाने सहभाग घेतला होता.
हलगी व पारंपरिक वाद्यांच्या तालावर महिलांचे लेझीम पथक,नऊवारी साड्या, फेटे बांधून गावातील महिलांनी सहभाग घेतला होता. छत्रपती शिवाजी महाराज ,राजमाता जिजाऊ, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, रमाबाई आंबेडकर ,इंदिरा गांधी अशा विविध वेशभूषा करून शाळांचे विद्यार्थी, विद्यार्थिनी, शिक्षक ,सर्व ग्रामपंचायत पदाधिकारी, महिला बचत गट, आरोग्य विभाग यांचा सहभाग होता.

        भैरीदेव मंदिर पासून सुरू झालेली पदयात्रा, गावातून फिरून भैरी मंदिरासमोर आल्यानंतर सावित्रीबाई फुले महात्मा फुले यांच्या प्रतिमेचे पूजन सरपंच रूपालीताई पाटील यांच्या हस्ते झाले. प्रास्ताविक भाषणात पोलीस पाटील व गटाच्या प्रमुख मनीषा गुरव यांनी कार्यक्रमाचा हेतू स्पष्ट करून गावात सर्वसमावेशक कार्यक्रम घेऊन महिलांचा मान व समानता कशी असावी याबाबत मार्गदर्शन केले. यावेळी सूर्यकांत पाटील, शिवाजी गुरव, शिवाजी जाधव, माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक शरद पाटील, प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षक सर्व शिक्षिका यांचे मनोगत व मार्गदर्शन झाले.

      या सर्व कार्यक्रमाचे आयोजन ‘क्रांतीज्योती संविधान महिला गट’ यांनी केले. कार्यक्रमाच्या वेळी हर्षदा चव्हाण या विद्यार्थिनीने ‘लाटी-काठी’ खेळत कार्यक्रमाची शोभा वाढवली. तसेच शाळेच्या मुला मुलींनीही आपली मनोगते व्यक्त केली. कार्यक्रमासाठी ज्यांनी ज्यांनी सहकार्य व उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला त्या सर्वांचे आभार मानताना उपकेंद्राच्या डॉक्टर रीना यांनी आरोग्य बाबत मार्गदर्शन करून शेवटी आभार मानले. त्यानंतर कार्यक्रमाची सांगता झाली.

व्यंकटराव हायस्कूल

       येथील व्यंकटराव हायस्कूल आजरामध्ये जागतिक महिला दिन कार्यक्रम साजरा झाला . या कार्यक्रमाचे दीपप्रज्वलन व राजमाता जिजाऊ, अहिल्याबाई होळकर, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले आणि देशाच्या पहिल्या महिला पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या प्रतिमेचे पूजन आजरा महाल शिक्षण मंडळ आजराच्या संचालिका सौ. अलकाताई शिंपी व प्रमुख पाहुण्या डॉ. मंगल मोरबाळे यांचे हस्ते करण्यात आले.

       यावेळी संचालक श्री सचिन शिंपी,प्राचार्य श्री आर.जी. कुंभार, पर्यवेक्षिका सौ.व्ही.जे. शेलार, प्राथमिक विद्या मंदिर मुख्याध्यापिका चव्हाण सौ.आशा सचिन गुरव व सर्व व्यंकटराव परिवार उपस्थित होता.

       प्रास्ताविकपर भाषणात सौ. एस. पी. कुंभार यांनी आजची स्त्री ही प्रत्येक क्षेत्रात कर्तबगार आहे. स्त्रीने आपली झेप सर्व क्षेत्रात घेतली आहे. ही स्त्री अबला नाही तर आजची स्त्री ही धडधडता अंगार आहे असे स्पष्ट केले.

       प्रा. शिवाजी पारळे यांनी महिला दिनांला शुभेच्छा देताना शांता शेळके यांची कविता सादर केली. प्रमुख वक्त्या डॉ.मंगल मोरबाळे यांनी आपल्या व्याख्यानामधून “आजची स्त्री ही सुरक्षित आहे का? आजच्या स्त्रीने आहाराच्या बाबतीत दक्ष राहिले पाहिजे ..सकस संतुलित आहार घेतला पाहिजे.. तरच आपलं शरीर उत्तम राहू शकते .आरोग्यम् धनसंपदा यासाठी दररोज तिने व्यायाम केला पाहिजे ,योगासन केली पाहिजेत, आरोग्याच्या बाबतीत सर्व स्त्रियांनी सजग राहिले पाहिजे सोशल मीडियाचा वापर करताना स्त्रियांनी विशेष काळजी घेतली पाहिजे त्याचप्रमाणे विद्यार्थिनींनी शाळेला येताना व जाताना अनोळखी व्यक्ती वर पटकन विश्वास ठेवू नये. तसेच मोबाईलचा शक्यतो वापरच करू नये. असे सांगितले.

      संचालक श्री. सचिन शिंपी यांनी जागतिक महिला दिनानिमित्त महिलांना समानता दिल्याची थीम यावर आपले विचार मांडले. व सर्व महिलांना शुभेच्छा दिल्या. त्यानंतर संचालिका सौ. अलकाताई शिंपी आपल्या अध्यक्षीय भाषणातून सांगितले की, स्त्री ही पूर्वापार शोषित, कष्ट सहन करणारी, कर्तबगार आणि संपूर्ण पिढी घडवणारी आहे. राजमाता जिजाऊ अहिल्याबाई होळकर तसेच ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यासारख्या असंख्य महिलांचे तत्कालीन कार्य आज समाजासमोर आदर्श आहेत. त्याचबरोबर आजच्या स्त्रीमध्ये पण कणखरपणा, स्वाभिमान देशाभिमान, कुटुंबाबद्दल प्रेम अपार आहे त्यामुळेच कोरोना सारख्या काळातही अनेक महिलांनी आपला विस्कटलेला संसार आणि आर्थिक परिस्थिती सावरताना विविध लघुउद्योगधंदे , अपार कष्ट करून पुन्हा उभे केले. कुटुंबाची जबाबदारी आपल्या खांद्यावर घेऊन त्यांनी आज समर्थपणे पेलली आहे. अशा महिलांचाही या दिवशी सन्मान होणं गरजेचं आहे.

      कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ.एम.सी. हरेर यांनी केले. सौ.व्ही.ए.वडवळेकर यांनी “कर्तव्य” या स्वरचित कवितेतून आपले विचार मांडले.सौ. अस्मिता पाटील यांनी आभार व्यक्त केले.

पंडित दीनदयाळ विद्यालय

         पंडित दीनदयाळ विद्यालयात मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला संस्थेच्या उपाध्यक्षा श्रीमती विमल भुसारी व आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते श्री. उत्तम पाटील यांच्या हस्ते प्रथम शिक्षिका सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला हार अर्पण करून सुरुवात करण्यात आली यावेळी मुख्याध्यापक देसाई एस. वाय. व शिक्षक स्टाफ उपस्थित होता.

        महिला दिन केव्हापासून साजरा केला जातो आत्ताची स्त्री ही अबला नसून ती सबला झालेली आहे विविध क्षेत्रांमध्ये आज स्त्री पुरुषांच्या बरोबरीने काम करत आहे आणि आपलं योगदान देशाच्या प्रगतीमध्ये देत आहे महिलांनी विविध क्षेत्रांमध्ये केलेल्या कार्याचा उल्लेख प्रकाश प्रभू यांनी आपल्या मनोगतातून व्यक्त केला स्त्रीचे व्यक्तिमत्व स्त्रीनेच घडविले पाहिजे मुलांच्या शिक्षणात आईची भूमिका काय असते ,माता पालकांनी आपल्या मुलांशी संवाद कसा साधला पाहिजे ,मुलींची पहिली शाळा म्हणजे आई आहे ,स्त्रिया बद्दल वास्तव उदाहरणे देऊन स्त्रीचे महत्व कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते उत्तम पाटील यांनी सांगितले.

      या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीमती निर्मळे एस. ए. तर आभार तेजश्री बुरुड यांनी मानले.

वसंतराव धुरे यांचा राजीनामा मंजूर…
नूतन अध्यक्ष निवडीच्या हालचाली सुरू

          आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

      वसंतराव देसाई आजरा सहकारी साखर कारखान्याचे विद्यमान अध्यक्ष वसंतराव धुरे यांनी दिलेला राजीनामा शनिवारी झालेल्या संचालक मंडळाच्या बैठकीत मंजूर करण्यात आला. धुरे यांच्या राजीनाम्यानंतर नूतन अध्यक्ष निवडीच्या हालचाली गतिमान झाल्या आहेत.

       प्रकृती अस्वास्थ्याच्या कारणास्तव धुरे यांनी अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे. धुरे आपल्या मताशी ठाम राहिल्याने  त्यांचा राजीनामा मंजूर करण्यात आला.

        धुरे यांच्या राजीनाम्यानंतर नूतन अध्यक्ष निवडीच्या हालचाली सुरू झाल्या असून नूतन अध्यक्ष पदाचे मुकुंदराव देसाई उदय पवार व विष्णुपंत केसरकर हे प्रमुख दावेदार समजले जातात.

        येत्या पंधरा दिवसांमध्ये नूतन अध्यक्ष निवडीचा कार्यक्रम जाहीर होण्याची शक्यता आहे ‌.

‘श्री बिरेश्वरच्या’ आजरा शाखा अध्यक्षपदी ज्योतिप्रसाद सावंत

           आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

      माजी खासदार अण्णासाहेब जोल्ले व कर्नाटकच्या माजी मंत्री विद्यमान आमदार शशिकलाताई जोल्ले यांनी स्थापन केलेल्या श्री बिरेश्वर को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी ( मल्टिस्टेट) च्या आजरा शाखा अध्यक्षपदी पत्रकार ज्योतिप्रसाद सावंत यांची निवड करण्यात आली आहे. आजरा लिंगायत समाजाचे प्रमुख महेश कुरुणकर , जनता बँकेचे माजी उपाध्यक्ष तानाजी डोणकर, सर्फनाला प्रकल्पग्रस्तांचे नेते सुरेश मिटके, टॅक्स कन्सल्टंट सुशांत निकम, गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्टर अनिकेत शिंत्रे यांची संचालकपदी निवड झाली आहे. निवडीची पत्रे समारंभ पूर्वक प्रदान करण्यात आली.

      महाराष्ट्र कर्नाटक व गोवा येथे २२५ शाखांचा विस्तार , चार लाखांवर सभासद व ४१०० कोटी रुपयांपेक्षा जास्त ठेवी असणाऱ्या या संस्थेच्या आजरा शाखेच्या वाढीसाठी प्रयत्न केला जाईल नूतन अध्यक्ष ज्योतिप्रसाद सावंत यांनी सांगितले.

मंगळवारच्या मोर्चाची जय्यत तयारी

           आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

       आजरा शहरातील रेंगाळलेली नवीन पाणीपुरवठा योजना व सद्यस्थितीला शहरवासीयांचे पाण्याअभावी होत असलेले हाल या पार्श्वभूमीवर मंगळवार दिनांक ११ रोजी काढण्यात येणाऱ्या सर्वपक्षीय मोर्चाची जय्यत तयारी सुरू असून हॉटेल मॉर्निंग स्टार येथे नुकतीच प्रमुख कार्यकर्त्यांची बैठक पार पडली.

       शनिवारी झालेल्या बैठकीमध्ये सदरच्या मोर्चा यशस्वी करण्यासाठी सर्वांनी आपापली जबाबदारी स्वीकारली व आजरेकर शहरवासीयांनी जास्तीत जास्त संख्येने मोर्चात सामील करून घेऊन पाणी टंचाईचे कृत्रिम संकट लवकरात लवकर दूर करून समस्त अधिकार्‍यांना दररोज स्वच्छ पाणी देण्याबद्दल नगरपंचायत प्रशासनावर दबाव म्हणून हा प्रश्न मार्गी लावण्याचे ठरले.

        यावेळी परशुराम बामणे, वाय. जी. इंजल, पांडुरंग सावरतकर, वाय. बी. चव्हाण, रवी भाटले, दयानंद भोपळे, जोतिबा आजगेकर जावेद पठाण, दिनकर जाधव आदी उपस्थित होते.

साईट : दत्त मंदिर समोर सोमवार पेठ आजरा संपर्क : ९५२७९७३९६९  

 

संबंधित पोस्ट

भोंदू बाबाच्या जादूटोण्याने मलिग्रे पंचकोशी हादरली…

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

BREAKING NEWS

mrityunjay mahanews
error: Content is protected !!