
उमेश आपटे यांच्या निर्णयाकडे कागल विधानसभा मतदारसंघासह तालुकावासीयांचे लक्ष

ज्योतीप्रसाद सावंत
राष्ट्रीय काँग्रेसचा ‘ हात ‘ व ‘ साथ ‘ सोडल्यानंतर जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष उमेश आपटे यांनी अद्याप आपली कोणतीही राजकीय भूमिका स्पष्ट केलेली नाही. असे असले तरीही होऊ घातलेल्या तालुका खरेदी विक्री संघासह आजरा साखर कारखाना, पंचायत समिती, जिल्हा परिषद निवडणुकांमध्ये त्यांची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे. केवळ याच निवडणुका नव्हे तर कागल-गडहिंग्लज मतदार संघातील विधानसभेची अनेक गणितेही उमेश आपटे यांच्यावर अवलंबून आहेत. त्यामुळे कागल विधानसभा मतदारसंघासह आजरा तालुकावासियांचे लक्ष आपटे यांच्या भूमीकडे लागून राहिले आहे.
दोन महिन्यापूर्वी आपटे यांनी अचानकपणे काँग्रेसला सोडचिट्टी देण्याचा निर्णय घेऊन काँग्रेसच्या प्राथमिक सदस्यत्वासह सर्व पदांचा राजीनामा वरिष्ठांकडे सादर केला. माजी गृहराज्यमंत्री सतेज उर्फ बंटी पाटील यांचे कट्टर समर्थक व काँग्रेसचे निष्ठावान कार्यकर्ते अशी ओळख असणाऱ्या आपटे यांच्या या भूमिकेमुळे तालुक्यामध्ये अनेकांच्या भुवया उंचावल्या. उत्तूर विभाग वगळता तालुक्यात काँग्रेसचे नावापुरते असणारे अस्तित्व, काँग्रेसच्या नेतृत्वाखाली नसणाऱ्या संस्था व त्यामुळे कार्यकर्त्यांना संधी देण्यावर येत असलेल्या मर्यादा या सर्वाचा विचार करून आपटे यांनी काँग्रेसपासून बाजूला होण्याचा निर्णय जाहीर केला.
उत्तूर विभागात आपटे यांना मानणारी बरीच मंडळी आहेत हे यापूर्वी झालेल्या पंचायत समिती, जिल्हा परिषद, ग्रामपंचायत यासह आजरा साखर कारखाना निवडणूकीत अधोरेखीत झाले आहे. या विभागातील सर्वपक्षीय कार्यकर्त्यांना आपटे यांचे वावडे नाही हे देखील यापूर्वी अनुभवावयास आले आहे.
काँग्रेसचा राजीनामा दिल्यानंतर कोणताही उतावळेपणा न करता आपटे यांनी शांत राहणे पसंत केले. सध्या मात्र त्यांच्या हालचाली पाहता राष्ट्रवादी काँग्रेससह भाजपाची वरिष्ठ नेतेमंडळी त्यांच्या संपर्कात असल्याची दिसते. आपटे यांना जो पक्ष आपल्या प्रवाहात सामावून घेईल त्या पक्षाला निश्चितच फायदा होणार हे साधे समीकरण आहे. भाजपासह राष्ट्रवादी काँग्रेसला आपटे हे समान अंतरावर ठेवून असल्याचे सध्यातरी दिसत आहेत. परंतु अलीकडे आम. मुश्रीफ यांची वाढलेली जवळीक पाहता ते राष्ट्रवादीच्या बाजूने कौल देतील अशी शक्यता वर्तवली जात आहे. आम.मूश्रीफ यांनाही सध्या उत्तूर विभागात आपली ताकद कायम ठेवण्यासाठी आपटे यांची मदतच होणार आहे. यापूर्वीच्या पत्रकार बैठकांमध्ये आपण भाजपमध्ये कदापिही जाणार नाही असे देखील त्यांनी स्पष्ट केल्याने राष्ट्रवादीमध्ये ते सक्रिय होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
एकंदर आपटे यांची नेमकी भूमिका काय राहील याबाबत राजकीय मंडळींकडून शक्यता वर्तविली जात आहे. अचानक लवकरच आपल्या भूमिकेबाबत एखादा ‘राजकीय बॉम्ब’ आपटे यांच्याकडून पडण्याची शक्यता आहे.

पेरणोली येथील आगीत सव्वा लाखांचे नुकसान

पेरणोली (ता. आजरा) येथे लागलेल्या आगीत गवत गंज्या व दोन खोपी खाक झाल्या. सुमारे पंधरा एकरचा परिसर जळून गेला. आठ शेतकऱ्यांचे सव्वा लाखांचे नुकसान झाले आहे. महसूल विभागाने पंचनामा केला आहे. आगीचे नेमके कारण समजलेले नाही. आज दुपारी साडेतीन वाजता पाचशे सतेए शीचा पाच या माळातून आग पसरत गेली. दुपारचे उन्ह व वाळलेल्या पाला पाचोळा यामुळे आग
पसरत केली. ही आग खडक शेतात गेली. या शेतातील बाबू लोखंडे, गणपती लोखंडे, शेवंता लोखंडे , आनंदा लोखंडे, हरीबा कांबळे यांच्या गवत गंज्या जळून गेल्या. बाबू लोखंडे यांचे शेळीचे शेड व अनिल कांबळे यांची खोप आगीच्या भक्ष्यस्थानी पडली. प्रभाकर देसाई व श्रीमती शेवंता कांबळे यांच्या मेसकाठ्या जळून गेल्या. स्मारे पंधरा एकरच्या परिसराला आगीचा फटका बसला. आगीचे लोळ दिसू लागल्यावर ग्रामस्थ घटनास्थळी धावले. प्रभाकर देसाई यांच्या घरातून पाणी घेवून आग विझवण्यात आली. ग्रामस्थांना आग आटोक्यात आणायला सुमारे तासभर अथक प्रयत्न करावे लागले. तलाठी श्री. सुतार, पोलीस पाटील दिपाली कांबळे, कोतवाल रंगराव दोरुगडे यांनी पंचनामा केला आहे.

आजरा अर्बन तर्फे सहकार प्रशिक्षण शिबिर

भारतीय राष्ट्रीय सहकारी संघ दिल्ली व आजरा अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक यांच्या संयुक्त विद्यमाने उत्तूर व उत्तूर परिसरातील सभासद यांचा गुरुवार दि. २३/०२/२०२३ रोजी सकाळी ठीक १० वाजता सभासद प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित केला आहे अशी माहिती बँकेचे चेअरमन डॉ. अनिल देशपांडे यांनी दिली. बँकेच्या उत्तुर शाखेत होणाऱ्या या प्रशिक्षण शिबिरासाठी सभासदांनी उपस्थित रहावे असे आवाहनही केले आहे.
तसेच बँकेकडे ५५५ दिवसांकरिता खास महिलांसाठी व ज्येष्ठ नागरिक यांच्याकरिता ८.२५% व इतरांकरिता ८% व्याजदर लागू केलेला आहे. तरी याचा लाभ सर्व ठेवीदार व सभासदांनी घ्यावा असेही स्पष्ट केले आहे.

हजरत दावल मलिक यांचा आज व उद्या उरूस
हिंदू- मुस्लिम बांधवांसह सर्वधर्मीयांचे श्रद्धास्थान असणाऱ्या हजरत दावल मलिकसो यांच्या ऊरूसाचे बुधवार दिनांक २२ व गुरुवार दिनांक २३ रोजी आयोजन करण्यात आल्याची माहिती हजरत दावल मलिकसो उरूस कमिटीच्या वतीने देण्यात आली आहे.
बुधवार दिनांक २२ रोजी संदल व गंधरात्र मिरवणूक समाधान हॉटेल, संभाजी चौक येथून सुरू करण्यात येणार आहे तर भर उरूस व गलेफ मिरवणूक गुरुवार दिनांक २३ फेब्रुवारी रोजी असल्याचेही सांगण्यात आले.



