गुरुवार
२३ जुलै २०२६

आज आजरा बंदचे आवाहन…
वंचित बहुजन युवा आघाडीचे तहसीलदाराना निवेदन

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
दिल्लीमधे विद्यार्थांच्यावर पोलीसांकडून झालेल्या लाठीहल्याबाबत बर्चित बहुजन आघाडीकडून गुरुवार (ता.२३) महाराष्ट्र बंदचे आवाहन करण्यात आले आहे. याबाबतचे निवेदन वंचित बहुजन युवा आघाडीच्यावीतीने तहसीलदारांना देण्यात आले. निवासी नायब तहसीलदार म्हाळसाकांत देसाई यांनी निवेदन स्विकारले. निवेदनात म्हंटले आहे. वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष ॲड. बाळासाहेब आंबेडकर यांनी दिल्लीमधे विद्यार्थ्यांच्यावर पोलीसांकडून झालेल्या लाठीहल्याबाबत महाराष्ट्र बंदचे आवाहन केले आहे.
त्यानुसार आज गुरुवारी वंचित बहुजन आघाडीकडून आजरा बंदचे आवाहन करण्यात आले आहे. समविचारी संघटनानी सहभागी व्हावे असेही आवाहन युवा आघाडीने केले आहे. निवेदनावर वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा उपाध्यक्ष दत्तात्रय कांबळे, युवा आघाडीचे संतोष शिवाजी मासोळे, काशिनाथ मोरे, सुप्रिया डेळेकर, शोभा कांबळे आदींच्या सह्या आहेत.

उत्तूर येथील एकजण महिनाभरापासून बेपत्ता

उत्तूर : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
उत्तूर (ता. आजरा) येथील रहिवासी विनायक गणपती गुरव (वय ६२) हे गेल्या महिन्यापासून बेपत्ता आहेत.
याबाबत समर्थ सचिन गुरव यांनी आजरा पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. संबंधित व्यक्तीबाबत कोणाला माहिती मिळाल्यास आजरा पोलिस ठाण्याशी अथवा त्यांच्या नातेवाईकांशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

स्व. अजितदादांच्या जयंती निमित्य आजरा साखर कारखान्यावर वृक्षारोपण

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
स्व.वसंतराव देसाई आजरा साखर कारखान्याने कारखाना कार्यस्थळावर स्व. अजितदादा पवार यांच्या जयंती निमित्य वृक्षारोपण कार्यक्रम संपन्न झाला.
कारखान्याचे अध्यक्ष श्री. मुकुंद उर्फ उदयसिंह बळीराम देसाई यांचे हस्ते व संचालक मंडळाच्या उपस्थितीत वृक्षारोपण कार्यक्रमाचा शुभारंभ करणेत आला. कारखान्याने वेगवेगळ्या प्रजातीची ७०० झाडे कारखाना परिसरात लावली असुन भविष्यात कारखान्यास उत्पन्न देणा-या बांबुची मोठ्या प्रमाणावर लागण करणेत आली आहे.
या कार्यक्रमास कारखान्याचे व्हा. चेअरमन श्री. अनिल फडके, जिल्हा बँक प्रतिनिधी श्री. सुधीर देसाई, जेष्ठ संचालक श्री. वसंतराव धुरे, श्री. विष्णुपंत केसरकर श्री. उदयसिंह पोवार, श्री. मधुकर देसाई, श्री. मारूती घोरपडे, श्री. सुभाष देसाई, श्री. संभाजी रामचंद्र पाटील, श्री. शिवाजी नांदवडेकर, श्री. गोविंद पाटील, श्री. काशिनाथ तेली, श्री.हरी कांबळे तसेच कारखान्याचे शासन नियुक्त प्रतिनिधी श्री. दिगंबर देसाई आणि कार्यकारी संचालक श्री.एस.के. सावंत, अन्य खातेप्रमुख व कर्मचारी उपस्थित होते.
फोटो क्लिक…

मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून मलीग्रे ते शिरसंगी हा ३.५ किलोमीटर रस्ता झाला आहे. परंतू वनविभागातील ८० मिटर पैकी दहा फुटात रस्त्यात चिखल झाल्याने गाड्या रूतून मनस्ताप सहन करावा लागत आहे. वन विभागाने किमान जाण्या येण्यायोग्य तरी हा रस्ता दुरुस्त करण्याची गरज आहे.

अखेर उत्तूर ग्रामपंचायत अधिकारी प्रकाश पाटील यांची विनंती बदली.

उत्तुर : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
उत्तूर ग्रामपंचायतीचे ग्रामपंचायत अधिकारी प्रकाश पाटील यांची अखेर विनंती बदली मंजूर झाल्याने ग्रामपंचायतीच्या वतीने त्यांचा निरोप समारंभ आयोजित करण्यात आला. ग्रामपंचायतीचा कारभार सक्षमपणे सांभाळला. माहितीच्या अधिकाराच्या अर्जांचा भडिमार, विविध तक्रारी आणि अनेक गुंतागुंतीचे प्रश्न यांचा संयमाने सामना करत त्यांनी अनेक प्रलंबित विषय मार्गी लावले. कठोर पण लोकहिताचे निर्णय घेणारे अधिकारी म्हणून त्यांनी वेगळी ओळख निर्माण केली.यावेळी प्रकाश पाटील यांचा सत्कार श्री. किरण आमणगी यांच्या हस्ते करण्यात आला. त्यांच्या जागी उत्तूररचे रहिवासी सचिन (राजू) येसादे यांची ग्रामपंचायत अधिकारी म्हणून नियुक्ती झाली आहे.
या कार्यक्रमाप्रसंगी भैरू कुंभार व संभाजी कुराडे यांनी आपली मनोगत व्यक्त केली.कार्यक्रमास ग्रामपंचायत सदस्य संजय उतूरकर, मिलिंद कोळेकर, समीक्षा देसाई, अनिता घोडके, आशा पाटील, सुनिता केसरकर, सरिता कुरुणकर, बाळासो सावंत तसेच ग्राममहसूल अधिकारी एकनाथ मिसाळ, महसूल विभागाचे अधिकारी, कर्मचारी व ग्रामस्थ उपस्थित होते.
आभार उपसरपंच सुनिता हतिरगे यांनी मानले. तर प्रस्ताविक महेश करंबळी यांनी केले.
प्राथमिक शाळा म्हणजे संस्कार केंद्र
– अंजनाताई रेडेकर

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
आपल्या गावातील प्राथमिक शाळा या संस्कार केंद्रे असून त्यांचे जतन व तर संवर्धन आपण सर्वांनीच केले पाहिजे व ती आपली जबाबदारी आहे, असे प्रतिपादन केदारी रेडेकर समूहाच्या प्रमुख श्रीमती अंजना रेडेकर यांनी केले. त्या वाटंगी प्राथमिक शाळेत शैक्षणिक साहित्य वाटप कार्यक्रम प्रसंगी बोलत होत्या.
राज्याचे माजी गृहमंत्री व विधानपरिषद विरोधी पक्षनेते आ. सतेज ऊर्फ बंटी पाटील साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त जमा झालेल्या वह्या वाटप कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या म्हणून श्रीमती रेडेकर उपस्थित होत्या.
सुरुवातीला शाळेचे मुख्याध्यापक श्री. सुनील कामत यांनी स्वागत व प्रास्ताविक केले व कार्यक्रमाचा हेतू स्पष्ट केला. शिवसेना तालुकाप्रमुख युवराज पोवार यांनी मनोगत व्यक्त केले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सरपंच सौ. इंदुबाई कुंभार होत्या. शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य उपस्थित होते तसेच शिवराज समुहाचे प्रमुख श्री. शिवाजी गिलबिले , विठ्ठल भिकले, मधुकर चौगुले, बाळू चौगुले, पर्वता नाईक, देऊळवाडीचे उपसरपंच संजय भाई सावंत, हरिश्चंद्र व्हरकटे, अर्जुन कसलकर, महादेव गुरव आदी मान्यवर उपस्थित होते.
श्रीमती रंजना हसुरे यांनी सूत्रसंचालन करून आभार मानले.

गंगामाई वाचनालयाच्या वतीने समूहगीत गायन स्पर्धा
आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
येथील श्रीमंत गंगामाई वाचन मंदिर, आजरा यांच्या वतीने तालुकास्तरीय समूहगीत गायन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. भारतीय स्वातंत्र्य दिनानिमित्त कै. महादेव नारायण गव्हाणकार व कै. स्नेहलता निवृत्ती ठाकूर यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ (ता. १८) ऑगस्ट सकाळी १०.३० वाजता ‘मृत्युंजय’कार शिवाजी सावंत स्मृती दालन स्पर्धा होणार आहे. पहिली ते दहावी या गटातील विद्यार्थांना स्पर्धत सहभागी होता येईल. देशभक्तीपर किंवा सुगम समूहगीत सादर करावयाचे आहे. प्रत्येक संघाला एकच गीत सादर करता येईल व त्यासाठी ५ मिनिटांचा कालावधी दिला जाणार आहे. प्रत्येक संघात किमान ६ व कमाल १० विद्यार्थी असावेत. विजेत्या संघांना अनुक्रमे ३,०००/- २,०००/- आणि १,०००/- रोख रक्कम, स्मृतिचिन्ह व प्रशस्तीपत्र प्रदान करण्यात येणार आहे. स्पर्धेसाठी नावनोंदणी (ता. १७) पर्यंत श्रीमंत गंगामाई वाचन मंदिर, आजरा येथे करावी.
बाहेरील गावांतील सहभागी संघांना प्रवासखर्च देण्यात येणार आहे. तालुक्यातील सर्व शाळांनी या स्पर्धेत सहभाग नोंदवावा, असे आवाहन वाचनालयाचे अध्यक्ष वामन सामंत, उपाध्यक्षा विद्या हरेर, कार्यवाह कुंडलिक नावलकर व सहकार्यवाह रविंद्र हुक्केरी यांनी केले आहे.
छाया वृत्त

रोप लावणीला गवे आले…
शिवारभर नाचून गेले…
साळगाव येथील पांडुरंग दत्तू कांबळे, प्रभाकर कृष्णा दोरूगडे, अशोक लक्ष्मण कांबळे, शशिकांत रामू कांबळे व इतर शेतकऱ्यांच्या भात तरव्यांचे गव्यांनी मोठे नुकसान केले आहे.
स्थळ : साळगाव शिवार

निधन वार्ता
बंडू सावंत

मलिग्रे येथील बंडू चंद्रू सावंत ( वय वर्षे ७५ यांचे ) वृद्धापकाळाने निधन झाले. आज गुरुवारी सकाळी नऊ वाजता अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
प्रकाश सावंत यांचे ते वडील होत.त्यांच्या पश्चात पत्नी दोन मुलगे,मुलगी, जावई,सूना,नातवंडे असा परीवार आहे.
सदाशिव नावलकर

पेरणोली (ता. आजरा) येथील सदाशिव धोंडीबा नावलकर (वय ७२) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे पत्नी, मुलगा व विवाहीत मुलगी असा परिवार आहे. श्रीमंत गंगामाई वाचन मंदिराचे कार्यवाह कुंडलिक नावलकर यांचे ते वडील होत.
वर्षा पर्यटन….
वेळवट्टी पाझर पूर्णपणे भरल्याने या तलावाने परिसराचे सौंदर्य खुलले आहे.
(छाया : डॉ. धनाजी राणे)

आजचे पंचांग
दिनांक : २३ जुलै २०२६
वार : गुरुवार
माह (अमावस्यांत) : आषाढ
माह (पूर्णिमांत) : आषाढ
ऋतु : वर्षा
आयन : दक्षिणायन
पक्ष : शुक्ल पक्ष
तिथी : नवमी तिथी (सकाळी ०७.०३ पर्यंत) त्यानंतर दशमी तिथी
नक्षत्र : विशाखा नक्षत्र (२४ जुलै रात्री ०१.४२ पर्यंत) त्यानंतर अनुराधा नक्षत्र
योग : शुभ योग (सायंकाळी ०७.१९ पर्यंत) त्यानंतर शुक्ल योग
करण : कौलव करण (सकाळी ०७.०३ पर्यंत) त्यानंतर तैतुला करण
चंद्र राशी : तूळ राशी (सायंकाळी ०७.०० पर्यंत) त्यानंतर वृश्चिक राशी
सूर्य राशी : कर्क राशी
अशुभ मुहूर्त:
राहु काळ : दुपारी ०२.३२ ते सायंकाळी ०४.०१ पर्यंत
शुभ मुहूर्त:
अभिजित : दुपारी १२.१९ ते दुपारी ०१.११
सूर्योदय : सकाळी ०६.१३
सूर्यास्त : सायंकाळी 7०७.१७
संवत्सर : पराभव
संवत्सर(उत्तर) : रौद्र
विक्रम संवत: २०८३ विक्रम संवत
शक संवत: १९४८ शक संवत
विशेष सूचना
बऱ्याच वेळा ‘ मृत्युंजय महान्यूज’ ची लिंक ओपन होत नाही अशा तक्रारी वाढलेल्या आहेत. लिंक ओपन करताना वायफाय वर ओपन न करता ती मोबाईल नेटवर्क सुरू करून ओपन केल्यास लवकर बातम्या पहावयास मिळतात.
कांही वेळा ट्राफिक जाममुळे/सर्वर मधील अडथळ्यामुळे लिंक लवकर ओपन होत नाही. थोडा वेळ थांबून लिंक ओपन करावी. काही तांत्रिक अडचणी सुरू आहेत. आम्ही दूर करण्याचा प्रयत्न करत आहोत.
….मुख्य संपादक


