
रविवार दि.२० सप्टेंबर २०२६

पुढच्या वर्षी लवकर या…च्या गजरात आजऱ्यात भावपूर्ण वातावरणात गौरी-गणपती विसर्जन

आजरा : प्रतिनिधी
‘पुढच्या वर्षी लवकर या… गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया’ च्या जयघोषात आणि ढोल-ताशांच्या गजरात आजरा शहर परिसर व तालुक्यातील ग्रामीण भागात गौरी-गणपतीचे भावपूर्ण वातावरणात विसर्जन करण्यात आले.
गेल्या पाच दिवसांपासून सुरू असलेल्या घरगुती गणेशोत्सवाची सांगता विसर्जनाने झाली. घरगुती मंडळांच्या गणेश मूर्तींचे आणि गौरींचे विसर्जन करण्यासाठी सकाळपासूनच भाविकांची लगबग सुरू होती.
पारंपारिक वाद्यांच्या तालावर, फटाक्यांच्या आतषबाजीमध्ये मिरवणुका काढण्यात आल्या. “गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या” चा गजर संपूर्ण शहरात घुमत होता. लहान मुलांपासून ते ज्येष्ठांपर्यंत सर्वांनी नाचत-गात बाप्पाला निरोप दिला.
शहरातील वडाचा गोंड, शिवाजीनगर घाट परिसर, संताजी पूल परिसर आणि रामतीर्थ परिसर येथील विसर्जन घाटांवर मूर्ती विसर्जन करण्यात आले. यावेळी कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी प्रशासनाच्या वतीने पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. नगरपंचायतीने विसर्जन घाटावर विसर्जन कुंडांसह स्वच्छता व आवश्यक सुविधांची सोय केली होती.
अनेक मंडळांनी पर्यावरणपूरक पद्धतीने विसर्जन करत निर्माल्य संकलनावर भर दिला. विसर्जनानंतरही भाविकांच्या चेहऱ्यावर उत्साहाबरोबरच बाप्पाला निरोप देण्याचे भाव दिसत होते.

उत्तूर बसस्थानकाच्या रखडलेल्या बांधकामाला अखेर हिरवा कंदील…
संभाजी कुराडे यांचे अन्नत्याग आंदोलन स्थगित

उत्तूर : प्रतिनिधी
गेली दीड वर्षे रखडलेल्या उत्तूर येथील नवीन बसस्थानकाच्या बांधकामाचा तिढा अखेर सुटला. जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड यांनी संबंधित यंत्रणेला तातडीने काम सुरू करण्याचे लेखी आदेश दिले. यानंतर ग्रामपंचायत सदस्य संभाजी कुराडे यांनी २१ सप्टेंबरपासूनचे अन्नत्याग आंदोलन स्थगित केले.
बसस्थानकाचे काम बंद पडल्याने प्रवासी, विद्यार्थी, व्यापारी व ग्रामस्थांची गैरसोय होत होती. ग्रामस्थांनी निवेदने, ग्रामसभा व आंदोलनांच्या माध्यमातून पाठपुरावा केला. सरपंच किरण आमणगी यांच्या नेतृत्वाखाली ग्रामपंचायतीनेही जिल्हाधिकारी कार्यालय व एस.टी. महामंडळाकडे सातत्याने पाठपुरावा केला.
आर्दाळ येथील कॉ. शिवाजी गुरव यांच्या धरणे आंदोलनानंतर प्रश्नाला अधिक वेग आला. संभाजी कुराडे यांच्या अन्नत्याग आंदोलनाच्या इशाऱ्यानंतर मंत्री हसन मुश्रीफ यांच्या पुढाकाराने जिल्हाधिकारी, एस.टी. महामंडळ, ग्रामपंचायत व आंदोलनकर्त्यांची संयुक्त बैठक झाली. किरण आमणगी यांनी गेल्या दीड वर्षातील घडामोडींचा आढावा मांडला. चर्चेनंतर जिल्हाधिकाऱ्यांनी काम तातडीने सुरू करण्याचे आदेश दिले. यावेळी शिरीष देसाई, आशिषकुमार देसाई, एस.टी. हळवणकर,सौरभ वांजोळे यांनी मनोगते व्यक्त केली. यावेळी शिवलिंग सन्ने, संदेश रायकर, शिवाजी गुरव, सौरभ वांजोळे, राजशेखर पांडव, महेश करंबळी, पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.

सोशल मीडियावर रंगल्या श्रेयवादाच्या चर्चा विजय मात्र ग्रामस्थांचा…
प्रश्न मार्गी लागल्यानंतर सोशल मीडियावर श्रेयवादाच्या चर्चा रंगल्या. मात्र, ग्रामस्थ, ग्रामपंचायत, आंदोलक आणि पत्रकारांच्या दीड वर्षाच्या पाठपुराव्यामुळे प्रश्न मार्गी लागला असून, या लढ्याचा खरा विजय उत्तूरच्या ग्रामस्थांचा आहे.

नवलाई सहकारी दूधसंस्थेमार्फत दूध उत्पादकांना नफा वाटप

किणे : प्रतिनिधी
सन २०२५-२६ मध्ये म्हैस दूध प्रति लीटर ६ रूपये ५० पैसे तर गाय दूध प्रति लीटर २ रुपये ७५ पैसे आणि गणेश चतुर्थीला दूध उत्पादकांना तूप आणि श्रीखंड वाटप करण्यात आले .
यावेळी सर्वाधिक दूध पुरवठा करणाऱ्या उत्पादकांचा संस्थेमार्फत सन्मान करण्यात आला .यावेळी संस्थेचे मार्गदर्शक श्री . विजय केसरकर यांच्यासह चेअरमन अरुण पाटील , गणपती पत्ताडे , शामराव तारळेकर , बाबु तुप्पट , सदाशिव पाटील , विश्वनाथ पत्ताडे तानाजी पाटील, तानाजी पत्ताडे सर्व संचालक , कर्मचारी यांच्यासह दूध उत्पादक सभासद हजर होते .

आजचे पंचांग
दिनांक : २० सप्टेंबर २०२६
वार : रविवार
माह (अमावस्यांत) : भाद्रपद
माह (पूर्णिमांत) : भाद्रपद
ऋतु : शरद
आयन : दक्षिणायन
पक्ष : शुक्ल पक्ष
तिथी : नवमी तिथी (सायंकाळी ०५.५१ पर्यंत) त्यानंतर दशमी तिथी
नक्षत्र : पूर्वाषाढा नक्षत्र (२१ सप्टेंबर पहाटे ०४.३४ पर्यंत) त्यानंतर उत्तराषाढा नक्षत्र
योग : सौभाग्य योग (दुपारी ०३.२२ पर्यंत) त्यानंतर शोभन योग
करण : कौलव करण (सायंकाळी ०५.५१ पर्यंत) त्यानंतर तैतुला करण
चंद्र राशी : धनु राशी
सूर्य राशी : कन्या राशी
अशुभ मुहूर्त:
राहु काळ : सायंकाळी ०५.०५ ते सायंकाळी ०६.३६ पर्यंत
शुभ मुहूर्त:
अभिजित : दुपारी १२.०८ ते दुपारी १२.५६
सूर्योदय : सकाळी ०६.२८
सूर्यास्त : सायंकाळी ०६.३६
संवत्सर : पराभव
संवत्सर(उत्तर) : रौद्र
विक्रम संवत: २०८३ विक्रम संवत
शक संवत: १९४८ शक संवत

गणेश दर्शन...
शिवसेना प्रणित जय शिवराय मंडळ आजरा.

अध्यक्ष : रोहन तुळशीदास गिरी. उपाध्यक्ष : सौरभ संभाजी पाटील. सचिव : शरद आनंदा कोरगावकर खजिनदार : मुरलीधर कृष्णा दावणे
आदर्श युवा ग्रुप, उत्तूर

कार्याध्यक्ष- श्री.जोतिबा पोवार
अध्यक्ष- श्री.युवराज सपकाळ
उपाध्यक्ष- श्री.सत्यजित देसाई
सचिव- श्री.ओंमकार फाळके
खजिनदार- श्री.सुधीर साळोखे

मलिग्रे खडक वाडीत छोट्या तलावात भक्ती भावाने गणरायाला निरोप

मलिग्रे ग्राम पंचायतीच्या वतीने कागिनवाडी रस्त्याला खडक वाडीत गेल्या वीस वर्षांपासून गणेश विसर्जनासाठी छोटा तलाव तयार केला असून, ग्रामपंचायतीने गणेश विसर्जन स्थळी गौरी संकलनासाठी ट्रक्टर डब्याचे नियोजन व तलावांचे सुशोभीकरण करण्यात आले होते. या ठिकाणी मलिग्रे कागिनवाडी तील सर्व गणेश भक्तांनी गणरायाला मोठ्या भक्तिभावाने निरोप दिला.
गणरायाला निरोप देण्यासाठी गावातील ट्रॅक्टर व चार चाकी च्या माध्यमातून गणरायाची मिरवणूक काढण्यात आली. यासाठी गावातील महिला, मुंबईकर मोठ्याप्रमाणात सहभाग घेतला.संगिताच्या तालावर पारंपारिक गाणी व झिम्मा फुगडी खेळत, सर्वांनी भक्ती भावाने पुढील वर्षी लवकर या अशा घोषणा देत, गणरायाला निरोप दिला.
